About Me

हरी ओम, 

मी रेश्मावीरा नारखेडे पूर्वाश्रमीची रेश्मावीरा हरचेकर....

रेश्मावीरा नारखेडे
मला जर कुणी २००२च्या आधी विचारले असते की स्वतःबद्द्ल काही तरी लिह तर खर सांगू मला काहीच लिहता आले नसते. २००२ मध्ये बापू आयुष्यात आले आणि माझे जगच बदलले. जगच काय तर पूर्णच्या पूर्ण मीच बदलली.

सर्वसामान्यपणे प्रत्येकाचे जसे बालपण जाते तसेच माझेही गेले. परंतु या बालपणात एक सुरेख गोष्ट घडली ती म्हणजे माझ्या आजीने मला कलावती आईंच्या भजनाची आणि कृष्णाची ओढ लावली. बाकी काही चांगले वाईट होते नव्हते ते मी विचारात घेत नाही. परंतु माझ्या आईने व आजीने मला सश्रद्ध केले आणि त्यामुळेच आज माझी "बापूंची श्रद्धावान" म्हणून ओळख झाली. बालपणात भक्तीचा पाया भक्कम करणे हे किती महत्त्वाचे असते हे आज मला कळते.

वसईच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून दहावी झाले आणि वर्तक कॉलेज, विवा कॉलेज शेवटी मुंबई युनिर्व्हसिटी असा प्रवास करीत एम ए इतिहासपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. खर तर मला आयटी फिल्डमध्ये शिरायचे होते. त्याची आवड होती. पण कमी मार्क्समुळे ते शक्य झाले नाही. परंतु बापूकृपेमुळे आज मी आयटी क्षेत्रातच कार्यरत आहे. ब्लॉग्स आणि वेबसाईटस बनविणे माझे वेड आहे. 

त्यापूर्वी दैनिक प्रत्यक्षमध्ये फोटो जर्नालिस्ट म्हणून होते. फोटोग्राफीची कला माझी प्रत्यक्षमध्ये बहरली आणि मी चांगले लिहू शकते याची प्रचिती मला दैनिक प्रत्यक्षमध्येच आली. हा आयुष्याचा महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला. प्रत्यक्षमध्ये असताना मला विविध गोष्टी शिकता आल्या  आणि माझ्यात सुद्धा एक चांगला डिझायनर लपला आहे याचा मला शोध लागला. 

अशा विविध कलागुणांचा विकास बापूंकडे आल्यावर झाला. बापूंकडे अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डीझास्टर मॅनेजमेंटची डी एम व्ही म्हणून मी खूप कार्यरत होते. तसेच अहिल्या संघाच्या माध्यमातून भारतीय प्राच्यविद्या मार्शल आर्टचे प्रशिक्षण देखील मिळाले. बापूंनी मला खर्‍या अर्थाने समर्थ केले. बाहेरच्या विविध श्रेत्रात प्राविण्य प्राप्त करताना मात्र स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या आणि अमूल्य अशा "संसार आणि चूल आणि मूल" जबाबर्‍यांमध्ये तर शून्य मार्क होते. परंतु नंदाईच्या आत्मबलामुळे ह्या जबाबदार्‍यापण सराईतपणे पार पाडण्याचा आत्मविश्वास आला. आज कधीही न आवडणारी कुकींग ही सुद्धा हॉबी झाली आहे. आत्मबलमध्ये नाटकात व डान्समध्ये भाग घेऊन आपण एक उत्कृष्ट अभिनय करू शकतो याची जाणीव झाली. तसेच नाचण्याची हौसपूर्ण झाली.

अशा अनेक अनेक गोष्टी बापूंनी प्रत्यक्षात घडवून आणल्या ज्यामुळे माझे व्यक्तीमत्व ही घडत गेले. आणि अजूनही घडत आहे. 

स्वतःकडे बघताना मी एकाच चष्म्याने बघते ते म्हणजे मी बापू नंदाआईची लेक आहे आणि मग सगळ व्यवस्थित होते. सुरळीत होत. चांगल होत आणि सगळीकडे आनंद आनंद पसरतो. कुणी मला विचारले की तुझे ध्येय काय तर माझे उत्तर एकच असते "आनंदवृत्ती व समाधान मिळविणे" कारण 

साई आनंदवृत्तीची खाण। असलिया भक्त भाग्याचा जाण।परमानंदासी नाही वाण। सदैव परिपूर्ण सागरसा।।

मी अंबज्ञ आहे

1 comment:

Snehaal Kashid said...

Hari om
Khupch chan mahiti dili ahe tumhi blog war... Ambadhnya