Monday, August 29, 2016

पंढरीची वारी ३ - मी एक वारकरी

माऊलीच्या पादुकांच्या दर्शनानंतर आम्हाला वाटल की आता आम्ही निघू. पण पुढे दुसरा प्रश्न उपस्थित झाला. जायच कुठ? म्हणजे माघारी ११ किलोमीटर सासवडला की पुढे जेजुरीला. कुठही जायच म्हटल तरी पायीच जाव लागणार होत. मग तिथे एकाला विचारल जेजुरी किती लांब आहे? आणि काही वाहन मिळेल का? मुंबईला जायला तेथून. तेव्हा तो म्हणाला इथून तरी तुम्हाला कोणतच वाहन मिळणार नाही. जेजुरीतून मिळेल कदाचित. जेजुरी असेल पाच एक किलोमीटरवर.

आम्ही विचार केला की मागे ११ किलोमीटर चालत जाण्यापेक्षा पुढे पाच किलोमीटर चालत जाण जास्त सोप्प आहे. आणि मग जेजुरीवरुन काही वाहन मिळाल की जाऊ थेट मुंबईला...हा विचार करुन वारी बरोबरच पुढे निघालो.

आत्ता कसली घाई नव्हती आणि ओढ ही नव्हती म्हणुन पावले पण उचलणे होईना. एक एक पाऊल ही टाकण मला का जड झाल होत तेच कळेना. मध्ये या पाच जणांना माझ्या हातातील छत्री पकडून पुढे ओढत न्या हे सांगायची वेळ माझ्यावर आली.

जरा गरगरायला लागले. तेव्हा कुठे बॅगेतून बिस्कीटचा पुडा काढण्याची बुद्धी झाली. तेव्हा लक्षात आले सकाळी १० वाजल्यानंतर आम्ही साधा पाण्याचा घोटपण घेतलेला नाही आणि सुमारे ४ वाजले होते. एक एक बिस्कीट तोंडात टाकून पुढे चालायला लागलो. आता खर तर मी कॅमेराला सुट्टी दिली आणि वारीत फक्त चालत होते.

चालताना मी मला सुचेल तो अभंग गजर म्हणत होते. जे नाम मुखात येईल ते घेत होते. पण मुख्य म्हणजे डोक्यात अनेक विचार घुमत होते.

आमचा प्लान तर वारी फोटोग्राफीचा होता पण माऊलीने वारी कशी असते आणि तिचे आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे हे उदाहरणासहित पटवून दिले. चालता चालता मनात अनेक गोष्टी घोळू लागल्या. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक वर्षापासून वारीची फोटोग्राफी करण्याचे मनात होते आणि ती इच्छा आपली पूर्ण झाली. एक वारीचा अनुभव घ्यायचा होता तोही मिळाला. पण यापेक्षा ही महत्त्वाचे या "वारी" चे विलक्षण महत्त्वही समजले.

सकाळपासून एका फोटोग्राफरच्या नजरेने मी ही वारी पहात होत पण आता एका भक्ताच्या नजरेने ही वारी पाहत होते. विठ्ठलाच्या नामावर ताल धरुन चालणारे हे वारकरी मला विलक्षणच वाटत होते. त्यांना म्हणतात सुद्धा काय तर "वारकरी" म्हणजे वार करणारे...वारी करायची म्हणजे काम, क्रोध, मोह, मद, मत्सर, लोभ आणि अहंकारावर वार करणे आवश्यक असते. या षडरिपुंवर वार केल्याशिवाय ही वारी होऊच शकत नाही. ही वारी जाते पंढरीरायाच्या पायाशी. त्याच्या पायाशी या षडरिपुंसहित मी पोहचू शकत नाही. मला त्यांचा त्याग करावा लागतो.

एक गोष्ट खुप आवडली...ती म्हणजे इथे प्रत्येक जण "माऊली"...षडरिपुंचे बाण चालणार तरी कोणावर...खरा वारकरी या षडरिपुंनी मुक्त होत असतो. मी वारी करतो हा भाव ही त्याच्यात नसतो. सर्व काही माऊलीच करुन घेत असते. मग वारकरी करतो तरी काय? तर त्याला नेमून दिलेल कार्य ते म्हणजे भगवंताचे नामस्मरण आणि चालणं. बस्स..तेच करण त्याच काम आहे. बाकी ज्या गोष्टी व्हायच्या त्या आपोआप होत राहतात. आणि मी हे अनुभल देखील.

चालणं...अनेकांना माहित नसेल पण केवळ अर्धातास चालणं हे पुण्यकर्म मानलं जातं. आपण चालणं विसरत चाललोय. शरिरावर ही नाही तर मनावरही हे चालण परिणामकारक ठरतं. मला तर हे चालणं हाच एक मोठा योग वाटतो. कारण रेग्युलर चालणार्‍या माणसाचे शरिरच नाही तर मन देखील फीट असते. चालण्यासाठी चालाव. भगवंताचे नाम घेत चाललो तर त्याचा फायदा अधिक. यामागे विज्ञान देखील आहे. कुठेतरी वाचल होत. Walking makes you more creative. तसेही चालण्याने आपल्या शरिरातील शक्ती केंद्रे अ‍ॅक्टीव्हेट होतात. अ‍ॅक्युप्रेशरच्या विज्ञानात दुसरे काय आहे? सर्व प्रेशर पॉईंटस तळपायावर आहेत. त्यामुळे कदाचित चालण्याचा हा परिपाठ शरिराला फायदेशीर ठरत असावा. म्हणूनच कदाचित ७० नी ८० वर्षाचे वृद्ध वारकरी फिट राहू शकत असतील. साईसच्चरितातमध्ये एक गवळीबुवांची गोष्ट येते. ४ थ्या अध्यायात. ते ९५ वर्षाचे वारकरी होते. मला तर वारीत चालताना असे वृद्ध वारकरी गवळीबुवाच वाटत होते. साईसच्चरितातील हे गवळीबुवा माझे एकदम फेव्हरेट. साईनाथच प्रत्यक्ष पंढरीराव आहेत हे सांगण्याची त्यांची ताकद होती. अशा अनेकविध गोष्टी मला वारीत चालताना आठवत होत्या.

मनात येत होते ज्ञानेश्वर महाराज कशी वारी करत असतील? तुकाराम महाराज कशी वारी करत असतील. अस आपल्याला लागेल का अशी ओढ आणि तळमळ. मन अशा गुणसंकिर्तन आणि कथांमध्ये गुंगुन गेल्यावर जेजुरीपर्यंत कधी पोहोचलो कळलच नाही. पाचच किलोमीटर पुढे असे समजत समजत चक्क ९ किलोमीटर चालत आलो.

जेजुरीत शिरण्याआधीच एका हॉटेलमध्ये शिरलो. ६ वाजलेले. फ्रेश होण्याची नितांत गरज होती. तेव्हा लक्षात आले की सकाळी १० वाजल्यापासून नैसर्गिक विधी उरकायचे सुद्धा भान उरले नव्हते. ना खाण्याची आठवण, ना पाणी पिण्याची ना कसलीच आठवण.....आणि तस प्रसन्न वाटत होत. 

त्या हॉटेलमध्ये अक्षरशः झणझणीत मिसळवर ताव मारला व जेजुरीत शिरलो. हॉटेलमधून समोर उंच उभा राहिलेला जेजुरी गड दिसत होता. खंडोबा आमच कुलदैवत. माऊली खंडोबाच्या पायथ्याशी आणून सोडेल अस वाटलं नव्हत. जेजुरीत पाऊल ठेवल आणि  सोन्याची सोनपिवळी जेजुरी पाहीली. जेजुरीला  माऊलीची पालखी आल्यावर तिच्यावर भंडारा उधळला जातो. अवघे वारकरी मग खंडोबाची कधी होतात कळत नाही. हरि विठ्ठल...जय मल्हार हा गजर कधी मिसळत जातो कळत नाही.

गडावर जाऊन  दर्शन घेण्याची खूप इच्छा होती पण ते शक्य नव्हत. कारण 7 वाजले होते. परतीसाठी बस डेपोत गेलो तर डेपो बंद. सोमवार सकाळपर्यंत सुरू होईल याची शाश्वती नाही. मग काय? आता इथेच रहावं लागणार अशी चिन्हे दिसू लागली. कारण संपूर्ण ट्रान्सपोटच बंद होते. तरिही आमचा प्लॅनिंग किंग नागेश राव काही सोय होतय का ते पहाण्यास  गेला.  मी  त्या  अंधारतही मल्हार  गडाचे  फोटो  काढण्याचा प्रयास करित होते. 
तो मल्हार गड विठ्ठ्लच भासत  होता. काळाकुट्ट तो  डोंगर आणि  वर पसरलेले  घननीळ  आकाश..

एक  वेगळ्याच आकृतीचा भास  तेथे  मला  होत  होता.  म्हणजे  तो  डोंगर कटेवर हात  ठेवून उभा विठ्ठ्ल  तर भासत  होता पण त्या विठ्ठ्ला खंडोबाच्या  घनदाट "त्या" मिश्या असल्याचे  भासत  होते.                       
घनदाट मिश्यांमधून तो खंडॊबा-विठ्ठ्ल माझ्याकडे पाहून हसत होता. ते घननीळ आकाश म्हणजे त्याच्या नजरेतून वाहणारी करुणाच वाटत होती. कधीही ही करुणा माझ्यावर बरसेल अस दिसत होते आणि तसच झाले...त्याच्या कृपेचा पाऊस सुरु झाला. जोरदार पाऊस सुरु झाला. 
पायथ्यावरुनच खंडू विठूला हात जोडले आणि आता मुंबईला पोहचवायचे की नाही हे तूच ठरव असे म्हणत नागेशची वाट पाहत बसले.

त्या पावसात तो भंडारामिश्रित चिखल तुडवत नागेश धापा टाकत आला. चला रे तिथे आपल्याला पलिकडे काहीतरी वाहन मिळेल. म्हणून डेपोतून वाट काढत पलिकडे गेलो. नुकतीच एक टमटम टमाटम भरुन पुण्याला निघाली आणि आम्ही दुसर्‍या गाडीचा शोध घेत होतो. पण बराच वेळ आम्हाला काहीच मिळत नव्हते. एक व्हॅनवाला होता पण तो पुण्यास जायला तयार होत नव्हता. पण आमची घालमेल पाहून तो  अखेर तयार झाला. १५०० रुपयात पुण्याला सोडण्यास तयार झाला. आम्ही मागचा पुढचा विचार न करता त्याच्या व्हॅनमध्ये बसलो आणि रात्री ८ च्या सुमारास जेजुरीहून पुण्याला निघालो होतो.

हुश्श मनोमन मी माझे सदगुरु श्री अनिरुद्ध बापूंचे आभार मानले कि त्यांनीच आमच्या परतीच्या प्रवासाची सोय केली. तो गाडीवाला पण चांगला होता. गप्पा मारत मारत नेत होता. त्याला कळलं की आम्ही केवळ फॊटो काढायला आलेलो होतो. म्हणून त्याने दिवे घाटातही थोड्यावेळ गाडी थांबवली. रात्रीच्या पदराखाली हिरा माणिकांनी नटलेले पुणे पाहून मस्त वाटले. 

पुढे तो आम्हाला सांगत होता..की बरे झाले आम्ही निघालो कारण सोमवारी सोमवती अमावस्या होती आणि या दिवशी खंडोबाची पालखी स्नानास खाली येते. दीड दोन लाख भाविक सहज असतात. ट्रान्सपोटही नसतो. आणि १२ वाजे पर्यंतच जेजुरीमधील भंडारा संपून जातो. थांबला असता ते ती पालखी पहायला मिळाली असती. पण उद्याही निघण कठीण होतो....

आम्ही अवाकच झालो...कारण काहीही करुन प्रत्येकाला सोमवारी ऑफीसला जायचच होत. त्याप्रमाणे बापूं माऊलीने आम्हाला  सहज जेजुरीतून बाहेर काढल. पुण्याला आलो तर पुन्हा मुंबईला नेणार्‍या टॅक्सी आणि बस वाल्यांच्या कचाट्यात सापडलो. कस बस त्यांच्यापासून सुटका करत व्हॉल्वोचा टिकीट काढल आणि निघालो. रात्री २ वाजता दादरला पोहचलो मी मैत्रिणीकडे थांबले आणि सकाळी घरी आले. पायाचे फुल टू टुकडे पडले होते. लंगडत चालत होते. थकवा होता. पण ठरवले ऑफीसला जायचेच..

तसच घरी आले आणि फ्रेश होऊन ऑफीसला निघाले. तीन दिवस सतत काही ना काही दुखत होत. पण म्हटल कोणतेही औषध घ्यायची गरज नाही. माऊली बर करणार आणि तसच झालं तीन दिवसांनी गाडी रुळावर आली...पण एक बदल झाला होता...

माझ्यातला बराचसा आळशीपणा कमी झाला होता. विनाकारण असणार्‍या तक्रारी कमी झाल्या होत्या. स्फुर्ती आणि शक्ती वाढली होती. जणू नव्यानेच मी स्वतःला सापडली होती. विचारचक्र सतत वारी भोवती फिरत होते. 

तेव्हा लक्षात आले की ही साधीसुधी वारी नाही...ही वारी म्हणजे एक न संपणारा प्रवास आहे. जीवा पासून शिवा पर्यंतचा प्रवास आहे. आता पहा ना सासवडहून निघालो ते थेट माऊलीने जेजुरीलापोहचवल. खंडोबाकडे...म्हणजेच शिवाकडे...याचाच अर्थ हे माऊलीने प्रत्यक्ष पटवून दिले.

जन्माला आल्यानंतर मृत्य़ूपर्यंत जीव हा प्रवासच करत असतो. रडत-खडत कुढत हा प्रवास करण्यापेक्षा आयुष्याचीच वारी करण्यास हवी हा मोठा अर्थबोध मला येथे झाला.
आता नको नाती सारी
याचे पायी माझी वारी
पिपा म्हणे आपुली दिंडी
नेऊ वैकुंठाच्या दारी
जेथे उभा बापू हरि |

प्रत्येकाने खर तर आपल्या आयुष्यात पाहीले पाहीजे. माझ आयुष्य म्हणजे दिंडी आहे की नुसतच धक्काबुक्कीचा, स्पर्धेचा, असुयेचा प्रवास आहे हे ऍनालॅसिस केले पाहिजे. आयुष्य दिंडी होण्यासाठी एक ध्येय ठरवून त्यासाठी नेटाने मार्गक्रमण केले आणि परमेश्वरी तत्त्वावर दृढ विश्वास ठेवला तर आयुष्य दिंडी आपोआप होईल. पण हो ध्येय आणि मार्ग पावित्र्याच्या चौकटीतच हवं बरं का! उदाहरण घ्यायचे तर सीमेवर लढणार्‍या जवानांचे आयुष्य दिंडीच नाही का? "रात्रंदिनी आम्हा युद्धाचा प्रसंग" म्हणत ते भारतमातेची सेवा करित असतात. एकाच रुटीन मध्ये घरात सर्वांसाठी निष्काम भावनेने कार्यरत असणारी आई...हिच आयुष्य ही दिंडीच नाही का? चांगल्या भवितव्यासाठी झपाटून अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्याचे आयुष्य दिंडीच नाही का? ही प्रत्येकाची दिंडी त्याला वैकुठांच्या द्वारी न्यायची असते. 

आपले आयुष्य खर तर वारीच असते आणि गृहस्थाश्रम ते वानप्रस्थाश्रम ह्या दिंड्या. पण याची जाणिव मात्र परमेश्वरावर विश्वास असल्यावरच होते. अस मला वाटते.

आता पहा ना महान शास्त्रज्ञ डॉ. निकोला टेसला (http://www.newscast-pratyaksha.com/hindi/category/pratyaksha-lekhmala/dr-nikola-tesla/) याचे आयुष्य वारीच आहे आणि त्याने लावलेला प्रत्येक शोध हा त्या वारीतील दिंडी आहे अस मला वाटते.  हा ही एक वारकरी. दिंडी म्हणजे काय? एक श्रद्धावानांचा समुह. जो गजर नामस्मरण करत पुढे चालत राहतो. बरोबर. माझ्या आयुष्यातील दिंडी म्हणजे माझ्यातील सदगुणांचा समुह आहे अस मला वाटते. जे एकत्र येऊन नामस्मरण आणि गजर करत..कार्य करत आयुष्याच्या वारीचे एक भाग बनतात. अशा सदगुणांना एकत्र आणून आयुष्याची वारी करुन मला विठ्ठल चरणी स्थिर होऊन वैकुंठात स्थिर होणे हेच जन्माला येण्याचे एकमेव कारण असते. यासाठी काय फार मोठ करण्याची गरज नसते.

माझे काही मित्र यावर्षी पंढरपूरला अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटकडून (http://www.aniruddhasadm.com/ , https://twitter.com/aniruddhasadm)  सेवेसाठी गेले आहेत. एक जण डॉक्टर आहे. एक इंजिनियर आहे. एक तर चक्क वकिल आहे. पण सगळे आपल प्रोफेशन विसरुन आज आषाढी एकादशीला क्राऊड मॅनेजमेंटची सेवा करित आहेत. जवळपास असे ३०० कार्यकर्ते तिथे सेवा करित आहेत...त्यांच आयुष्य काय एक दिंडीच झाली ना!! सदगुरुच्या पायांशी नेणारी सेवा दिंडी. 

नको राऊळी नको मंदीरी...
जिथे राबती हात तेथे हरि....
आज हा प्रत्येक कार्यकता देखील माऊलीच झाला. या मंडळीना पण काम असतील..त्रास असतील..संकट असतील पण सर्व काही बाजूला सारुन सर्व नकारात्मक गोष्टींवर वार करुन हे देखिल वारकरीच आहेत अस मला वाटत. अगदी एकही पाऊल न उचलता एकाच जागेवर उभे राहून केलेली ही सेवा वारी...आणि मला अभिमान आहे की मी देखील यांच्यासारखीच एक "वारकरी" आहे. 
तुमचं काय? स्वतःमधील वारकऱ्याचा शोध घ्या. 
।। जय हरी विठ्ठल ।।
मी एक वारकरी - अनिरुद्धाज ऍकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंटचा डीएमव्ही (डिझास्टर मॅनेजमेंट व्हॉलेंटियर अर्थात डॅड(बापू) माऊलीचा वारकरी)
- रेश्मा नारखेडे