Saturday, March 21, 2015

मन्मथनाम संवत्सर



सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा. कालच जेव्हा कृपासिंधु कॅलेंडरवर नजर गेली तेव्हा आजच्या तिथीला एक गोष्ट पाहिली "मन्मथनाम संवत्सर" यापूर्वी अनेकदा कॅलेंडर पाहिले परंतु गुढी पाडव्याला सुरु होणार्‍या संवत्सराचे नाम कधी लक्षात घेतले नाही. प्रिय नंदाईने माझ्या लेकाचे नाम मन्मथ असे ठेवले. तेव्हा याकडे लक्ष गेले. एकदम अनोखे असे हे नाव मी यापूर्वी कधीच ऐकले नव्हते. मी काय माझ्या जवळपास कुणीच ऐकले नव्हते. आईने हे नाव सांगताना या नावाचा अर्थ ही सांगितला होता. 
"सर्वांना आनंद देणारा, प्रेम देणारा, सुखमय करणारा असा परमेश्वर म्हणजे मन्मथ" 
मन्मथ हे श्रीकृष्णाचे नाव आहे. ही अभूत पूर्व व्याख्या आईने समजवल्यावर त्याचा संबंध या मन्मथ संवस्तराशी लावला.

शालिवाहन शकाची १९३६ वर्षे संपून २१ मार्च शनिवारपासून म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून शके १९३७ वे वर्ष सुरू होत आहे. या वर्षाचे नाव ‘मन्मथनाम संवत्सर’ असे आहे. कलियुगाची ५ हजार ११५ वर्ष पूर्ण झाली असून ४ लाख २६ हजार ८८५ वर्ष शिल्लक आहेत. अशी माहीती पंचागातून मिळाली.

मन्मथ नामाचे हे वर्ष आहे. २०१५ च्या पहिल्यादिवशी बापूंनी (अनिरुद्ध बापू) सांगितले की हे वर्ष (२०१५) हे प्रेमाचे वर्ष आहे. प्रत्येकाशी आणि मुख्यत्वे परमेश्वराशी आपण प्रेमाने वागले पाहिजे इतकेच नव्हे तर हे प्रेम क्षणोक्षणी वाढले पाहिजे. बापूंनी सांगितले हे प्रेमाचे वर्ष आणि आपले मराठी नवीन वर्ष श्रीकृष्णाच्या मन्मथ नामाचे. अर्थात सगळ्यांना अपार प्रेम देऊन सुखमय करणार्‍या मन्मथाचे. काय योगायोग आहे? म्हटले तर योगायोग पण खर तर योगायोग कधीच नसतो. प्रत्येक गोष्ट चण्डीका व तीचा पुत्र नीट प्लॅन करीत असतो.

या मन्मथ शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधत असताना मला एकच दिसून आले की कामदेवाचे नाव म्हणून याचा सर्वत्र उल्लेख आहे. कामदेवाच्या ही मनाची घुसळण करुन आणणारा...त्यालाही मोहात पाडणारा असा श्रीकृष्ण तो मन्मथ असा अर्थ ही सापडला. प्रेमाचा परमेश्वर God of Love म्हणजे मन्मथ. कामदेव हा God of Love होऊ शकत नाही तो God of Desire आहे.

परमेश्वर दत्तगुरु पासून ते परमेश्वराचे प्रत्येक रुप, परमात्मा त्याचा प्रत्येक अवतार हा प्रेमस्वरुप आहे. प्रेम हा त्याचा स्थायी भाव आहे. नुसता प्रेमाचा नाही तर passionate love म्हणजे पूर्णपणे झोकून देऊन, संपूर्ण पॅशीनेट होऊन (वेड लागल्यागत) केलेल्या प्रेमाचा दाता हा मन्मथ. जे पवित्र आणि पवित्रच आहे. असे झपाटून प्रेम केवळ परमात्मा आपल्या लेकरांवर करु शकतो. दुसरे कुणीही नाही. जेव्हा हे पॅशिनेट प्रेम पावित्र्याचा मार्गावरुन दूर होते तेव्हा तो असतो काम, मोह, भोग,आसुरी इच्छा व महत्त्वकांक्षा. त्यास शुद्ध प्रेमाचा काय प्रेमाचा देखील लवलेष ही उरत नाही, असे मला वाटते. खर तर शुद्ध अशुद्ध अस प्रेम नसते. प्रेम असेल तर ते शुद्धच असते अन्यथा ते नसतेच. As Simple as that.

असे हे मन्मथ नाम आणखी आले आहे ते महिषासुरमर्दिनी स्तोत्रात

अविरलगण्ड गलन्मदमेदुर मत्तमत्तंगजरापते ।
त्रिभुवनभूषण भूतकलानिधि रूपपयोनिधि राजसुते ।
अयि सुदतीजन लालसमानस मोहन मन्मथराजसुते
जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते ।।13।।

पंचाग, संवत्सर, विक्रम संवत, शालिवाहन शक हे समजायला फार किचकट आहे. पण या मन्मथ संवत्सरामुळे दोन दोन पाडवा का याचे उत्तर मला सापडले. शालिवाहन शकाची सुरुवात अर्थात शालिवाहन कॅलेंडरची सुरुवात ही गुढी पाडव्यापासून होते तर विक्रम संवतची सुरुवात ही दिवाळीच्या पाडव्यापासून होते. विक्रम संवतनंतर ७४ वर्षांनी लेट शालिवाहन शकाची सुरुवात झाली. याची डीटेल माहीती नेटवर उपलब्ध आहे.

पण प्रमुख मुद्दा असा घरात असणारे कॅलेंडर किंवा दिनदर्शिका आपण किती काळजीपूर्वक पाहतो. अर्थात पचांग आणि ज्योतीषात अडकायचे नाही पण किमान मला चांगला मुर्हूत वाइट मूर्हूत तरी माहित असावे. वर्षात दोन पाडवे का असतात याचे हे साधे उत्तर मला कळायला वयाची तीशी उलटावी लागली. आणि ती माहितीसुद्धा मला नेटवरुन शोधावी लागली. मग आत्ताच्या पिढीला अश्या सोप्प्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायला कदाचित साठी उलटेल. कदाचित ही उत्तरे शोधण्याची त्यांना गरज ही नसेल. मग मराठी संस्कृती आणि भारतीय वैदिक संस्कृती टीकणार कशी? ती टीकविण्यासाठी आधी ती नीट समजून घेतली पाहीजे. चार वेद आणि उपनिषद हे कळले पाहीजे. तरच ही संस्कृती...भारतीय वैदिक संस्कृती टिकेल. या संस्कृतीची पुढच्या पिढीला गरज निर्माण झाली पाहीजे. या गरजेतून जाणिव निर्माण होईल. या जाणिवेतून अज्ञान दूर होईल आणि अज्ञान दूर झाले की ज्ञान प्रकट होतेच. एकदा का ज्ञान प्रकट झाले की ते आपला प्रभाव दाखविते. शोभा यात्रांच्या पलिकडे जाऊन यासाठी प्रयास होणे आवश्यक आहे.

पण आम्हाला या सार्‍याची आज गरजच वाटत नाही ना आणि मग इथेच सारं अडते. पिझ्झा, बर्गर, डींक, डीस्क कल्चर, लिव्ह इन रिलेशनशीप कल्चर इत्यादी ही भारतीय नवीन पिढीची देखील गरज बनत चालली आहे. जिथे गरजच चुकीची निर्माण होते तिथे पुढचे चक्र बिघडलेच. ही आपली संस्कृती नाही. ही भारतीय वैदीक संस्कृती नाही हे सगळ्यांना माहीती आहेच. शेवटी स्वीकारयचे काय आणि काय नाही याचे कर्मस्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. पण काय घ्यायचे आणि काय नाही याचे ज्ञान हे नविन पिढीला त्यांच्या बालपणातच देणे हे दायित्व पालकांवर आहे. यालाच आपण संस्कार असे म्हणतो. आपण घडवू तशी ही पुढची पिढी घडत जाणार आहे. ही केवळ उपदेशांच्या डोसांवरुन नाही घडत. त्यासाठी मर्यादामार्गाचा अवलंब करुन, परमेश्वराच्या चरणी एकनिष्ठ राहून खपावे लागते आणि आपल्यापूढे खूप आव्हाने आहेत. येवढच मला माहीत आहे.

भारतीय वैदीक संस्कृतीत घट्ट पाय रोवून हिमालया येवढी उंची गाठण्याचे बळ आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आले पाहीजे आणि असे बळ निर्माण करण्याची ताकद व मार्गदर्शन भारतीय संस्कृतीत मुक्तपणे मिळेलच. फक्त ती आपल्यापर्यंत पोहचविताना मध्ये भरलेला कचरा आपल्याला दूर करता आला पाहिजे व हा कचरा दूर करण्यासाठी माझ्या सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंची प्रवचने खरोखरीची मार्गदर्शक ठरत आहेत. आणि भारतीय संस्कृतीच खरी मॉर्डन आहे...याच संस्कृतीने विज्ञान जगाला दिले आहे. भारतीय संस्कृतीला फालतू म्हणणार्‍यांनी याच संस्कृतीने दिलेला "शून्य" त्यांच्या आयुष्यातून, व्यवहारातून काढून टाकावा...मग कळेल भारतीय संस्कृती काय चीज आहे ते....महादुर्गेचे शुन्यसाक्षिणी स्वरुप पूजणारीच संस्कृती शून्य देऊ शकते हे ध्यानात घेतले पाहीजे.

आज खरच छान वाटले, जेव्हा माझ्या दीड वर्षाच्या लेकाने सकाळी उठून सदगुरुला, मग आज्जीला आणि मग आईला म्हणजेच मला पाया पडून वंदन केले आणि आशीर्वाद घेतला. हीच तर खरी नवी सुरुवात आहे....संस्कृतीच्या संरक्षणाची, संवर्धनाची....

भारतवर्षातील प्रत्येक मनात, प्रत्येक घरात सनातन वैदिक भारतीय संस्कृतीची पाळेमुळे घट्ट होवोत आणि त्याची वृद्धी होवो ही नव वर्षाच्या अर्थात मन्मथनाम संवत्सराच्या शुभेच्छा देतानाची सदिच्छा

- रेश्मा नारखेडे