Showing posts with label STORIES. Show all posts
Showing posts with label STORIES. Show all posts

Thursday, June 4, 2015

नाही कळले कधी....जीव वेडावला.....


ती तिथे कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली होती. ऍडमिशनसाठी सगळे ओरिजनल डॉक्युमेंटस झेरॉक्स यांच्या विळख्यात कशी बशी पिवळ्या ड्रेसची पिवळी ओढणी सांभाळत जगावेगळी कसरत करत होती. मऊ रेशमी बेभान झालेले केस सावरण्यासाठी जरा वैतागूनच मान वर केली आणि तिथेच घात झाला.....
पल्सरवरुन रुबाबात येणार्‍या एका झंजावाताकडे तिची नजर खिळली आणि सगळी कागदपत्रे इतस्त पसरली...
तिला काहीच कळल नाही....
तो झंझावात क्षणार्धात तिच्या जवळ येऊन स्थिरावला...
बाईकवरुन उतरुन तिची कागदपत्र गोळा करुन तिच्या हातात दिली...आणि निघून गेला...
तिल काहीच कळल नाही....
ती उभी होती स्तब्ध....
इतक्या वर्षात प्रथमच तिचा काळजाचा ठोका चुकला होता...
पण कुणासाठी...कोण तो...काय त्याच नाव आणि हाच का तो..
अशा अनेक प्रश्नांनी ती गोंधळून गेली. 
पण उत्तर कधीच मिळाली नाही.
तीने बी कॉम फस्ट इयरला ऍडमिशन घेतले होते...
तो.....माहित नाही...
तेव्हा दिसला तो एकदा आणि शेवटचाही....
त्यानंतर मात्र तिचा काळजाचा ठोका कुणी चुकवू शकले नाही...
तीन वर्ष सतत अभ्यास...घर...आणि हृदयातील तो...इतकच तिच विश्व होत...

एका नजरेतील ओढीला इतका का कुणी महत्त्व देतो? आपण चुकतोय हे ही तिला ठाऊक होत. पण शेवटी दिल है के मानता नही. त्याला शोधून काढाव किमान त्याच नाव तरी माहित करुन घ्याव...अस तिला खूप वाटायचे...पण तीने ते धाडस कधी केले नाही. ती ते करु शकत नव्हती अस नव्हत...पण नाही केला प्रयास...येवढच....

त्याच्या त्या फर्स्ट लूकवर ती इतकी फिदा झालेली की तिला काय होतय हे तीच तिला कळत नव्हत. तो प्रसंग तीने एखाद्या चित्रपटातील सीन सारखाच मनात ठेवून दिला व या पहिल्या ओढीची आठवण जपून ठेवली. 

ती त्याच्यात कधी वहावत नाही गेली. अतीशय फोकस्ड होती....अतीशय जवाबदारपणे तीने तिचे शिक्षण पूर्ण केले. उत्तम नोकरीही मिळवली. आयुष्याची दिशा ठरवली आणि तो....
कुणास ठाऊक कुठे होता.....

एके दिवशी बाबांनी लग्नाचा विषय काढला...तिला कुणी आवडत का? हा प्रश्न विचारला. 
आता काय उत्तर द्यायच बाबांना....
खर सांगितल तर मुर्खात काढतील...

कारण मुलगा आवडणे म्हणजे आधी त्याला जाणून घेणे आले...फक्त एका लुकवर कुणी आयुष्य थोडी काढतेय. अस ती स्वतःशीच बोलत होती. शुद्ध वेडेपणा आहे...
पण खरच विचार करायला लागली कारण त्या मुलावर फिदा झाल्यानंतर तिला कुणीच आवडल नाही. कुणाकडेच आकर्षित ती झाली नाही. तीला अनेक प्रपोझल पण आले कारण ती होती देखील तितकीच सुंदर...

सुंदर पेक्षाही तिचे सौंदर्य तिच्या नैसर्गिक हास्यात होत. तिच्याकडे नजाकता नव्हती नाजुकता होती. जरी दिसायला नाजूक असली तरी मनाने खुप कणखर होती. तिचे विचार ही कणखर होती. कुणालाही सहज आधार देईल इतके सामर्थ्य तिच्यात होते. अशी सर्व गुण संपन्न वाईफ मटेरियल मुलीच्या मागे अनेक जण लागलेले...सिरयसली लागलेले...पण प्रत्येकाला शांतपण तीने नकार दिला. 
हे नकार देण्याचे सामर्थ्य बहुतेक त्याच्या ओढीनेच आलेले होते. 
पण कोण होता तो?

असो....बाबांना तुम्हीच योग्य स्थळ पहा अस सांगून मोकळी झाली...
मनाच्या उथळ विचारांवर, भावनांवर वाहून जाण्यापेक्षा आयुष्यात दिपस्तंभ म्हणून उभा असलेल्या बाबांच्या हाती सर्व काही सोपविणे तिला जास्त श्रेयस्कर होते.

लेकीचे सामर्थ्य बाबांना निश्चितच ठाऊक होते...म्हणून तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. अगदी प्रत्येक गोष्टीत. कुठला ही निर्णय हा विचारविनिमय करुन घेतला जाई...कुणी ही कुणाचा निर्णय लादत नव्हते...ही त्यांच्या घराची शिस्त होती आणि म्हणूनच या घरातील नाती खुप घट्ट होती.

लेकीने सिग्नल दिल्यावर आई बाबा मुले शोधायला लागले. बाबांच्या एका मित्राच्या भावाच्या मुलाचे स्थळ तिला आले...
आभास जोगळेकर, दिसायला तसा सर्वसामान्य...पण स्मार्ट...पटकन कोणीही इंप्रेस व्हावा असा. त्याची हुशारी त्याच्या डोळ्यात होती. अतीशय चमकदार डोळे. त्याचे चालणे अगदी रुबाबदार.. पण कुठेही ऍटिट्युड म्हणून त्याच्या वागणूकीत नव्हते. शांत, संयमी पण अतीशय ऍडजेस्टटेबल...कुठेही कसाही सहज मिसळून जाईल असा. इतर मुलांसारखे दंड फुगवलेले नव्हते....तर एका पुरुषाला शोभेल अशीच त्याची शरिरयष्टी होती....व ताकद ही...पण त्याच कधी प्रदर्शन केले नाही....मोठ्या हुद्द्यावर कामाला होता...पण कोणतेही काम करायला त्याला लाज नव्हती...प्रचंड मेहनती...व एक निष्णात फोटोग्राफर म्हणून प्रचलित...असा आभास...
त्याने तिला  म्हणजेच कस्तुरी करमरकरशी लग्न करायला होकार दिला 
कारण आई-बाबांना ती आवडली होती. 
इथे आभासलाही कस्तुरीने होकार कळवला कारण आई-बाबांना तो आवडला होता.

पण अजूनही आभास आणि कस्तुरीने एकमेकांना पाहीले नव्हते अगदी फोटोही पाहता नाही आला. हे काही दोघांच्या आईवडीलांना पटेना. केवळ आम्ही सांगतो म्हणून त्यांनी लग्नाला होकार द्यावा हे मान्य नव्हते. त्यांच्यामते आभास व कस्तुरीने एकमेकांना जाणून घेणे आवश्यक होते. म्हणुन लगेचच दोन्ही कुटुंबांनी एका निसर्गरम्य रिसॉर्टवर भेटायचे ठरविले.

करमरकर आधीच रिसॉर्टवर पोहचले होते. रिसॉर्टमधील एका झाडाखाली शांतपणे कस्तुरी बसली होती. अस शांतपणे बसणे तिला फार आवडायचे म्हणून घरच्यांनीही तीला बसू दिले. पिवळी ओढणी असलेला ड्रेस घालून ती त्या बाकड्यावर बसली होती. शांतपणे डोळे मिटले होते आणि अचानक तीला तो कॉलेजमधला प्रसंग आठवला आणि चेहर्‍यावर पुसटसे हसु आले. डाव्या हाताची घडी आणि उजवा हात गालावर ठेऊन, हिरव्या गवतावर पडलेली पिवळी कोवळी किरणे पाहत ती हसत होती. एकटीच. स्वतःशी....कारण यापुढे ती या मनातील मुलाला आठवणार नव्हती...त्याची जागा आता कोण तरी वेगळ घेणार होत. 
तितक्यात बाबांनी हाक दिली..."कस्तु आभास आला ग..."
तिने हलकेच मान वर केली...त्याचे आई बाबा दिसले...पण तो कुठे दिसला नाही...श्री व सौ करमरकर आणि जोगळेकर पुढे आले...आणि मागावून आला तो आभास....

तिला कळेच ना हा आभास आहे की तिलाच भास होतोय...
कारण तो आभास तसाच तिच्याकडे चालत येत होता..
त्याला ही माहित नव्हत की समोर तीच उभी आहे.....
जेव्हा त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याची पावले जागीच खिळली.
डोळ्यावरील गॉगल काढून त्याने तिला पाहीले व तिनेही प्रथमच त्याला नीट पाहिले....
रिसॉर्टमध्ये त्याचवेळी गाण्याच्या ओळी ऐकू आल्या...

नाही कळले कधी 
जीव वेडावला
ओळखू लागलो 
तू मला मी तूला

गोड हुरहुरु ही
श्वास गंधावला 
ओळखू लागलो
तू मला मी तुला

बराच वेळ दोघेही एकमेंकाना पाहत उभे होते...
कस्तुरीला तर काहीच कळत नव्हत...
पण आभास ही स्तब्ध झाला होता...
ज्या एकमेव मुलाने तिच्या काळजाचा ठोका चुकविला होता तो तिच्या समोर होता आणि हे कळण्याआधीच ती त्याच्याशीच लग्न करायला तयार होती. 
तीने त्याला ओळखल होत....पण त्याच काय...तो का स्तब्ध झाला होता.
काहीच कळत नव्हत....

तेवढ्यात दोघांचे आईबाबा आले आणि त्यांची एकमेकांशी ऑफीशियल ओळख करुन दिली व ब्रेकफास्टसाठी सर्व जण गार्डनमध्ये आले.
सगळ्यांमध्ये दोघेही एकमेकांना चोरुन चोरुन पाहत होते..आणि हसत होते...या प्रसंगी त्यांना काही सुचतही नव्हत.
शेवटी त्या दोघांना एकत्र एका कोपर्‍यात  ब्रेकफास्टला बसवल आणि आई बाबा रिसॉर्ट फिरायला निघून गेले.

कस्तुरी आणि आभासनी खर तर तिथे गप्पा मारण अपेक्षित होत पण....बुद्धीला ब्रेक लागला होता आणि हृदय फास्ट चालत होते...आणि असाच ब्रेकफास्ट सुरु होता.
शेवटी धीर करुन आभासच बोलला....
आपण अनोळखी आहोत. हे खरय का?
ती हसली...
तो ही हसला...
कस्तुरी : माहीत नाही
आभास : अजब आहे ना सगळ
कस्तुरी : हो निदान माझ्यासाठी तरी
आभास : का? फक्त तुझ्यासाठीच का? म्हणजे
कस्तुरी लाजली होती...
आभास ही गालात हसला..
आभास : तुला काय वाटल की त्या दिवशी फक्त तूच स्तब्ध झाली होतीस.
कतुरी : काय!!! (आश्चर्याने) म्हणजे तू ही
आभास त्यावर हसला आणि म्हणाला नाही निदान त्या दिवशी तरी नाही....
आणि आपला मोबाईल काढला. गुगल डाईव्हमधील माय बेस्ट क्लिक्स फोल्डरमध्ये जो एक फोटो होता तो उघडून तिला दाखवला..आणि कस्तुरी पाहतच बसली...
कारण तो फोटो तिचाच होता.
गुलमोहराच्या झाडाखाली आपल्या ग्रुपमध्ये बसली असताना, खळखळून हसताना काढलेला तिचा तो फोटो. हवेच्या झुळकीने उडणारे केस...मनवेधक असे हास्य.. चेहर्‍यावर पसरलेली माध्यान्याची पण बरीच सौम्य झालेली किरणे....येवढेच त्या फोटोमध्ये दिसत होते....

ती चमकून त्याच्याकडे पाहू लागली...तिच्या डोळ्यात आश्चर्य हा शब्द कमी पडावा अस काहीतरी होत..

आभास :  पहिल्या भेटीत माझ लक्ष ही नव्हत तुझ्याकडे...कारण मला पाहून मुली अशा स्तब्ध होतात. त्यात काही विशेष नव्हत. म्हणुन लक्ष नाही दिले....पण तुझा हा फोटो काढल्यानंतर मीच स्तब्ध झालो.  कॉलेज सुरु झाल्यावर काही महिन्यानंतरचा हा फोटो. मी जिमखान्यातच होतो. मित्रांना नवीन कॅमेरा दाखवत होतो. त्या कॅमेर्‍याच्या झूम लेन्सने पहिल्यांदाच घेतलेला हा तूझा फोटो. कायमच मनात घर करुन राहिला.तुझ्याशी बोलाव...तुझ्याशी मैत्री करावी...जवळीक साधावी अस कधी मला वाटण शक्यच नव्हत..वाटल असत तरी ते मी केल नसत कारण तो माझा स्वभावच नाही. पण तरीही ह्या फोटोमुळे तू मनात घर करुन गेलीस. हा माझा सगळ्यात बेस्ट क्लिक आहे, अस मी मानतो आणि हा फोटो अजूनही कुणी पाहीलेला नाही. माझ्या त्या मित्रांनी तो पाहिला नव्हता. कारण हा फोटॊ क्लिक करताना मीच शूट झालो होतो. वाटल एका क्षणाचे आकर्षण आहे म्हणून सोडून दिले. पण ते एका क्षणाचे आकर्षण नव्हते क्षणोक्षणीचे होते आणि हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता. लास्ट इयरला होतो आणि मिड टर्ममध्ये आम्हाला गुजरातला शिफ्ट व्हावे लागले...आणि मी केवळ परिक्षा देण्यासाठी कॉलेजला आलो. तसा मी अधून मधून येत असे टीचर्सना भेटायला. पण तू कधी दिसली नाहीस....मग मी तुला शोधण्याच्या फंदातही पडलो नाही. पुढे अभ्यास...परिक्षा इंटरव्ह्यू जॉबमध्ये इतका अडकलो की सार विस्मृतीत गेल. कधी तरी खुप दमलो की तुझा फोटो काढून पहायचो...खूप चैतन्य मिळायचे...वाटायचे की ही मुलगी अशीच हसत आपल्या आयुष्यात आली तर कीती बर होईल ना! आणि मनोमन प्रार्थना करायचो तू भेटण्यासाठी....पण अशी भेटशील अस खरच वाटले नव्हते...

त्याचे डॊळे आनंदाश्रुने भरले होते....आणि तिचेही..
...दोघांनाही काय बोलावे सुचतच नव्हते....
नकळत क्षणभर डोळे बंद करुन त्या दोघांनीही परमेश्वराचे आभार मानले आणि डोळे उघडून एकमेकडे पाहिले तेव्हा जाणिव झाली की
They are made for each other...
अगदी.....
त्याच्या डोळ्यात पाहत कस्तुरीने प्रथमच आपल मन मोकळ केल....
"कधी कधी तीव्र आंतरिक ओढी पुढे इतर सर्व गोष्टी फिक्या पडतात ना!!! शेवटी खरी ओढ निर्माण होणे ही त्या परमेश्वराचीच इच्छा........नाही का?"
आभास : होय.
कस्तुरी : मग कधी करायच लग्न..
आभास: ते तर झालय...आत्ताच...उपचार बाकी आहेत फक्त. चल आई बाबांना सांगू आटपून घ्यायला...
अस म्हणत आभासने आपला हात पुढे केला आणि कस्तुरीनेही आपला हात हातात दिला. 
आणि तेवढ्यातच तेथे आलेले करमरकर आणि जोगळेकर स्तब्ध झाले होते...अर्थात आनंदाने..
कारण हाताची पकड त्यांना संगळ काही सांगत होती.

- रेश्मा नारखेडे
(ही कथा काल्पनिक आहे)

Saturday, February 14, 2015

प्रश्न ??



मी जन्माला आले तेव्हा डाक्टरांचा चेहरा प्रश्नार्थक होता. असं मी नाही माझी आई म्हणते. कसला बरा प्रश्न पडला असेल त्यांना? कुणास ठाऊक? काही चिंतेचे कारण असेल म्हणून आईने त्यांना विचारल सुद्धा..पण छे! त्यांनी Every thing is normal  असे म्हणून प्रश्न टाळला. ही होती सुरुवात. तेव्हा पासून आत्ता पर्यंत मी आणि प्रश्न हे काही वेगळे नाहीत. मला प्रश्न पडतात. माझ्या पडिक प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतात. मी असताना प्रश्न. मी नसताना प्रश्न. माझ्या बोलण्यावर प्रश्न, माझ्या वागण्यावर प्रश्न.

माझे नावच माझ्या जवळच्यांनी "२१ अनपेक्षित प्रश्नसंच" असे ठेवले आहे. काय माहित कधी कुठला प्रश्न विचारेन. त्यामुळे मला टाळण्याचाच लोकांचा कल असतो. असो...

पण २१ अनपेक्षित प्रश्नसंच हे नाव मी पुरेपुर सार्थ ठरवलय..बरं का!! इतरांना झोपले की स्वप्न पडतात..मला प्रश्न पडतात..आता झोप किती वाजता लागेल? स्वप्न कुठलं पडेल? स्वप्नात कोण येईल? कोण यायला हवे? इत्यादी. आणि माझी पहाट होते ती प्रश्नानेच कुठलं स्वप्न पडलं होत? ह्या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच....आईंची प्रश्नांची सरबत्ती सुरु...अग म्हशे उठलिस का? दात घासलेस का? चहा हवा की दूध? ....भाजी खाशिल ना? उफफ...आईला पण "उत्तरात" बोलता येत नाही का? बघा मीही पुन्हा प्रश्नच विचारला...हे असंच होतं माझं...

आता मला पडलेले प्रश्न ऐका...
  1. भारताच्या पूर्वेला असणार्‍या राज्याला "पश्चिम" बंगाल असे का म्हणतात?
  2. लोक मला म्हणतात तुझे वळण सरळ नाही..आता वळण कधी सरळ असेल का?
  3. ट्रेनमधील विक्रेते माल विकून आलो असे म्हणण्याऐवजी "ट्रेन मारुन आलो" असे का म्हणतात? म्हणजे ते नेमके काय करतात?
  4. खुर्चिवर बसले असतानाही लोक नेटवर बसलोय अस खोट का बोलतात?
  5. आणि सगळ्यात वाईट म्हणजे...develop करायला दिलेल्या फोटोंना "फोटो धुवायला दिले आहेत" अस का म्हणतात? आता ते काय कपडे आहेत?
  6. जेवायला बस आणि बसून जेव..यामधील क्रीया सारखीच आहे...पण शब्दांच क्रम बदलला की अर्थ एकच राहून भाव कसा काय बदलतो?
  7. माझी मैत्रीण फोनवर मला सांगते...की आता मी जेवण करते आहे म्हणजे नक्की जेवण बनवते की जेवण जेवतेय, हे मी कस समजायचे?
  8. महागाई शब्द कसा आला? गाईंशी त्याचा काय संबंध.....
  9. झोपलेले आहे हे दिसत असताना हलवून हलवून उठवायचे आणि विचारायचे की झोपली होती का? या प्रश्नाला उत्तर काय अपेक्षीत असते?
  10. वाढू का? वाढू का? जेवायला बसल्यावर हा प्रश्न तर जाम सतावतो. कारण इतकी मोठी उंच वाढलेली असताना, ताई अजून किती वाढणार? हा प्रश्न मला पडतो?
  11. आता अंधार हा गुडुप कसा काय? गुडूप म्हणजे काय? गुडूप असा अंधाराचा आवाज आहे का जसा पाण्यात दगड पडल्यावर येतो डुबुक तसा?
  12. कंटाळा आला असे आपण म्हणतो पण तो येतो कुठून?



या अशा अनेक प्रश्नांनी माझं आयुष्य आणि मी प्रश्नार्थक झालय आणि उत्तरांनी माझ समाधानही होत नाही....
कंटाळा आलाय मला या प्रश्नमय आयुष्याचा..कुठून ते ही कळत  नाही? खुप नुकसानही झालयं माझ. म्हणून मी ठरवलय...की आता प्रश्नच विचारायचे नाही मुळी...केवळ उत्तरातच बोलायचे. द्यायची फक्त उत्तरे...प्रश्न टाळायचे...

हा विचार माझा पक्का होऊन काही दिवस उलटत नाही तोच.....

एका सुशिक्षित, सुसंस्कृत, सुंदर मुलाने मला वॅलेंटाईनच्या दिवशी विचारले 

Will You Marry Me??? 

मी त्याला ताडकन उत्तर दिले...
Are You Gone Mad??? 
तुला वेड लागलेय का?

झालं....

आता त्या मुलाचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
पण त्याने शांतपणे उत्तर दिले...हो! वेडाच झालोय...

आयुष्यात माझ्या प्रश्नाला मिळालेले हे एकमेव समाधानकारक उत्तर होते.

त्यानंतर विचारु नका काय झाल....

एवढचं सांगू शकते की २१ अनपेक्षित प्रश्नसंचाला अखेर २१ अपेक्षित उत्तरसंच मिळाला आहे....


- रेश्मा नारखेडे 
ही कथ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी 
व याबाबत कृपया प्रश्न विचारु नये.

Wednesday, February 11, 2015

एक एक पाकळी प्रेमाची


वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी.

यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे.

हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते. 

आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प्रार्थना आम्ही करत होतो. त्याला विचारयाचा प्रयत्न केला देखिल आम्ही...कोण आहे रे ही मेनका..फुलराणी..जिच्यावर तु ही अशी फुलांची बरसात (मनातून बरबादी असं म्हणायच होत) करीत आहेस? कोण आहे सांग ना? आम्ही करतो काही तरी? पण हा पठ्या हुं का चूं करायला तयार नाही. खुप शोध घेतला.

 त्याच्या डोळ्यांवर नजर ठेवली. तेव्हा कळल...की आमच्याच वर्गातील सीमाला पाहिल्यावर याच्या डोळ्याचे भाव बदलतात...मग आम्ही लागलो आमच्या तयारीला..कसल्या काय विचारता हो..अक्षय सीमाची सेटींग करण्याच्या...दोन दिवसांनी आमच्या म. टा. ने खबर आणली...

म.टा म्हणजे मनिष टाकळे..आमच्या ग्रुपची चालती बोलती वृत्तसंस्था "ही सीमा बायो हेड धाक्रसची पोरगी आहे." बापरे हेडची पोरगी..हेडएकच होईल..म्हणून अक्षयची सेटींग परिक्षेनंतर करायचे ठरविले..१२ वीची परिक्षा जवळ आली..सगळे अभ्यासाला जुंपले...Practical's झाल्या..लेखी झाली..शेवटचा पेपर झाला आणि कट्ट्यावर जमलो...त्याच झाडाखाली...ज्याची पाने गळून (खुडून) इतस्त विखुरली होती.

आता एकच ध्येय...अक्षय आणि सीमाची सेटींग...Plan आखला...आजच तिला गाठायच...आणि अक्षयच्या वतीन विचारायच..Fix....

जवळच सीमा होती बसलेली...विखुरलेली पाने, पाकळ्या चिवडत..
तेवढ्यात अक्षय आला...खुशीत होता...त्याने आम्हाला सगळ्यांना एक एक रसरशीत..भरपूर पाकळ्या असलेलं गुलाब दिल आणि आम्हाला ओळख करुन दिली. Meet My GirlFriend Priya...आमची नजर त्या गुलाबाकडेच खिळली होती...सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न..खुडेच्या हातात गुलाब शिल्ल्क कस राहिल..अरे!! फुलाकडे काय पाहताय...इकडे पहा...ही माझी girlfriend..Priya...

आम्ही जीवावर उदार होउन पण थोड्याश्या कुतुहलाने प्रियाकडे पाहिल..तर....एकजात सगळे केकाटले...तु या प्रियाला पटवली? दुश्मन गँगची पोरीवर प्रेम करायला लाज नाही वाटली. खुप खुप बोललो त्याला..खुप राग आला..बाजूला सीमा सगळं पाहत होती..आम्ही हताशपणे तिच्याकडे पाहिले आणि घरच्या वाट्याला लागलो...तो आमच्या collage चा अखेरचा दिवस होता आणि अक्षयबरोबरील मैत्रीचा सुद्धा...

पाहता पाहता दोन वर्षे उलटली...एका शनिवारी शांतपणे बसले असताना कुरियरवाला आला...आश्चर्यच..अक्षयची लग्नाची पत्रिका होती..आमच्या ग्रुपमध्ये लग्न करणारा तो पहिलाच..दोन वर्ष संपर्कात नव्हतो तरी ग्रुपमध्ये होता तो कायम...पत्रिका सुंदर होती...फुलाफुलांची....अगदी collage चे दिवस आठवतील अशी..पण जरा निरसपणेच उघडली...चि.अक्षय याचा विवाह चि.सौ.का. सीमा धाक्रस हिजबरोबर....SHOCK.....SHOCK......हे कसं काय? काही कळेना...पत्रिका दहा वेळा वाचली....माझा विश्वासच बसेना... आठवड्याने लग्न होत....दरम्यान त्याला फोन केला..पण तो फोनच उचलेना...

सगळे लग्नाला गेलो...शुभेच्छा द्यायला स्टेजवर...तेव्हा आमची सगळ्यांची अचंबीत थोबाडपाहून तोच म्हणाला...
"मित्रांनो, जिच्यासाठी मी वर्षभर फुलांच्या पाकळ्या खुडत बसलो...तिनेच वर्षाच्या आतच मला एखाद्या पाकळीप्रमाणे स्वतःच्या आयुष्यातून खुडून टाकल. मी पाकळ्या खुडत असताना..नेहमी जिने त्या पाकळ्या अलगद, प्रेमाने उचलून आपल्या वहीत जपून ठेवल्या..तिनेच मग मला अलगद, प्रेमाने, मानाने उचलून आपल्या ह्रदयात स्थान दिले. जिने टाकलं तिच्यासाठी जीव जाळण्यापेक्षा, जिने वेचलं तिच्यासाठी...तिचा होऊन राहणे अधिक श्रेयस्कर नाही का?

आम्ही सगळे निशब्दः झालो होतो...ओठांवर फक्त समाधानाचे हास्य होते...

निघताना सीमा..अर्थात सीमा वहिनींनी आम्हाला थांबविले..आणि हळूच त्याला कळणार नाही असे म्हणाली.."एक गोष्ट सांगायची राहीली..माझ्याकडे पाहून अक्षयच्या डोळ्यातले भाव कधिच बदलले नव्हते...भाव बदलत होते तर ते माझ्या डोळ्यातले...अक्षय तर फक्त ते भाव टिपत होता...मात्र, तेव्हा काही कळण्याची बुद्धी्च एका एका पाकळीसोबत गहाणच पडली होती त्याची."

आम्ही हसतच आणि आनंदातच स्टेजवरुन खाली उतरलो...त्या दोघांकडे पाहून या दोन वर्षात नेमके काय आणि कसे घडले हे जाणून घेणेच विसरुन गेलो...असे वाटत होते जणू आमचा collage मधील Plan  आता यशस्वी झाला...अक्षयसीमाच्या सेटींगचा..

कथा - रेश्मा नारखेडे 
(काल्पनिक कथा आहे याची नोंद घ्यावी) 
 २२/०५/२०१०