Saturday, February 14, 2015

प्रेमात पडणे तसे अवघड नसते


चालता चालता केळीच्या सालीवरुन
धपकन घसरुन पडावं
काहीतरी अनाकलनिय घडावं
आणि नंतर जग जणू विस्मृतीत जावं
असंच काहीस घडत असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीची साल अन पायाचा सुटलेला तोल
यांच्या मिलनाचा जसा योग यावा लागतो
त्याच्या तिच्या नजरेचा कोन
तसा अचुक जुळावा लागतो
नंतर "आई ग" ही एकच हाक उठते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

सालीवरुन घसरुन पडल्यानंतर
कदाचित एखादे हाड मोडू शकते
पण प्रेमात घसरुन पडल्यानंतर
काही नाही तरी कणा नक्कीच मोडतो
पण तरिही,
मोडक्या कण्यासह ताठ उभे राहायचे असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीचे साल जसे रुग्णालयात नेते
तसे प्रेमाचे भूत पागलखान्यात नेते
म्हणून कृपया केळीचे साल रस्त्यात फेकू नका
आणि खुळचट प्रेमाच्या कल्पने मागे पडू नका
कारण खरे प्रेम पाडत नाही तर सावरते
हे ज्यास समजले तोच म्हणु शकतो

प्रेमात पडणे तसे अवघड नसते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

- रेश्मा हरचेकर ३०/०३/१०

नॉन ऑईल - बुरजी

रात्रीच्या वेळीस घराकडे निघाली की प्रत्येक स्टेशनवर कुठेना ना कुठे बुरजी पाव ची गाडी असते.  त्या बुरजीचा वास नाकात गेल्यावर खाण्याचा मोह टाळता येते नाही. खाऊ किंवा नाही ही वेगळी गोष्ट पण त्या वासानेच आपण सुखावून जातो. अशी ही बुरजी नॉन वेज खाणार्‍यांची फेव्हरेट असतेच असते. माझी ही आहे. खुपच. पण बुरजी म्हटली की तेला शिवाय त्यास पर्याय नाही.  तेलामध्ये चांगला कांदा आणि टॉमेटो परतविल्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही असा माझा विचार होता. पण तो विचार काल केलेल्या बिन तेलाच्या बुरजी ने अत्यंत खोटा पाडला आणि तेलाच्या बुरजीपेक्षा देखील ही बिन तेलाची बुरजी सुंदर असल्याची प्रतिक्रीया मला आली. तर आपण पाहूया ही बिन तेलाची बुरजी कशी बनवीली ते.



साहित्य : -


  • चार मोठे कांदे
  • पाच अंडी
  • चार टोमॅटो
  • १ चमचा आल लसूण पेस्ट
  • मिरची/लाल तिखट
  • १ चमचा गरम मसाला 
  • १ चमचा जीरा पावडर
  • १ चमचा धणे पावडर
  • राई


कृती:  -

सर्वप्रथम कांदा व टॉमेटो बारीक चिरुन घ्या. बारीक चिरणे आवश्यक आहे. फुड प्रोससर किंवा हॅण्ड प्रोसेसरवर बारीक केल्यास उत्तम. फक्त पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
नॉन स्टीक कढई आधी गरम करुन घ्यावी व त्यात आधी बारीक चिरलेला कांदा टाकावा व मग थोड्यावेळाने  टोमॅटो टाकावा.
कांदा व टोमेटो जोपर्यंत शिजत नाही आणि त्याचा कच्चे पणा जात नाही तोपर्यंत शिजवावे. परतत रहावे.
पाण्याचा थोडा शिबका मारवा. मग त्यात राई, मिरची/लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जीरा पावडर, धणे पावडर इत्यादी साहित्य टाकावे.
आणि शिजवत रहावे. परतत रहावे. चिमटभर मीठ टाकावे. थोड्यावेळाने त्या मिश्रणाची चव घेऊन पहावी. कांदा टोमॅटो शिजलेला असून त्यात मसाला, मीठाची चव उतरली आहे का नाही हे पहावे.

हे केल्या नंतर पाच अंडी फोडून जर वरील मिश्रणात मीठ लाल तिखट कमी वाटले तर अंड्यांमध्ये देखील टाकावे. अंडी फेटून घ्यावीत. फेटलेली अंडी फेटून कढईत ओतावी. व हे सर्व मित्रण हलवित रहावे.
जो पर्यंत अंड्याच्या बारीक गुठळ्या तयार होत नाही तोपर्यंत हलवत रहावे. जसे आपण नॉर्मल बुरजीला करतो तसेच.
शेवटीमग त्यात बारीक चिरलेली कोथींबीर घालावी व गरमा गरम सर्व्ह करावे.

बारीक  केलेला कांदा आणि टोमॅटो 
मुद्दे -
१. तेल नसल्याने कांदो टोमॅटोच्या रसामध्येच सर्व काही शिजते. म्हणून कांदा टॉमेटो बारीक करावा. गरज वाटल्यास किंचीत पाणी ऍड करावे.
२. तेलात नसल्याने ही बुरजी अत्यंत रसदार लागते व सॉफ्ट होते. तेलात ज्या प्रमाणे अंडे शिजते किंवा करपते त्याप्रमाणे इथे होत नाही.
३. ह्या प्रमाणामध्ये बुरजी तिघांसाठीच होते आणि खाणारा असेल तर दोघांपुरतीच.
४. पिवळा बलक व्यर्जकरुन हार्ट पेशंटसाठी हेल्थी बुरजी पण बनवू शकतो. मात्र त्यासाठी अंड्यांची संख्या वाढवावी.
५. नेहमीच्या प्रमाणापेक्षा नॉन ऑईल बनविताना कांदा टोमेटोचे प्रमाण अधिक घ्यावे.

- रेश्मा नारखेडे
१४/२/१५

प्रश्न ??



मी जन्माला आले तेव्हा डाक्टरांचा चेहरा प्रश्नार्थक होता. असं मी नाही माझी आई म्हणते. कसला बरा प्रश्न पडला असेल त्यांना? कुणास ठाऊक? काही चिंतेचे कारण असेल म्हणून आईने त्यांना विचारल सुद्धा..पण छे! त्यांनी Every thing is normal  असे म्हणून प्रश्न टाळला. ही होती सुरुवात. तेव्हा पासून आत्ता पर्यंत मी आणि प्रश्न हे काही वेगळे नाहीत. मला प्रश्न पडतात. माझ्या पडिक प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतात. मी असताना प्रश्न. मी नसताना प्रश्न. माझ्या बोलण्यावर प्रश्न, माझ्या वागण्यावर प्रश्न.

माझे नावच माझ्या जवळच्यांनी "२१ अनपेक्षित प्रश्नसंच" असे ठेवले आहे. काय माहित कधी कुठला प्रश्न विचारेन. त्यामुळे मला टाळण्याचाच लोकांचा कल असतो. असो...

पण २१ अनपेक्षित प्रश्नसंच हे नाव मी पुरेपुर सार्थ ठरवलय..बरं का!! इतरांना झोपले की स्वप्न पडतात..मला प्रश्न पडतात..आता झोप किती वाजता लागेल? स्वप्न कुठलं पडेल? स्वप्नात कोण येईल? कोण यायला हवे? इत्यादी. आणि माझी पहाट होते ती प्रश्नानेच कुठलं स्वप्न पडलं होत? ह्या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच....आईंची प्रश्नांची सरबत्ती सुरु...अग म्हशे उठलिस का? दात घासलेस का? चहा हवा की दूध? ....भाजी खाशिल ना? उफफ...आईला पण "उत्तरात" बोलता येत नाही का? बघा मीही पुन्हा प्रश्नच विचारला...हे असंच होतं माझं...

आता मला पडलेले प्रश्न ऐका...
  1. भारताच्या पूर्वेला असणार्‍या राज्याला "पश्चिम" बंगाल असे का म्हणतात?
  2. लोक मला म्हणतात तुझे वळण सरळ नाही..आता वळण कधी सरळ असेल का?
  3. ट्रेनमधील विक्रेते माल विकून आलो असे म्हणण्याऐवजी "ट्रेन मारुन आलो" असे का म्हणतात? म्हणजे ते नेमके काय करतात?
  4. खुर्चिवर बसले असतानाही लोक नेटवर बसलोय अस खोट का बोलतात?
  5. आणि सगळ्यात वाईट म्हणजे...develop करायला दिलेल्या फोटोंना "फोटो धुवायला दिले आहेत" अस का म्हणतात? आता ते काय कपडे आहेत?
  6. जेवायला बस आणि बसून जेव..यामधील क्रीया सारखीच आहे...पण शब्दांच क्रम बदलला की अर्थ एकच राहून भाव कसा काय बदलतो?
  7. माझी मैत्रीण फोनवर मला सांगते...की आता मी जेवण करते आहे म्हणजे नक्की जेवण बनवते की जेवण जेवतेय, हे मी कस समजायचे?
  8. महागाई शब्द कसा आला? गाईंशी त्याचा काय संबंध.....
  9. झोपलेले आहे हे दिसत असताना हलवून हलवून उठवायचे आणि विचारायचे की झोपली होती का? या प्रश्नाला उत्तर काय अपेक्षीत असते?
  10. वाढू का? वाढू का? जेवायला बसल्यावर हा प्रश्न तर जाम सतावतो. कारण इतकी मोठी उंच वाढलेली असताना, ताई अजून किती वाढणार? हा प्रश्न मला पडतो?
  11. आता अंधार हा गुडुप कसा काय? गुडूप म्हणजे काय? गुडूप असा अंधाराचा आवाज आहे का जसा पाण्यात दगड पडल्यावर येतो डुबुक तसा?
  12. कंटाळा आला असे आपण म्हणतो पण तो येतो कुठून?



या अशा अनेक प्रश्नांनी माझं आयुष्य आणि मी प्रश्नार्थक झालय आणि उत्तरांनी माझ समाधानही होत नाही....
कंटाळा आलाय मला या प्रश्नमय आयुष्याचा..कुठून ते ही कळत  नाही? खुप नुकसानही झालयं माझ. म्हणून मी ठरवलय...की आता प्रश्नच विचारायचे नाही मुळी...केवळ उत्तरातच बोलायचे. द्यायची फक्त उत्तरे...प्रश्न टाळायचे...

हा विचार माझा पक्का होऊन काही दिवस उलटत नाही तोच.....

एका सुशिक्षित, सुसंस्कृत, सुंदर मुलाने मला वॅलेंटाईनच्या दिवशी विचारले 

Will You Marry Me??? 

मी त्याला ताडकन उत्तर दिले...
Are You Gone Mad??? 
तुला वेड लागलेय का?

झालं....

आता त्या मुलाचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
पण त्याने शांतपणे उत्तर दिले...हो! वेडाच झालोय...

आयुष्यात माझ्या प्रश्नाला मिळालेले हे एकमेव समाधानकारक उत्तर होते.

त्यानंतर विचारु नका काय झाल....

एवढचं सांगू शकते की २१ अनपेक्षित प्रश्नसंचाला अखेर २१ अपेक्षित उत्तरसंच मिळाला आहे....


- रेश्मा नारखेडे 
ही कथ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी 
व याबाबत कृपया प्रश्न विचारु नये.