Tuesday, July 28, 2015

डॉ. अब्दुल कलाम सर आजही आपल्या बरोबर आहेत...

Dr. A. P. J. Abdul Kalam
Dr. A. P. J. Abdul Kalam

भारताचे राष्ट्रपती कोण? हा प्रश्न मला आजही विचारला तरी आधी माझ्या डोळ्यासमोर येतात ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम. पण त्यांचे नाव उच्चारण्याआधीच भानावर येते आणि जाणिव होते की ते माजी राष्ट्रपती आहेत. सद्य नाही. परंतु #राष्ट्रपती म्हणून तेच माझ्या स्मरणशक्तीत फिक्स्ड झाले आहे. 

त्यांचे काल अचानक झालेले निधन ही बातमी खरंच धक्कादायक होती. पण सृष्टीचा नियम "आला तो जाणारच" असा आहे. पण कसा जातो आणि काय करुन जातो हे मात्र आपल्या हातात असते. ह्याची जाणिव आपल्याला होते ती #मिसाईल मॅन डॉ. कलाम सरांच्या जीवन प्रवासावरुन.

देशातील कोवळ्या कळ्यांना योग्य त्या दिशेने खुलवण हे कर्म ज्यांनी धर्म म्हणून स्विकारला त्या डॉ. कलामांना ते कार्य करतानाच "वीरमरण" आले अस मला वाटते. #युद्धभूमीत मायभूमीची सेवा करताना एका जवानाला जसे मरण येते तसेच मरण डॉ. कलामांना कर्मभूमीवर मिळाले. एखाद्या कर्मयोद्धाला शोभेल असेच वीरमरण त्यांना प्राप्त झाले. 

यात काल एक कटू सत्य देखील मी अनुभवल. किंबहुना आपण सार्‍यांनीच अनुभवले. एखादी मौल्यवान गोष्ट जेव्हा आपल्या हातातून सुटून जाते तेव्हाच तीची किंमत कळते आणि मग हळहळण्याशिवाय आपल्या हाती काहीच उरत नाही. महापुरुष, पुण्यात्मे आणि संताबाबतही असच होत. ते असतात, ते कळकळीने काही सांगत असतात, आपले कार्य करित असतात....प्रबोधन करित असतात....आणि आपण मात्र झोपा काढत असतो. मग असा पुण्यात्मा आपला कार्यकाल संपवून जेव्हा भर्गलोकी निघून जातो तेव्हा आपण खड्‍कन जागे होतो. तेही काहीतरी अनमोल गमावल्याच्या दुःखाने, पश्चातापाने आणि हळहळीने. आणि हातात केवळ तेच रिकामे भांडे उरते. 

पण या पुण्यात्मांचे तसे नसते ते त्यांची उणिव कधीच भासू देणार नाही अशी तरतूद करुन जातात. आपल्या विचारांमधून..आपल्या कार्यांमधून.....पण पुढची सगळी जबाबदारी आपली असते. आपण आपली जबाबदारी पार पाडतो का? हा प्रश्न आहे. 

भारताने असे अनेक पुण्यात्मे जन्माला घातले. पण त्यांना आपण केवळ जयंती आणि पुण्यतिथीला आठवतो. गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होणारा किंवा टिळक तुम्ही हवे होता असे म्हणणारा नायक हा चित्रपटातच पाहायला मिळतो. हे दुर्दैव.

काय गम्मत आहे पहा ना! या एकेका पुण्य़ात्माच्या चरित्रामधून दुसरा पुण्यात्मा जन्माला घालण्याची ताकद असते. मग अडतय कुठे याचा विचार व्हायला हवा. 

काल डॉ. कलाम गेले आणि त्यांचे विचार, कार्य, महानता हे सांगणारे असंख्य़ मॅसेजेस आले. जवळपास प्रत्येक मॅसेज मी वाचला आणि तो मॅसेज कुणी पाठवला तेही पाहिले. आज एकूण सार्‍यांचेच कलाम प्रेम उफाळून आले. खर तर यायलाच पाहिजे पण ते एका दिवसासाठी नको. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यरत राहणारे डॉ. अब्दुल कलाम यांना खरी श्रद्धांजली म्हणजे हे RIP मॅसेज नाही तर त्यांनी जगाला दिलेला मॅसेज फॉलो करणे हा आहे. त्यांचे स्वप्न सत्यात आणणे ते आहे. 

मी फार मोठा काही तीर मारु शकत नाही कदाचित....पण ज्या डॉ. कलामांचे शिक्षणावर प्रेम होते ते शिक्षण तरी मी नीट पूर्ण केले पाहीजे. ज्या डॉ. कलमांनी मातृभूमीतच आपल्या संशोधनाने कमाल केली त्या वैज्ञानिक डॉ. कलामांचे अनुकरण करुन माझ्या शिक्षणाचा फायदा देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे, अस मला वाटते. 

आज आम्हा सर्वांना त्यांचा खूप आदर आहे. पण त्यांच्या शिकवणीतील किती गोष्टी अमलात आणल्या आहेत आजपर्यंत? मला अस वाटते अनेकांना काल संध्याकाळ पासून त्यांच्या कार्याची माहिती होऊ लागली असेल. अनेकांना त्यांचे इंडीया २०२० मिशन कालच कळले असेल. तर काहींना हे सारं आधीच माहित असेल आणि त्यांच्या आपल्यातून निघून जाण्याने पुन्हा एकदा आठवले असेल. मग जो काही हा कलामनामा आहे तो तसाच आठवणीत राहू द्यावा आणि पुन्हा एकदा देशाच्या अनेक कोपर्‍यांमधून डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम जन्माला यावेत....अस मला वाटते....

परवाच एक रिक्षावाला मला बोलत होता..."क्या मॅडम क्या बताऊ आपको...मेरे रिक्षा में मेरे बेटो-बेटी के उमर के बच्चे बैठते है। और नशा करते रहते है। पढे लिखे है पर उसका कुछ परिणाम उनपे दिखता नही। सिर्फ कमाना और उडाना यही उन्हे पता रहेता है। अपने मॉं-बाप को भी ये सॅंभाल नही सकते देश क्या सॅंभालेंगे? और जिनके हाथो देश सॅंभालने की ताकद होती है वो मेरे रिक्षा भी नही देख सकते क्योंकी वो इस देश मे ही नही रेहते। और ये दोनो के बीच मैं जो है वो अपने काम, संसार और खूद की जिम्मेवारीसे परेशान है वो देश का क्या सोचेंगे? क्या होगा इस देश का?"  खर तर ही परिस्थिती सत्य आणि गंभीर आहे. 

पण त्या रिक्षावाल्याचा चिंताग्रस्त चेहरापाहून मी एकच बोलू शकले, "जो होगा वो मंजूरे खुदा होगा। आपके मन में जैसे यह सवाल आया है वैसा सवाल हर एक मन मे आए तो कुछ अलग हो सकता है। और उसके लिए हमारा देशप्रेम सच्चा और पक्का होना चाहिए। और वो हरपल जागृत रहना चाहिए।"

असेच "सच्चा और पक्का देशप्रेम" हे डॉ. अब्दुल कलाम सरांचे आहे...म्हणूनच ते प्रत्येकावर प्रभाव पाडू शकले..प्रगती करु शकले व देशालाही प्रगतीच्या दिशेने नेऊ शकले.....असे मला वाटते.....

श्रद्धांजली वाहीली की आपण मान्य करतो की ती व्यक्ती आपल्यात नाही....
आज मला डॉ. ए. पी. जे.  अब्दुल कलाम सरांना आदरांजली अर्पण करावीशी वाटतेय....
कारण ते आपल्याला सोडून गेलेले नाहीत.....
...त्यांचे प्रेरणादायी विचार...मार्गदर्शन...आजही आपल्या बरोबर आहे....

- रेश्मा नारखेडे

Dr. A. P. J. Abdul Kalam Sir Quotes

You have to dream before your dreams can come true.

#Excellence is a continuous process and not an accident.

Life is a difficult game. You can win it only by retaining your birthright to be a person.

Man needs his difficulties because they are necessary to enjoy success.

We will be remembered only if we give to our younger generation a prosperous and safe India, resulting out of economic prosperity coupled with #civilizational heritage.

Those who cannot work with their hearts achieve but a hollow, half-hearted success that breeds bitterness all around.

Educationists should build the capacities of the spirit of inquiry, creativity, entrepreneurial and moral leadership among students and become their role model.

Look at the sky. We are not alone. The whole universe is friendly to us and conspires only to give the best to those who dream and work.

If a #country is to be corruption free and become a nation of beautiful minds, I strongly feel there are three key societal members who can make a difference. They are the father, the mother and the teacher.

My message, especially to young people is to have courage to think differently, courage to invent, to travel the unexplored path, courage to discover the impossible and to conquer the problems and succeed. These are great qualities that they must work towards. This is my message to the young people.


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Monday, July 27, 2015

अनिरुद्ध बापू यांचे जुने फोटो

#aniruddhabapu, #oldphotos #memories
माझे सद्गुरु अनिरुद्ध बापू यांचे  जुने फोटो समिरदादांनी नुकताच प्रकाशित केले. हे एक आठवणीचे गाठोडे माझ्या ब्लॉगवरही असावे म्हणून इथे पुन्हा देत आहे. 

Param pujya aniruddha bapu in shirdi rasayatra
श्रीक्षेत्र शिरडी रसयात्रा - दिनांक २२-०९-१९९६ रोजी रात्रौ ११ वाजता सुरु झालेला सत्संग पहाटे ३.३० पर्यंत सुरु होता.
 त्यावेळी पहाटे ३.३० वाजता बापुंच्या मुखातून ब्रह्म वाणी स्त्रवली. 
“मी जो कोणी आहे तो आहे. मी ऋत आहे. मी नित्य आहे व मी सत्य आहे. 
माझा आणि माझ्या गुरुचा युगानुयुगे संबंध आहे” त्यावेळी घेतलेला फोटो.

Param pujya aniruddha bapu in shirdi rasayatra
श्रीक्षेत्र शिरडी रसयात्रा - उत्सवाच्या दुसर्या दिवशी रसयात्रेच्या सांगता समारोपाच्या वेळी 
परमपूज्य बापू व परमपूज्य नंदाईने पेरु या फळाचा प्रसाद सर्वांना वाटला. 
तो प्रसाद स्विकारताना श्री.सुहाससिंह डोंगरे.
परमपूज्य बापूंच्या मागे सौ.मीनावैनी दाभोलकर उभ्या आहेत.
दिनांक : २३-०९-१९९६


Param pujya aniruddha bapu in akkalkot rasayatra
श्रीक्षेत्र #अक्कलकोट रसयात्रा - जिथे निवास केला होता तिथे श्रद्धावानांबरोबर गजर करताना 
परमपूज्य बापू व परमपूज्य सुचितदादा.
(स्थळ : सर्जेराव जाधव सभागृह, अक्कलकोट)

Param pujya aniruddha bapu in akkalkot rasayatra
श्रीक्षेत्र अक्कलकोट रसयात्रेच्या वेळी श्रद्धावानांबरोबर भोजन करताना परमपूज्य बापू व परमपूज्य सुचितदादा.
 (मागील रांगेत श्री. व श्रीमती महागांवकर, सौ.अनितावीरा वागळे, 
श्रीमती वागळे आणि स्टेजवर उभा कार्यकर्ता सेवक शरदसिंह नागवेकर)
दिनांक : १२-०९-१९९७ (रसयात्रा - ११-०९-९७ ते १४-०९-९७)



Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Thursday, July 23, 2015

बाहुबलीच्या निमित्ताने....


सध्या एका चित्रपटाने माझ्या मनावर चांगलीच पकड घेतली आहे....तो म्हणजे बाहुबली....
या चित्रपटाने मला इतके प्रभावित केले की आत्तापर्यंत मी तीन वेळा हा चित्रपट पाहिला.
एशियंट काय असते ते या चित्रपटातून कळते.
प्रथमता...
भारतीय स्त्रीचे खरे रुप खरी शक्ती काय आहे ते कळते.
राजमाता असणारी शिवगमी
शिवदुचा सांभाळ करणारी...
अवंतिका...असो की देवसेना...
या सर्व स्त्रीया किती शक्तीवान होत्या हे चित्रपटातून प्रकर्षाने जाणवते. शिवदूला जीवंत ठेवण्यासाठी राजमातेचा अट्टाहास विलक्षण. शिवदूला जलपर्वत ओलांडण्यापासुन रोखण्यासाठी महादेवाला अभिषेक करण्याचा अट्टाहास विलक्षण.,,
स्त्रीयांचा कणखरपणा यात ऍप्टली दाखविला आहे. आज स्त्रीला दुबळे, अबला म्हणाणार्‍या लोकांनी आणि स्वतःला दुबळ्या, अबला समजणार्‍या स्त्रीयांनी ही पात्र नक्कीच पहावी. जर असे वाटेल की हा तर चित्रपट आहे....कल्पनाविलास आहे....तर निश्चितच सांगू शकते की या स्त्रीयांना पाहून आपल्याला जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई यांची नक्कीच आठवण होईल. त्या नक्कीच काल्पनीक पात्र नव्हत्या. मग जस जसा काळ पुढे सरकत गेला तस तसा स्त्रिया अबला दुर्बल कशा बनल्या की त्यांना तस मुद्दामून बनवले गेले ह्याचा विचार व्हायला हवा आणि या दुर्बलतेचा पडदा दुर सारुन परमेश्वराने उपजतच बहाल केलेल्या सक्षमतेचे आत्मदर्शन घ्यावे. मग सार्‍याच गोष्टी बदलतात. प्रसुती वेदनेसारख्या कळा स्त्री सोसते आणि एका नव्या जीवाला जन्माला घालते तीची क्षमता आणि सक्षमता अपरंपार असते हे विसरता कामा नये.
हातात बाळ असताना देखील दगाबाजाला एका फटक्यात ठार करण्याचे सामर्थ्य त्या शिवगमीत आहे तसेच स्वतःच्या मुलाच्या बाबतीत पक्षपातीपणा न करता केवळ सच्ची राजनिष्ठा आणि देशप्रेम ध्यानी ठेवून प्रत्येक निर्णय घेणारी कणखर स्त्री आहे. तीच्या कणखरपणामुळे बाहुबलीची पुढची कथा अस्तित्वात येते. तसेच बंदीवान असतानाही बल्लाळच्या चितेची तयारी करणारी देवसेना म्हणजे विश्वासाचा उच्चतम शिखर...की तीचा मुलगा येणारच....अजूनही अर्धा चित्रपट यायचा आहे त्यामुळे या पात्रांबद्द्ल अजून माहीती त्यान्ंतरच मिळू शकेल. पण हो असेही लोक आपल्या संस्कृतीत, या जगात झालेले आहेत. याची साक्ष डॉ. अनिरुद्ध जोशी यांचे दैनिक प्रत्यक्षमधील वैश्विक इतिहासाचे अग्रलेख वाचताना पटते. हे अग्रलेख वाचनात आहेत म्हणूनच हा चित्रपट अधिक भावला.

दुसरा महत्त्वाचा भाग म्हणजे एकाच आईचे दुध पिऊन सुद्धा दोन बलशाली योद्धे नायक आणि खलनायक बनतात. समान ताकद, समान बुद्धीमत्ता सर्व काही समान...परंतु प्रेम आणि करुणा ह्या दोन गोष्टी बाहुबली आणि बल्लाळ यांचे वेगळेपण ठरवितात. सगळ्यात लक्षात राहणारा प्रसंग म्हणजे बल्लाळदेवची मुर्ती उभी करताना केवळ बाहुबलीच्या नाम गजराने सर्व वातावरण बदलले जाते. जनतेच्या मनातील त्याचे प्रेम आदर उफाळून बाहेर येत व अंगात चैतन्य येते....सारं वातावरणच क्षणात बदलते. हा प्रसंग विशेष मनात ठसला. आणि मग बल्लाळदेवची सोन्याची मुर्ती उभी राहील्यावर त्याच्या कितीतरी हजारोपट उंच....सर्वार्थाने उंच अशी प्रतिमा सर्वसामान्य जनतेच्या मनात असल्याचे दर्शविले गेलेले आहे.

बाहुबलीचे पात्र पाहताना ठायी ठायी शिवरायांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. कारण असा जनतेचा राजा अखंड हिंदुस्थानाने अनुभवला आहे. आजही त्यांचे चरित्र वाचताना अंगावर शहारा उभा राहतो. असे हे थोर राजे महाराजे आपल्या भारतात जन्माला आले आणि आपण मात्र केवळ त्यांचे गोडवे गातोय आणि पाश्चात्य संस्कृतीचे तळवे चाटतोय. इथेच सारा घात झाला. हे जेव्हा थांबेल तेव्हाच आपल्याला आपली ताकद कळेल. आपल्या भारतीय संस्कृती सर्वात श्रेष्ठ आहे आणि या संस्कृतीत मूळ माता चण्डीका मोठी आई हीच अती उच्चतम स्थानावर वंदनीय आहे. त्याची छोटीशी झलक देखील या चित्रपटात पाहण्यास मिळते. ती म्हणजे महिष्मती देवीच्या नावावरच सारे साम्राज्य...युद्धाआधी देवीची आराधना.....

असे अनेक पैलु या चित्रपटात दडलेले आहेत.....

सर्वात महत्त्वाचे म्हणजे बाहुबली आणि शिवदुची ताकद....त्यांचीच नाही तर बल्लाळ, कटप्पा, अवंतिका यांची ताकद. पूर्वी येवढे बलशाली राजे महाराजे सर्वजण होते. एका सामान्य सैनिकाची ताकद ही अफाट होती. मग आज आपण सगळे असे का? आज फक्त दंड फुगवून स्टाईल मारण्यासाठी सर्व बाहुबली होतात. पण समाजाचे, देशाचे किमान आपल्या कुटुंबीयाचे पर्यायाने संस्कृतीचे संरक्षण करण्याचे बळ ही त्या बाहुंमध्ये ही नसते. मग काय अर्थ आहे अशा बाहुबलीला. व्यायाम हा शरिराचा असतो त्याच बरोबर मनाचा ही असतो. भारतीय प्राच्यविद्यांमधून शरिर जसे घडते तसे मनही घडते. म्हणून कदाचित बलशाली देहाचे, अफाट ताकदीचे पुरुष हृदयाने कोमल असत. प्रेम व करुणा त्यांच्या मनात वसे आणि म्हणूनच कदाचित ते जनतेचे लाडके असत....कारण भारतीय प्राच्यविद्या शौर्य शिकविते कौर्य नाही. म्हणून शत्रुलाही शरण आल्यानंतर अभय देण्याचे धैर्य त्यांच्यात असे...कारण शत्रुचा पलटवार परतुन लावण्याची ताकद त्यांच्यात असे. दैनिक प्रत्यक्षमधील रमेशभाई मेहता यांच्या सुरु असलेल्या मुलाखतीतून हे समजून येते. म्हणून देखील हा चित्रपट अधिक जवळचा वाटला....पण या शौर्याला अंहकार, मत्सर आणि स्वार्थाची हवा लागली की त्याचे कौर्यात रुपांतरण होते तेच बल्लाळदेवचे झालेले आपण पाहतो.

सगळ्यात शेवटचा धक्का म्हणजे विश्वासघात........कटप्पानेच बाहुबलीला कपटाने मारले. पुढील भागत पुढची स्टॊरी कळेल. पण हा शेवट येईपर्यंत कटप्पाची निष्ठावान सेवा संपूर्ण चित्रपटात दिसून येते. खरच त्यावेळी वाटते की निष्ठावान असणे म्हणजे काय...तर कटप्पा कडे पहावे. पण शेवटी कटप्पानेच बाहुबलीला मारले हे कळल्यावर खूप मोठा धक्का बसला. मात्र यात काहीतरी कारण असेलच....पण एक गोष्ट शेवटी चित्रपट सहज सांगून जातो ते म्हणजे साम्राज्याची, हिंदुस्थानाची वाताहत झाली ती विश्वासघातासारख्या शस्त्रानेच. यासारखे जालीम व प्रभावी शस्त्र नाही. आणि हा विश्वासघात देशाशी...राष्ट्राशी कशासाठी? तर आपल्या फुटकळ स्वार्थापायी, अहंकारासाठी, मत्सरापोटी....आणि आजही ते सुरु आहे.....

जेव्हा हा स्वार्थ जाऊन केवळ राष्ट्रार्थ भाव उरेल तेव्हा पुन्हा आपला हिंदुस्थान "भारतवर्ष" सुवर्णाप्रमाणे लखलखत असेल.

 पण हे कितीतरी कठीण आहे कारण आपल्याच मनातील अनेक वृत्रासूर ठार होणे आवश्यक आहे....

कठीण आहे अशक्य नाही...

॥ॐ नमःश्चण्डिकायै॥

बाहुबलीच्या निमित्ताने मनात आलेले विचार मांडले आहेत...


- रेश्मा नारखेडे

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Thursday, July 16, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - २ (सात प्रश्नांचे विवरण व बेसिक ब्लॉग रेडी)

काल तुम्हाला ब्लॉग बनविण्यापूर्वी सात प्रश्नांचा विचार करावयास सांगितला होता. ते का आणि ब्लॉगची सुरुवात कशी करायची हे आपण आज पाहू.

मी सांगितलेला पहिला प्रश्न म्हणजे

१) मी कोण आहे? 
म्हणजेच इथे तुम्हाला विचार करावा लागणार की तुम्ही कोण आहात? मी अमुक अमुक आहे....पण म्हणजे नक्की कोण? माझी खासियत काय? माझ्यातील चांगले गुण, कला काय? याचा विचार तुम्हाला करावा लागणार. तुम्ही ब्लॉग करता म्हणजे एक प्रकारे तुमची एक डीजीटल छबी तयार होत असते. ही ऑनलाईन पर्सनालिटी तुम्हाला कशी दाखवायची आहे? तुम्ही आहात तशी की त्याहूनी वेगळी. तुम्ही म्हणजे नक्की काय? तुमची तत्त्वे काय? तुमचा ब्लॉग वाचावयास येणार्‍या वाचकाला तुमची काय ओळख तुम्ही करुन देणार. हे या प्रश्नांतर्गत ठरवायचे असते. मग यात तुम्ही कोणती तत्त्वे फॉलो करता....तुमचा विश्वास कशावर आहे इथ पासून तुम्हाला काय आवडते इथ पर्यंत तुम्ही काहीही देऊ शकता. अथवा इच्छा नसेल तर नाही दिले तरी चालेल. पण हा प्रश्न स्वतःला मात्र नक्की विचारावा की, मी कोण आहे? 

२) मला ब्लॉग का करायचे आहे?
मी कोण आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग का करायचा आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे. यामुळे ब्लॉगच्या प्रती फोकस्ड आणि प्रामाणिक राहण्यास आपल्याला मदत होते. ब्लॉग हा वैयक्तीक असो किंवा व्यवसायिक किंवा काही उदात्त कारणांसाठी सुरु केलेला असो....जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर डोक्यात भिनत नाही तोपर्यंत आपण फोकस्ड होत नाही हा माझा स्वानुभव आहे.

३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
एकदा का आपण ठरविले की ब्लॉग बनवायचा मग त्यातील विषय काय असणार याची लिस्ट करावी. मी कोणकोणत्या विषयावर लिहु शकतो/शकते....कोणत्या विषयावर लिहले तर ते वाचकांना आवडू शकेल....मी कोणत्या विषयात तज्ञ आहे अथवा कोणता विषय मला आवडतो याचा विचार करावा. मग त्या विषयातील उप विषयांची लिस्ट करुन घ्यावी आणि त्या उप विषयांमधील प्रत्येक विषयाचे स्मॉल स्मॉल टॉपिक लिहावेत. किंवा एकच विषय घेऊन तुम्ही त्यावर दीर्घ लिखाण करु शकता. परंतु या सगळ्याचे प्लॅनिंग आधीच करणे आवश्यक आहे.

तुम्हाला मुक्त लिखाण करायचे असेल तर तसही तुम्ही करु शकता. रोजच्या अनुभवांवरुन कदाचित तुम्हाला रोज नवे विषय सुचू शकता. किंवा ताज्या घडामोडींवर तुम्ही आपले मत व्यक्त करु शकता. असा कोणताही टॉपिक तुम्ही निवडू शकता. साध सरळ सोप्प वाचायला सामान्यपणे सगळ्यांना आवडते. कोणतीही माहीती यांत्रिकपणे न देता आपल्या अनुभवांची जोड त्यास दिली तर ते लिखाण अधिक भावते. 

४) ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपला ब्लॉग हा कोणत्या भाषेतून असणार आहे याचा देखील विचार करावा.

५) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
विषय निवडल्यानंतर विषयानुरुप ब्लॉगला आपण नाव निवडू शकतो. ब्लॉगचे नाव निवडताना ते काळजीपूर्वक निवडावे. कारण तीच तुमची ओळख बनते. ब्लॉगला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.

६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचकांचे वय, त्यांची मानसिकता, त्यांचे स्टेटस इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज ठेवून लिखाण करणे देखील आवश्य़क आहे. खरे तर तुम्हाला जे हवे ते व तसे लिखाण तुम्ही करु शकता. पण आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग कोण असणार आहे हे ओळखणे  अत्यंत आवश्यक आहे. उदा. आयटीशी संबंधीत जर तुमचा ब्लॉग असेल तर त्या क्षेत्रातील मंडळीच तुमचा ब्लॉग वाचतील किंवा कवितांचा ब्लॉग असेल तर कविता आवडणार्‍या व्यक्तीच तुमचा ब्लॉग वाचतील. मग अशा वेळी इतर क्षेत्रातील मंडळींना देखील तुमच्या क्षेत्राशी अथवा ब्लॉगशी आपुलकी वाटली पाहीजे असे कंटेन देखील तुम्ही देऊ शकता. तसेच जसा तुमचा वाचक वर्ग असेल त्याच दर्ज्याची भाषा वापरणे हिताचे ठरते. अर्थात हे सगळ सुरुवातीला नाहीच कळत पण या गोष्टींचा अंदाज प्रथम दिवसापासून घेणे आवश्य़क आहे. 

७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?
आता सर्वात शेवटी तुमची युआरएल काय असेल हे ठरवावे. ती तुमच्या नावाची असेल किंवा ब्लॉगच्या नावाची असेल. काहीही तुम्ही निवडू शकता. तुमच्या प्राथमिकतेनुसार. 

आता या सात प्रश्नांची उत्तर पाहिल्यानंतर आपण ब्लॉग तयार करणार आहोत.
ब्लॉग तयार करण्यसाठी अनेक फ्री वेबसाईट आहेत. त्यातील ब्लॉगर (Blogger.com) वर आपण ब्लॉग बनवायला शिकणार आहोत. यासाठी तुमच्याकडे जीमेलचा इमेल अ‍ॅड्रेस असावा लागतो. 

१) तुम्ही आधी जी मेल लॉग-इन करुन इनबॉक्स मध्ये जा.


२) मग उजवीकडील कोपर्‍यात असणार्‍या बॉक्सच्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्या लिस्टमधून ब्लॉगरचे ऑप्शन निवडून त्यात क्लिक करा. 

३) एका नवीन विंडॊ मध्ये ब्लॉगरचा डॅशबोर्ड ओपन होईल. याच बरोबर तुम्ही थेट ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) ला जाऊन जीमेलच्या आयडी पासवर्डने लॉग-इन करुन देखील डॅशबोर्डवर जाऊ शकता.


५) डॅशबोर्डवर तुम्हाला "न्यू ब्लॉग" (New Blog) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही कितीही ब्लॉग एका आय डीवरुन करु शकता. इथे मी आधीच एक टेस्ट ब्लॉग केलेला ही दिसत आहे. 

६) आता एक छोटी नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ब्लॉगचे टायटल (नाव) व अ‍ॅड्रेस (युआरएल) विचारेल. 

आपण हे आधीच ठरविलेले आहे. त्यामुळे ते तिथे भरावे. ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर वेरिफाय करेल आणि जर तसा दुसरा कोणताही पत्ता आधीच असेल तर तशी सुचना तुम्हाला मिळेल व तुम्हाला युआरएल थोडी बदलून टाकावी लागेल. ही माहीती नंतर बदलता ही येते पण शक्यतो बदलू नये त्यामुळे विचारपूर्वक निवड करावी. मग खालच्या विंडॊमधील कोणतेही एक टेंपलेट निवडावे. टेंपलेट म्हणजे तुमचा ब्लॉगचे सर्वसाधारण डिझाईन. त्याचे काही तयार पर्याय ब्लॉगर आपल्याला देतो. त्यात आपण आपल्याला हवा तसा बदल देखील करु शकतो. 
शेवटी क्रीएट ब्लॉगवर क्लिक करावे. 


७) आता तुम्ही ब्लॉगच्या ओव्हर व्हू या पेजवर याल.

 तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे. या पेजवर तुम्हाला सर्वच ऑप्शन दिसतील. येथील वरील व्ह्य़ू ब्लॉग या पर्यायावर क्लिक करुन तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.


८) हा पहा तुमचा ब्लॉग. तुमच्या ब्लॉगच्या युआरएलवर हा ब्लॉग असा दिसेल. यातील क्रमांकाचे विवरण पाहू
१. हेडरबार (ब्लॉगचे नाव/मथळा)
२. पोस्ट एरिया 
३. गॅझेट एरिया
४. बॅकग्राऊंड 
५. फुटर

आता पुढील भागात इतर गोष्टींची माहीती करुन घेऊ.

READ PART 1 HERE


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, July 15, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

आपल्याला इतिहास कसा कळला? तर अनेक दस्तावेज, बखरी, शिलालेख यामधील नोंदीमधून. या नोंदी होत गेल्या आणि आपल्याला तेवढ्यापुरता इतिहास कळला पण इतिहासात अशा अनेक घटना असतील की ज्याच्या नोंदी झालेल्या नाहीत.....मग त्याचे काय? हा इतिहास आपल्यापुढे झाकलॆलाच नाही का? म्हणजे "नोंद" या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. देशाच्या, जगाच्या इतिहासात किंबहुना माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील नोंदीचे महत्त्व तितकेच आहे. म्हणून सांगितले जाते प्रत्येकाने स्वतःची एक डायरी लिहावी. पुढे ही डायरी वाचताना आपल्या आयुष्यातील चढ उतार आपल्याला उमगत जातात व पुढील आयुष्य सुकरपणे जगण्यास मदत होऊ शकते. 

मानवाला विस्मृतीचा शाप आहे. त्यामुळे महत्त्वाच्या घटना विस्मृतीत न जाऊ देण्यासाठी आपण नोंदी करायला सुरुवात केली पाहिजे. आज या नोंदीचे डिजिटल आणि मिडीयामध्ये रुपांतरित झालेले अतीव्यापक स्वरुप म्हणजे ब्लॉग्स. अर्थात येवढा संकुचित देखील  अर्थ या ब्लॉग्सचा नाहीए. ब्लॉग्स ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. खर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संकेतस्थळ असेही आपण म्हणू शकतो. एक वैयक्तिक संकेतस्थळ म्हणून आपण ब्लॉग्सचा वापर करु शकतो.

सुरुवातीला केवळ तांत्रिक विषयाची माहिती देणारे ब्लॉग असायचे पण आता अनेकविध विषयांवर खुप सुंदर सुंदर ब्लॉग्स आहेत. ज्याच्याकडे एखादा छंद आहे आणि तो त्याला जगापर्यंत पोहोचवायचा आहे तो ब्लॉगच्या माध्यमातून सहज आणि फुकट पोहचवू शकतो. काहीजण केवळ ब्लॉगच्या निमित्ताने संवाद साधत असतात आणि हे वाचणारा वर्ग खूप अधिक आहे. इन शॉर्ट तुम्हाला तुमचे विचार मांडावेसे वाटत आहेत. जगासमोर आपली कला मांडायची आहे? किंवा नेहमीच्या रुटीनमधून काही परिपक्व असा विरंगुळा करायचा आहे तर निश्चितच ब्लॉग सुरु करु शकता. 

संसाराच्या गराड्यात अडकलेल्या होम मेकरला आपल्या रेसिपीज, काही अनुभव शेअर करायचे आहेत....एकट्या राहणार्‍या वृद्ध आज्जी आजोबांना आपले मन मोकळे करायचे आहे तर ते देखील अगदी सहज ब्लॉग सुरु करु शकतात. तुम्हाला अस वाटेल की माझ्या मेलीचे कोण वाचणार? तर तस नाहीए. आजची डीजीटल सॅव्ही पिढी माहिती नेटवरुन शोध करुन मिळवित असते. त्यांना ही माहिती, आपला अनुभव फायद्याचा ठरु शकतो. कुणाची व्यथा तुमच्या व्यथेशी जुळू शकते..आणि भावनांना वाट मोकळी करुन देता येऊ शकते.....
कुणाचा आनंद तुमच्या आनंदात मिसळून जाऊ शकतो....तर कुणाला खूप चांगल लेखन वाचण्यासाठी मिळू शकते....कुणाला त्यांच्या क्षेत्रात तुमचा अनुभव फायदेशीर ठरु शकतो....

समाजात एक चांगला विचार देण्याचे काम आपला ब्लॉग करु शकतो. आपला विचार जनमतही तयार करु शकतो. या ब्लॉगचा व्यवसाय देखील करतात....आपल्याला आपले अस्तित्व जगासमोर मांडण्याची नामी संधी ब्लॉगच्या माध्यमातून मिळते. माझा स्वानुभव म्हणजे मला खुप छान वाटते. समाधानी वाटते.....की आपल्या आयुष्यात कुणी ऐकणारे असो किंवा नसो.....मुझे जो कहेना है वो कहेना...आणि मी ते माझ्या ब्लॉगमधून बोलू शकते. अर्थात सर्व नैतिक मर्यादा पाळूनच. कारण यशाच्या शिखराचा पाया मर्यादा आहे असे मी मानते. 

आयुष्याच्या एका नैराश्याच्या क्षणाला मी ब्लॉग सुरु केला उद्दीष्ट एकच होत की हे नैराश्याचे पांघरुण उलथून टाकायचे आणि मग पुन्हा कधी नैराश्य वाटेला आले नाही. जितक लिहत गेले तितक सुचत गेले....किंबहुना अनुभवाहून अधिक सुचत गेले आणि लिहत गेले. ब्लॉग बहरला फुलला....माझ्या पहिल्याच ब्लॉगचे नावच  होते मुळी "विरंगुळा - वेळ सत्कारणी लावणारा उद्योग" "माझे काही हरविलेले शोधताना करावा लागलेला उपद्याप..." जेव्हा हरवलेले सारं सापडले तेव्हा सुरु केला नव्याने एक ब्लॉग "साद". मी घातलेल्या या सादेला प्रतिसाद मिळाला..अगदी उदंड प्रतिसाद मिळाला......आणि मग या ब्लॉगचे पुन्हा एकदा बारसे केले "साद-प्रतिसाद" 



या ब्लॉग करतानाचे, तो मॅनेज करतानाचे बारिकसारिक पैलु मी देण्याचा प्रयास करणार आहे. जे वाचून पाहून कोणालाही सहज ब्लॉग करता येईल. यासाठी आधी खालील सात प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे..

१) मी कोण आहे?
२) मला ब्लॉग का करायचा आहे?
३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
४) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
५) माझा ब्लॉग कोणत्या भाषेतून असणार आहे?
६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?


मग या सात प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवा. आपण पुन्हा लवकरच भेटू.


GO TO PART 2 HERE

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma