Saturday, September 18, 2010

दे...धम्माल...मिरवणूक गणूबाप्पाची

अनिरुद्ध गुरुक्षेत्रम गणपती मिरवणूकीचा हॅंग ओव्हर अजून उतरलेला नाही..त्यामुळे जरा वृत्तांत लिहण्यास उशीर झाला. असो..पण जास्त उशिर करुन चालायच नाही...बरोबर ना!!!
अडीच दिवसासाठी येतो आणि नुसत खुळ करुन टाकतो...हा गणपती बाप्पा पण आणि हा अनिरुद्ध बाप्पापण...नादखुळा...खर तर शेवटच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना मन खूप भरुन येत...पण त्याला पूर्ण भक्तीभावाने आणि वाजत गाजत निरोप देण्यास हवाच ना!!! त्यात बापूंच्या घरचा गणपती जो कधी परका वाटतच नाही...मग त्याच्या निरोप समारंभात छे छे निरोप उत्सवात..झोकून देणे इतकच आपल्याला करता येऊ शकते..बापूंच्या गणपती विसर्जन मिरवणूकीची मजाच आणि थाटच निराळा असतो. आणि खरच या भक्ती प्रेमाच्या सोहळ्यात पूर्णतः धुंद होऊन जातो...या सोहळ्याची झिंग अशी आहे की बापू आई आणि दादांसह गणपती बाप्पा देखील डोळ्यासमोरुन जात नाही. आहा आहा!!! अगदी लोभस आणि गोंडस रुप आहे...शब्दच नाहीत माझ्याकडे...
यावर्षी मला फोटो काढण्यासाठी "प्रत्यक्ष" मधून पाठविले होते...मी जरा टेंशनमध्येच होते..उगाचच...आदल्या रात्रीपासून प्लॅनिंग सुरु होते. कसे फोटो काढायचे..कुठून काढायचे...कुठे चढायचे...सगळ काही प्लॅन्ड...पण आयत्यावेळी पोपट व्हायचा तो झालाच...असो...तर प्लॅनिंगप्रमाणे मी फोटो काढायला सुरुवात केली. फोटोच नाही तर व्हीडीओ शूट देखील केले. पण मज्जा आली..सर्वप्रथम आई बापू दादा दोन लिफ्टने खाली आले...ते आले नाही तर आम्ही खटाखट क्लिक करायला सुरुवात केली. आई सोबत शाकंबरीवीरा दत्तोपाध्ये (मुलगी) आणि निष्ठावीरा जोशी (सून) दोघीही होत्या. शांकबरीवीराच्या हातात औक्षणाचे ताट होते..थोड्यावेळाने एका लिफ्ट्मधून दत्तबाप्पा आणि एका लिफ्टमधून गणपती बाप्पाची मूर्ती आणली गेली. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये (जावई) आणि डॉ. पौरससिंह जोशी (मुलगा) यांनी आसनावर दत्तबाप्पा आणि गणपती बाप्पाला ठेवले..नंतर सर्वप्रथम नंदाईने गणपती बाप्पाचे औक्षण केले...अगदी प्रेमाने....मग शांकबरीवीरा आणि निष्ठावीरा यांनी औक्षण केले..त्यानंतर सुचितदादांच्या आईंनी औक्षण केले..मग सुखकर्ता दुःखहर्ता आरती घेण्यात आली. आरती झाल्यानंतर गणपती आणि दत्तबाप्पाच्या मूर्तीला सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आले आणि गाडी हळूहळू ढकलत हॅपी होम गेटच्या बाहेर आणण्यात आली. काय मस्त वाटत होते...दोन्ही बाजूला तुतार्या वाजत आहेत आणि त्यामधून गणपती बाप्पा हळू हळु पुढे सरकत आहे..गणपतीच्या मार्गावर आई  पवित्र जल शिंपडत आहे. अस करत मोठ्या सजवलेल्या ट्रकजवळ गाडी येते...पौरससिंह आणि स्वप्निलसिंह आधी दत्तबाप्पाला त्याच्या जागी विराजमान करतात आणि मग गणपती बाप्पाला..मग बापू आई दादा सजवलेल्या ट्रकवर चढतात आणि अत्यंत प्रेमाने दत्तबाप्पा आणि गणूबाप्पाचे दर्शन घेतात..मग त्या ट्रकच्या मागे असलेल्या भक्त समुदायाला हात वर करुन दर्शन देतात.. मग बापू आईचा हात धरुन सावकाश खाली उतरतात...पुढे बापू कागद्याच्या लगद्याने बनविलेल्या शंकराच्या मोठ्या पिंडीच्या ट्रकवर चढतात..पिंडीला फुले, बेल आणि हार अर्पण करुन भक्तांच्या गर्दीमधून कोपर्यावरील स्टेजवर जातात..स्टेजवर जाताच...मोठ्या आवाजात गजर स्पिकरवर सुरु होतात..गणपती बाप्पा मोरया.....
मग एके एक ग्रुप पुढे बापू आई दादांचे दर्शन घेत पुढे सरकतो...प्रत्येकाला मनसोक्त दर्शन मिळते..ते देतात...मला एक गम्मत वाटली.. एवढी गर्दी होती...या गर्दीतही नंदाईला कुणी तरी अगदी ओळखीचे दिसले...तेव्हा बापूंचे लक्ष दुसरीकडे होते....तेव्हा आईने बापूंना त्या व्यक्तीकडे पहायला सांगितले..."अनिरुद्ध तिकडे बघ" अस काहीस ती पुटपुटलेले मी ऐकले...तेव्हा मी खालीच स्टेज जवळच होते ना!! आणि मग बापूंनी आईने सांगितलेल्या दिशेने बघून मस्त हात वर करुन अच्छा केला.. मला कमाल वाटली. आईचे किती बारीक लक्ष असते प्रत्येकाकडे...यावरुन ते मला समजले...
सगळे भक्त स्टेजच्या समोर आले की हलतच नव्हते..तेव्हा बापू आई दादा त्यांना हळूहळू पुढे सरका असे सारखे सांगत होते...भक्त थोडीच ऐकत आहे......आपल्या प्राणप्रिय सदगुरुला पाहण्यातच ते सगळे विसरुन गेलेले दिसले...खर तर हे भक्त पुढे सरकतच नव्हते स्वतःहून...मागचे भक्त पुढच्याला धक्का मारत पुढे येत होते...त्यामुळे हे पुढे जात होते...आणि तो मागचा भक्त स्टेजसमोर आला की तो तीथेच खिळायचा...मग त्याच्या मागचा भक्त स्टेजसमोरुन येण्यासाठी त्याला धक्का मारायचा...हे असच चालत होत...मला जाम गम्मत वाटली. एरव्ही जरासा धक्का लागल्यावर रागाने पेटणारी माणसे सदगुरु समोरुन कुणी धक्का मारल्याशिवाय हलणारच नाही अशाच ऍटीट्युड्मध्ये दिसली...जाम गम्मत वाटली...देवाला किती पाहू आणि किती सामावून घेऊ हाच भाव त्यांचा दिसत होता...आणि कितीही पाहीले सदगुरुला तरी ते कमीच वाटते...

मी फुल्टू फोटो काढण्यात बिझी होते...इथे तिथे लक्ष नव्हते....काही ग्रुप्स पुढे गेल्यानंतर बापू आणि त्यांचे सुरक्षारक्षक जाऊ लागले...स्टेजवर आई आणि दादा दर्शन देत होते...सगळे ग्रुप्स मिरवणूकीत गेल्यावर आई दादा पुन्हा हॅपी होमला गेले..

मिरवणूकीत सर्वप्रथम समीरदादा चालत होते...त्यांच्या पुढे तुतारीवाले आणि मागे लेझीम पथक होते...त्यांच्याबरोबरच स्वप्निलसिंह आणि पौरससिंह होते...ते सगळी मिरवणूकीची व्यवस्था पाहण्यात रमले होते...अधून मधून नाचत ही असावेत...मग झेंडे, गरुडटका घेऊन डीएमव्ही होते..नंतर एक एक ग्रुप्स पुरुष व महिलांचे होते....दिंडीचे ग्रुप होते...सगळे जण सॉलिड म्हणजे सॉलिडच नाचत होते...या सगळ्यांचे फोटो काढले...पाणी वाटप अखंड सुरु होते...प्रसाद वाटप चालत होते...वेगवेगळ्या स्पॉटवर गणूबाप्पाचे औक्षण करण्यात येत होते...सर्व भक्तांना औक्षण करण्याची संधी मिळत होती...

सगळे बेदम नाचले....मूली आणि महिलापण कुठेही कमी नाही...

बापू देखील भक्तांबरोबर नाचले....आणि काय नाचले सांगू!!!! त्यांच्या सारखे नाचणारे कुणीही नाही...मध्येच नाचायचे...चालायचे दोन्ही बाजूंनी जमलेल्या भक्तांना मनसोक्त हात वर करुन दर्शन द्यायचे...खरच ही मिरवणूक म्हणजे भक्तांची ऐश असते...

साधारण दहा वाजता मिरवणूक आटोपती घेतात...सगळे स्पीकर्स बंद करुन भक्तांना माघरी हॅपी होमला प्रसाद घेण्यासाठी पाठवतात...आणि काही ठराविक मंडळी बीचवर जातात...

हॅपी होमला सगळ्या भक्तांना प्रसादाच्या पॅकेटस देण्यात येते...यंदा आई आणि दादा स्वःत सगळ्यांना प्रसाद देत होते...आईच्या हातून प्रसाद घेऊन आम्ही आमच्या घरी परतलो....आता वाट पाहत आहोत ती पुढच्या वर्षीची अगदी त्याच दिवसापासून जेव्हा गणूबाप्पा त्याच्या घरी परतला...

अजूनही मिरवणूकीतील बापू आई दादा माझ्या डोळ्यासमोरुन जात नाही...आणि नकोच जायला....त्यांचे एक एक हाव भाव आठवत आहेत...अविस्मरणीय.....

सगळे  जण माझ्या मागे लागले आहेत...रेश्मा, आई बापू दादांचे फोटॊ देना!!! व्हीडीओ दाखव ना!!!..ब्लॉगवर टाक ना!!! पण खर सांगू. जरा वाट पहा....आपल्या नव्याने सुरु झालेल्या मनःसामर्थ्यदाता वेबसाईटवर लवकरच या अनोख्या गणेशोत्सवाचे फोटॊ आणि व्हीडीओ पाहण्यास मिळतील....थोडा धीर धरा....मला ही हे फोटो कधी साईटवर येत आहे अस झालेय....मला ही राहवत नाही म्हणून शेवटी शब्दातून चित्र उभं करण्याचा प्रयास केला आहे...देवाने जमवून घेतल आहेच...श्रीराम!!!! हरी ओम...बोला गणपती बाप्पा मोरया! अनिरुद्ध बाप्पा मोरया!!!!

Sunday, September 12, 2010

रांग....देवाची....

हरी ओम
काल बापूंच्या घरच्या गणपतीला जाण्याचे ठरविले होते. खर तर रात्रीची महाआरती अटेंड करायची होती. त्या हिशेबाने मी माझी मैत्रिण सोनाली शिंदे आणि तीची बहीण अशा आम्ही तीघी जणींनी कार्यकर्ताच्या पासाची रांग लावली. आम्हाला वाटले महाआरती पर्यंत आम्ही आत जाऊ..पण झाले भलतेच...आम्ही महाआरतीला ही हॅपी होम पासून खूप लांब उभे राहिलो होतो. खूप वेळ लागत होता दर्शनाला. यावर्षी पासून बाप्पाने संकल्प सुपारीची प्रथा सुरु केली आहे. त्यामुळेच हळू हळू पुढे रांग सरकत होती.. संध्याकाळी सात वाजता रांग लावली होती. पोटात काहीही नव्हते..त्यात साडी नेसली होती..बापरे...कस काय उभे राहणार होते देवालाच ठाऊक...

खर तर मला कधी देवासाठी ताटकळत रांगेत उभे राहण्याचा प्रश्नच आला नव्हता. तेही इतका वेळ...जेव्हा प्रथम बापूंच्या प्रवचनाला आले...तेव्हा मला कसलेच भान नव्हते...तर रांगेचे कसले असणार...पण इतकेच आठवते की तेव्हा ही फार काळ आम्हाला रांगेत उभे रहावे लागले नव्हते.. आणि त्यानंतर कायम मी कुठल्याना कुठल्या सेवेला असायचे म्हणून दर्शन पटकन व्हायचे..असो तर काल अर्थात गणेश चतुर्थीला बापूंच्या घरच्या गणपतीच्या दर्शनासाठी रांग लावली. संध्याकाळी सात वाजता रांग लावली. पण ते संकल्प सुपारीच्या प्रथेमुळे दर्शन खुप हळू सुरु होते. प्रंचड वेळ लागणार असल्याचे कळले. तरी पण ठरवले की रांगेतूनच जायच..काही ही झाले तरी...आमची पासाची रांग होती. पण ती जनरल रांग पाहून माझ्या पोटातच गोळा आला..त्या रांगेत उभे असणार्या प्रत्येक भक्ताला मनापासून वंदन करावेसे वाटले...इतका वेळ इतका मोठ्या रांगेत धीराने उभे राहणे हे कस शक्य आहे...हे फक्त तो भक्तच जाणतो आणि बापूच जाणतो. या रांगेत आबालवृद्ध, लहान मुले, स्त्री पुरुष अगदी शिस्तीने उभे होते. प्रत्येकाला काही ना काही त्रास होत होता..पण सगळे जण बाप्पाचे नाव घेत होत असलेला/नसलेला त्रास सहन करत रांगेत उभे होते. कुणी अखंड जप करीत होते, कुणी रामनाम वही लिहत होत, कुणाच्या अखंड बाप्पाच्या गप्पा रंगल्या होत्या आणि मी मात्र आपल्या मोबाईलवरुन नेट सर्फ करण्यात गुंगले होते...अर्थात आपली मनःसामर्थ्यदाता वेबसाईट पाहण्यात. मधे मधे पाऊस कोसळण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र जणू बापूने दम दिला आणि गपचूप बसला अशी त्याची गत झाली होती. त्यामुळे हलकासा शिडकावा केवळ झाला. मला एका जागेवर स्थिर उभे राहणे अजिबातच शक्य नव्हते. त्यामुळे माझ्या सारख्या हॅपी होमच्या बाहेर चकरा सुरु होत्या. खर तर मी अस्वस्थ होते...कारण मला रांगेतूनच दर्शन घ्यायचे होते आणि महाआरती देखील अटेंड करायची होती...पण हे शक्य होईल असे वाटत नव्हते.

आठ-सव्वा आठ वाजता गुरुक्षेत्रमची आरती सुरु झाली. झाल!!! दर्शन थांबवले. त्यानंतर गणपतीच्या महाआरतीला सुरुवात झाली..अकरावाजे पर्यंत आरती सुरु होती..म्हणजे साधारण आठ वाजल्या पासून रात्री ११/११:३० पर्यंत दर्शन बंद होते...

पण काल वेळेची पर्वा कुणाला होती? प्रत्येक जण दर्शन घेऊनच जाणार या निर्धारानेच आला होता.. पण माझी गोची झाली. मला महाआरती अटेंड करायची होती आणि मी बाहेर...मी महाआरतीला कधीच थांबत नाही...पण आज खास महाआरती अटेंड करायची याच उद्देशाने आले होते...असो...वेळ पुढे जात होता....पोटात कावळे त्रास द्यायला लागले...जवळपास काही नव्हत....मग कुठे काही मिळतय का या उद्देशाने आम्ही पुढे हॅपी होमच्या दिशेने जाऊ लागलो...तोच आरती सुरु झाली. आणि आम्ही हॅपी होमच्या गेट समोरच उभे राहीलो....खूप गर्दी होती...पण मला अशी जागा मिळाली की जिथून थेट टीव्ही आणि टीव्हीवर बापूंच्या घरातील आरती स्पष्ट दिसत होती. आरतीचा आवज देखिल मस्त येत होता लाऊडस्पीकरवरुन...महाआरती अटेंड करण्याची इच्छा मस्त बापूंनी पूर्ण केली...जवळपास २२ ते २३ आरत्या मनमोकळेपणे म्हटल्या. अस वाटतच नव्हत की आपण कोणत्या तरी रस्त्यावर उभे राहून आरती अटेंड करतो...जी स्पंदने आतील लोकांना जाणवतील तसे़च मला बाहेर ही जाणवत होते...प्रसन्न वाटत होते...सगळ्यात मज्जा महिषासुरमर्दीनीच्या "माते गायत्री" या आरतीला आली. समोर आई चण्डीका होती...आणि उदे उदे उदे चा गजर आसमंतात भरल्यासारखा वाटला....त्यावेळी रोमांच उठले..त्यानंतर कोट्यावधी अपराध पतीत मी या रेणूकामातेच्या आरतीला डोळे भरुन आले...ही आरतीच अशी आहे. बापू पण भावूक झाल्य़ासारखे वाटले...नंतर आरती संपली आणि बापूंचे आभार मानून मी पुन्हा आपल्या रांगेत गेले..आरती सुरु होण्यापूर्वी भूक लागली होती हे मी विसरुनच गेले.. रांगेत गेल्यानंतर मग गजर सुरु झाला....रांगेत पुसटच ऐकू येत होता गजर... एक-दोन मिनिटे गजर झाल्यानंतर अचानक..."बापू गजर म्हणत आहेत" अस वाटल मला...हा आवाज बापूंचाच आहे..हे ओळखता आले...मी पुन्हा हॅपी होमला धूम ठोकली..गेटच्या बाहेरुन टीव्हीवर पाहण्याचा प्रयत्न केला...तर अरे हो!!  बापूच गजर घेत होते...सही..."मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया" मस्त गात होते....मज्जा आली...वेगवेगळ्या चालीत...मध्येच फास्ट मध्येच स्लो....त्यांना हवा तसा. आणि मध्येच त्या कॅमेर्यावाल्याने बापूंचा क्लोज अप घेतला..सॉलिड....त्या कॅमेर्यावाल्याला नशीब बुद्धी झाली क्लोज अप घ्यायची...आणि आम्हाला मस्त दर्शन झाले...क्लोज अप घेतल्यावर सगळे भक्त बापूंना पाहण्यासाठी धडपड करु लागले...सगळ्यांना धन्य धन्य वाटले...गजर झाला आणि पुन्हा रांगेत उभे राहिलो...
मग बरोबर १२ ला आम्ही गुरुक्षेत्रममध्ये शिरलो....इतक्यावेळ पायाला खडी लागत होती...पण जेव्हा गुरुक्षेत्रमच्या फरशीचा स्पर्श झाला....तेव्हा सगळा क्षीण निघून गेला....आता कितीही वेळ झाला तरी चालेल...पण बाप्पाचे दर्शन घ्यायचेच....रांगेत उभे होतो....उशीर झाला होता....१२:३० झाले....बहुतेक शेवटची ट्रेन चुकणार आता असच वाटले...म्हटल चुकली तर चुकली...होईल काही तरी सोय...आणि पुढे काय झाले ते माहीत नाही पण १२:४५ ला दर्शनाला आम्ही ७ व्या मजल्यावर गेलो होतो...हातात संकल्प सुपारी घेऊन... बापूंच्या घरी शिरलो तेव्हा काहिच त्रास होत नव्हता....तसेच गणपती बाप्पाचे आणि दत्तबाप्पाचे मनसोक्त दर्शन घेता आले..शांत चित्ताने नवस ही बोलता आला....पण बापू आई दादाचे दर्शन नाही झाले...

बापू आई दादाचे दर्शन नाही झाले.....पण कोणतीही खंत वाटली नाही किंवा वाईट वाटले नाही...कारण रांगेत उभे राहिल्यापासून बापू आई दादा तीघेही माझ्याबरोबर होते....त्यांचा हा "सहवास" मला त्यांच्या घरातून बाहेर पडताना जाणवला...कारण तीघांचेही दर्शन झाले नाही याची तसू भरही खंत तेव्हा मनात नव्हती....का? याचा विचार केल्यावर कळल की ते माझ्या बरोबरच होते कायम....अगदी घरी रात्री २:२० ला पोहचेपर्यंत. तसे ते नेहमी असतातच..पण मीच विसरते..

रात्री बिछान्यावर पडताना....शरिराचा एकेक भाग दुखत होता...पण या देवाच्या रांगेतील एक एक गोष्ट आणि एक एक अनुभव आठवून मला हसू येत होते....मी कशी काय या रांगेत उभे राहीले? हा प्रश्न पडला...पण लगेच त्याचे उत्तर सापडले...रांगेत मी उभीच नव्हते....ही देवाची रांग होती...आणि देव़च रांगेत उभा होता...नाही का? नाहीतर आपल्यात एवढी शक्ती आहेच कुठे?
पण एक बर वाटल....देवासाठी ताटकळत राहण....ज्या वाटेने हजारो भक्त गेले त्या वाटेने आपणही जाण....आणि मुख्य म्हणजे रांगेत उभे राहून देह झिजवणे....आणि थोडे शारिरिक कष्ट घेणे अस बरच काही अनुभवता आले....आणि खरच जे इतक्या वेळ रांगेत उभे राहिले...नेहमी राहतात....या सामान्य भक्तांच्या या असामान्य निर्धाराला मनापासून सलाम!!!! आणि  मी देखिल यांच्यातलीच एक आहे...आणि कायम राहो ही प्रार्थना!!! श्री राम

झालो जरी कुणीही आम्ही
सामान्यत्व सुटु नये
सामान्यातील असामान्यत्व
आमुचे कुणी लुटू नये....

Friday, September 10, 2010

गणपती माझा नाचत आला!!!

आज घरोघरी गणरायाचे आगमन होणार आहे..मी अनुभवलेले गणरायाचे सगळ्यात सॉलिड आगमन म्हणजे बापूंच्या घरच्या गणपतीचे आगमन. संध्याकाळी चार पाचच्या सुमारास बांद्रा पश्चिम लिंक रोडवरील अमरसन्स शोरुमजवळच्या गल्लीतून बापूंच्या घरच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक निघते. सगळ्यात पुढे लेझीम पथक, नंतर दिंडी, आणि बेन्जो असे वेगवेगळे ग्रुप्स या मिरवणूकीत् सहभागी होतात. गणपती बाप्पा मोरयाचा गजर करुन मिरवणूकीला सुरुवात होते..अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लहान मुले-मुली, महिला-पुरुष भक्तगण या मिरवणूकीत मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या मिरवणूकीत सगळे स्वतःला विसरुन सहभागी होतात. सॉलिड नाचतात. स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये आणि डॉ. पौरससिंह जोशी यांच्यासह समस्त बापू भक्तगण परिवार या मिरवणूकीत सहभागी होतो. अंधार होता होता...मिरवणूक बापूंच्या घराजवळ हॅपी होमला पोहचते..गजर, संगीत आणि बाप्पाच्या आगमनाचा आनंद टीपेला पोहोचतो. हॅपी होमच्या गेटजवळ भक्तांची अलोट गर्दी दाटलेली असते. गेटवर लेझीम पथक आधी येते...बापू आई दादा स्वतः गणरायाचे स्वागत करण्यासाठी खाली सज्ज असतात. लेझीम पथक आपले वेगवेगळे कर्तब बापूंपुढे सादर करतात..प्रत्येक जण बापूंचे दर्शन घेऊन नाचत पुढे जातो...मग मागून गणराय येतो...नंदाई गणरायाचे स्वागत करण्यासाठी औक्षणाचे ताट घेऊन आलेली असते. अत्यंत प्रेमाने नंदाई गणरायाचे औक्षण करते. मग गणेशमूर्ती घरी नेल्यावर बापू बेन्जोच्या तालावर सॉलिड नाचतात. त्यावेळेला जे तिथे वातावरण असते त्याचे कुणी वर्णनच करु शकत नाही, असे मला वाटते. ही गोष्ट प्रत्येकाने एकदा तरी अनुभवावी. गेल्यावर्षी मी हे सारे अनुभवले...आता यंदा काय काय होतेय याची मला आता उत्सुकता लागली आहे...मिरवणूक सुरु होण्यापर्यंतची अधीरता आणि सगळा कार्यक्रम संपल्यानंतरची तृप्तता याच्यासारख दुसर काही नाही....अरे हो!! ही तर फक्त आगमनाच्या मिरवणूकीची गोष्ट सांगितली....खरतर विसर्जनाच्या मिरवणूकीची याहून मोठी धम्माल आहे...आगमनाची मिरवणूक म्हणजे विसर्जन मिरवणूकीच्या तुलनेत फक्त १ टक्के आहे असे मला वाटते...सो. आज या. अनुभवा! पण एक लक्षात ठेवा...हा ट्रेलर आहे....पूर्ण पिक्चर तर सोमवारी आहे!!!!!
मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!मोरया!!

Friday, September 3, 2010

शक्ती दे_ एका दहावीतल्या मुलाची सुंदर कविता

 माझ्या सहकारी प्रभावीरा खिलारी यांचा मुलगा निखिल खिलारी याने बापूंवर अत्यंत सुंदर कविता केली आहे.. तो नववीत असताना त्याने ही कविता केली होती...नक्की वाचा...


शक्ती दे


तूच आहेस मनःसामर्थ्यदाता
तूच आहेस शक्तीदाता
विनायका तू, गजानना तू
तूच आहेस बुद्धीदाता
कृपासिंधु तू बलदाता

तूच धावशी संकटाला
तूच येई मदतीला
इथवर आलो दोन्ही कर जोडूनी
तुझ्या चरणांशी ठेवूनी मस्तक माझे
म्हणता, म्हणता माझे जीवन सर्व झाले तुझे

नकोसा झाला हा लाचार जन्म
ह्या जन्माला तू कुठेतरी वळण दे
दे मज शक्ती तू बलशाली
प्रतिकार करावया त्या शत्रूशी

पेटून उठू दे अंगात त्यागाच संचार
नसानसांत सळसळून उठू दे रक्ताचा अंगार
पुन्हा नव्याने जगण्याची, उसळण्याची तू शक्ती दे

निलेश सुरेश खिलारी
इयत्ता दहावी

Sunday, August 22, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग ४ (PARADE)

हरि ओम,
धपा धप तीन भाग लिहून झाले....जरा चौथ्या भागासाठी वेळ घेतला...मुद्दामूनच घेतला...कारण आता परेडसारख्याच अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी वळणार आहे....रेस्क्यु प्रॅक्टीस...
परेड काय आहे....आणि  रेस्क्यु प्रॅक्टीस काय? याचा मी नेहमी विचार करायचे...यातील जास्त महत्त्वाचे काय? .हा प्रश्न मला एकाने विचारला होता..मला उत्तर तेव्हा देता आले नाही...पण आज मी हे उत्तर देते...माझ्यामते, परेड आणि रेस्क्यू प्रॅक्टीस ही दोन्ही ए ए डी एमची विभक्त नसलेली जुळी बाळे आहेत...एकाशिवाय दुसरे राहू शकत नाही...दोघेही एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे दोन्ही गोष्टी एका डीएमव्हीसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. फक्त थॊडासा फरक जर करायचा झाला तर परेड हे साध्य नाही...साधन आहे...तर रेस्क्यु प्रॅक्टीस किंवा रेस्क्यु हे साध्य आहे...मी परेड का करायची तर....रेस्क्यु ऑपरेशनसाठी सदैव फिट रहावे म्हणून....म्हणजे जस आपल्या देशाचे सैनिक सीमेवर लढतात...ते त्यांचे कार्य असते...अगदी तसच...DMV चे आहे...अस मला वाटत...ते सीमेवरील आपत्तीशी लढतात....आपले काम सीमेआत येणार्या नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तीशी लढणे आहे...आता लढणे म्हणजे आगाऊपणा करत पुढे पुढे करण आणि स्वतःचा जीव धोक्यात घालणं नाही...तर आपल्या सरकारी यंत्रणांना (पोलीस द्ल, अग्नीशामक दल इत्यादी) त्यांच्या कामात पूर्ण सहकार्य करणं...कोणतीही आपत्ती उदभवू नये याची दक्षता घेणं...हे सगळ मी या देशाचा एक जबाबदार नागरिक म्हणून करायच...आणि ते उचित पद्धतीने करता याव...यासाठी ए ए डी एमचा डी एम व्ही होण गरजेच आहे....नाही तर काही तरी वेड्यासारख करायच आणि आपत्ती निवारण करण्या ऐवजी आपत्ती वाढवून ठेवायची...याच सगळ्यात मोठ्ठ आणि तापदायक उदाहरण म्हणजे "अफवा" पसरविणे....असो...मला काय म्हणायचे ते कळलेच असेल तुम्हाला...नसेल तर यावर आपण पुन्हा कधी तरी सविस्तर बोलू...आता वळूया आमच्या भन्नाट रेस्क्यू प्रॅक्टीसकडे....

तर परेडच्या रेस्क्यु प्रॅक्टीसकडे वळण्याआधी केंद्रावरील रेस्क्यु सरावाची थोडीशी मज्जा सांगते...केंद्रावर आमचा ए ए डी एम चा मस्त ग्रुप होता...मला अजूनही आठवतय...सगळे झपाटलेले होतो तेव्हा...मी, आशिष भाई, सुनि ताई, प्रसाद, प्रतिभा, भक्ती, निलेश, पराग इत्यादी...वेड लागल्यासारखा सराव करायचो...हीच आमची वसईची रेस्क्यु मेन टीम होती...आशिष भाई म्हणजे आशिष सोलंकी याने आम्हा सर्वांना बांधून ठेवलेले...अरे बांधून ठेवलेले म्हणजे एकत्र बांधून ठेवलेले...आज सगळे वेगवेगळ्या सेवेत सहभागी झालेले असलो तरिही त्या आठवणि ताज्या आहेत... खूप प्रॅक्टीस करायचो...मी तेव्हा अत्यंत बारीक होते आणि वजनाने तर एकदम फूलच होते...त्यामुळे प्रत्येक प्रॅक्टीसला माझा हमखास बळी जायचा...म्हणजे सर्व जण मला कॅज्युलटी म्हणून वापरायचे...ही झाली केंद्राची रेस्क्यु टीम..दुसरी अजून एक टीम होती...बोरीवली ते विरारमधील अती ऍक्टीव्ह डीएमव्हींची..यामध्ये मला फारशी नावे आठवत नाहीत पण मी, सुनी ताई, प्रसाद, शैलेश धुरी, अनिकेत कोळंबकर, सचिन सरैय्या, निलेश पोवळे असे बरेच जण होतो...अरे काय धम्माल केली आहे आम्ही...बोरीवली ते बोईसर दरम्यान कुठेही ए ए डी एम चा कोर्स असला की जायचो आम्ही...सोबत...अरविंदसिंह नातू (नातू काका), जाधव काका, अशोकसिंह वर्तक हे कधीतरी असायचे मार्गदर्शन द्यायला...सगळे जण या तिघांना जाम टरकायचे..पण हे तिनही काका आम्हाला छान मार्गदर्शन करायचे...खूप शिकायला मिळाले यांच्याकडून...खूप छान मोटीव्हेशन द्यायचे...मला सगळ्यात जास्त भिती नातू काका आणि वर्तक काकांची वाटायची...ते गुगली प्रश्न विचारायचे...ते दिसले की मी लांब पळायची...पण आता नाही घाबरत :). एकदा नातू काकांनी मला विरारला चालेल्या प्रॅक्टीस दरम्यान प्रश्न विचारला..मी त्याचे उत्तर दिले तर त्या उत्तरावर पुन्हा प्रश्न विचारला..बापरे मी नंतर उत्तरच दिले नाही पुढचा प्रश्न येईल या भितीने...प्रश्न नेमका आठवत नाही पण तेव्हा ते म्हणाले होते की एका डीएमव्हीचे G K  पक्के पाहीजे...त्याला सगळ्या चालू घडामोडींची माहीती पाहीजे. तेव्हा पासून मी तस स्वतःला शक्य तितके अपडेटेड ठेवायला लागले...आणि त्याचा आत्ता खूप फायद झाला...Thank You Very Much Natu Kaka...त्यानंतर वर्तक काकांनी मला पाणजू येथे झालेल्या कोर्सला प्रश्न विचारला सगळ्यांसमोर...रेश्मा आता तू इतक करतेस सेवा आणि AADM  पुढे लग्न झाल्यावर काय करणार? तुझ्या नवर्याने नाही पाठवल मग? तेव्हा मला खूप भिती वाटली. खरच अस झाल तर...पण मी ठामपणे उत्तर दिले...नवरा सोडेन बापूंची सेवा नाही....यावर त्यांनी माझ्याशी खूप वाद घातला..(हा वाद माझ्या भल्यासाठीच होता हे मला पक्के ठाऊक होते) पण मी ठाम होते...आजही आहे...पण खरच त्यांनी त्या दिवशी विचारलेल्या प्रश्नाने माझे विचार बदलू लागले...आणि खरच मला काय हवय...आणि काय नकोय याची एक चौकट बनू लागली...पण ही चौकट माझे बंधन नाही बनली...आणि या मर्यादेच्या चौकटीत राहूनच प्रगतीच्या दिशेने माझा जोमाने प्रवास सुरु झाला...जो आजही सुरु आहे..तेव्हा माझे वय १९/२० असेल..हे सगळ सांगायचा मुद्दा असा की, ए ए डी एम आणि परेड या सारख्या सेवांमध्ये फक्त मी सहभागी नाही झाले..तर या सेवा करताना अनेक बाबींतून मी घडत गेले...या सेवे दरम्यान संपर्कात आलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखे होते..ते मी शिकले...त्यामुळे या बापूंच्या कार्यात झोकून दिल्याने माझ कुठही नुकसान झाले नाही. अनेकांनी मला वेड्यात काढले...अगदी नातेवाईकांनी सुद्धा...बापूंच्या सेवेत आणि या नसत्या उद्योगात सहभागी होऊन तुला काय मिळणार आहे? काय उपयोग याचा? अशा प्रश्नांचा भडीमार व्हायचा...पण असे प्रश्न झेलण्याची ताकद बापूंनी दिली. तेव्हा त्यांना मी उत्तरे दिली नाहीत...आणि आज पुन्हा त्यांच्यात हे प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही...ह्यालाच म्हणतात खरा "बापूंचा चमत्कार"

तर असो,

आम्ही मचाण बांधण्यापासून ते मोडण्यापर्यंतचे आणि या दरम्यान डेमॊ दाखविण्याचे सर्व उद्योग करायचो..सचिन सरैय्या, निलेश, शैलेश, प्रसाद हे सगळे मचाण बांधण्यात पुढे असायचे..एकदा तर सगळे मचाणावर चढलो...आणि पडतय की काय अस झालेल...पण बापू कृपेने नाही पडले...आणि आम्ही सगळे सुखरुप होतो...वसईलाच झालेले हे बहुतेक...आम्ही रेस्क्युच्या काही नविन पद्धती देखील शोधून काढल्या होत्या..अभ्यासक्रमाच्या बाहेरील....हा हा हा....काय भन्नाट डोकी चालायची आमची..केंद्रावर रेस्क्यु प्रॅक्टीस जोरदार चालली होती...मध्येच आम्ही कांदीवलीला एका शाळेत सरावाला जायचो...तिथे त्या बैठ्या शाळेच्या छपरावर जायचो आणि तिथून सेफ जंपचा सराव करायचो...मी एकदाच मारली जंप..बाबारे!!!...लय भिती वाटायची जंप ला...लॅडरने चढणे उतरणे वैगरे...त्यानंतर दहिसरच्या मैदानात सराव सुरु झाला...येथे तर धम्माल यायची..प्रसाद धुमाळी, सत्या..वैगरे दहिसरचे डीएमव्ही येथे एकत्र सराव करायचो...

इकडची एक गम्मत आठवतेय...दहिसरचे हे ग्राऊंड जरा गवताळ होत...त्यामुळे इथे सराव करताना फार प्रसन्न वाटायच...रात्री ७ / ७:३० नंतर सराव चालायचा. आम्ही इथे कॅज्युलटीला स्ट्रेचरवर घ्यायचो त्या ग्राऊंडला चक्कर मारायचो. एक किंवा दोन..मला हे सगळे सारखे कॅज्युलटी बनवायचे...त्यामुळे इथे माझा सराव कमीच व्हायचा...खर सांगू मी कुणाला उचलू शकेन अस कुणीच नव्हत तिथे...आणि मी परेफेक्ट कॅज्युल्टी असायची....डीएमव्हीला अजिबात सहकार्य न करणारी...अंगच टाकून द्यायची मी मला हॅण्डल करणार्या डीएमव्हीवर...मग मज्जा यायची त्यांची...असो...तर एकदा सगळ्या मुलींनी मला रोप स्ट्रेचरवर उचलले. त्यांनी बरोबर उचलले नव्हते...एक राऊंड झाल्यानंतर त्यांनी मला खाली ठेवले. खाली ठेवताना माझ डोक आपटले...माझा श्वासोच्छावास बंद होता..अंग थंड पडले होते...डोळे वर गेले होते...ठेवल्यानंतर मी उठेनाच...सगळे घाबरले...भक्ती हरचेकर माझी चुलत चुलत बहीण ही माझ्या डोक्याजवळ होती स्ट्रेचर धरायला. ती घाबरली. तीने मला गदा गदा हलविले मी उठली नाही...बाकीच्यांनी हात पाय चोळायला घेतले..भक्ती खूप घाबरली..शेवटी तिने थोबाडीत मारायला सुरुवात केली मला. एक...दोन...तीन..फटाफट...दहा तरी मारल्या असतील तिने...शेवटी मला सहन नाही झाले....आणि मी म्हटल बस!!!! आले मी शुद्धीवर...आणि हसायला लागले..हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा हा
मी नाटक करीत होते..पाचच मिनिटाचे होते...पण सगळ्यांचे धाबे दणाणले होते...मी मस्त त्या गवतावर पहडून सगळ्यांकडे पाहत होते हसत...सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होते..भक्तीचे पाण्याने डबडबले डोळे पाहून मला हसूच आवरेना...मग माझी वाट लागली...सगळ्यांनी असले धुतलय मला!!!...भक्तीने तर गळाच धरला..सुनिताईने चांगलेच धपाटे घातले...मुलांनी तर त्यांच्या वतीने माझ्या कमरेत लाथ घालायला सांगितली..तुडव तुडव तुडवला मला..आणि वॉर्निंग दिली..पुन्हा अस करायच नाही...सगळ्या डीएमव्हींची..हुशार डीएमव्हीची तेव्हा फाटली होती..मला जाम हसू येत होत..मग सगळे शांत झाल्यावर मी त्यांना म्हटल तुम्ही सगळ्यांनी चुकीच्या पद्धतीने मला उचलल होत...त्यामुळे माझा पाठीचा कणा कामातून गेला असता..शिवाय माझ डोक ही आपटल...कितीला पडल असत हे एका कॅज्युलटीला...म्हणून मी मुद्दामुनच नाटक केले...हा हा हा हा...
त्यांना पण हे लक्षात आल...पण पुन्हा मी अस करणार नाही अस वचन दिल्यानंतरच त्यांनी मला माफ केल..मी पण अस पुन्हा कधी केल नाही...नाहीतर लांडगा आला रे आला झाल असत माझ..आणि माझ्याही चुका होतच होत्या की...पण एक गोष्ट यानंतर छान झाली ती म्हणजे मी कॅज्युलटी म्हणून नाकारले जाऊ लागले झाले...कुणीही चालेल रेश्मा नको....हा हा हा....
असो तर अशी धम्माल करीत चालायचा आमचा रेस्क्यु सराव...त्यानंतर माझी निवड परेडच्या रेस्क्यु टीममध्ये झाली...आणि इथे तर सगळ भन्नाटच होत....आहा हा काय दिवस होते ते...अगदी मंतरलेले....Top of the World.. ते पाहू आपण पुढच्या भागात...सावधान होऊन ऐका बर का!!!! तूर्तास अनिरुद्ध पथक विश्राम

Saturday, August 21, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - विशे़ष

अरे तीन दिवसात ३ भाग लिहून झाले...आता चौथा भाग....या भागात रेस्क्युची मजा सांगणार होती ना मी?? हो सांगणारच आहे..पण या भागात नाही....जरा उत्सुकता ताणून धरुया आणखीन...कारण मी येथे बुफे नाही ठेवलाय...ही पंगत आहे..ज्यात भात वाढल्यानंतरच वरण येणार...स्वतःच्या मर्जीने कुणालाही आधी वरण मी घेऊ देणार नाही....पण मी जे काही वाढणार ते अगदी प्रेमाने आणि बापूंवरील निष्ठेनेच...मग बसणार या परेडच्या पंगतीला? छे!!! मी पण बावळट आहे. काय विचारतेय...तुम्ही बसलातच की....भात, वरण, भाजी घेतलीच की तुम्ही आधीच्या तीन भागात...आता पोळीची वेळ. नाही...पण आता तुम्हाला मी पोळी देणार नाही तर मिरचीचा ठेचा देणार आहे....झोंबला तर माफ करा!! पण माझा नाईलाज आहे...कारण आधीच सांगितले हा बुफे नाही जिथे तुम्हाला हवे ते मिळेल... ही पंगत आहे...माझ्या बापूंवरील प्रेमाची, परेडवरील निष्ठेची...आणि मी आणि माझ्या बापूंनीच ठरवलय...की आता या भागात ठेचाच द्यायचा....

जरा चक्रावलात ना!! चायला ही कोण कुठली रेश्मा आम्हाला ठेचा देतेय...हीलाच ठेचू...असे विचार पण मनात आले असतील तुमच्या...असो...तुम्ही मला ठेचा नाहीतर ठोका....मला काही फरक पडत नाही....पण हा ठेचा द्यावसा वाटला तो स्वप्निलसिंह दत्तोपाध्ये यांनी तिसर्या भागावर दिलेल्या प्रतिक्रियेमुळे ... या प्रतिक्रीयेमध्ये स्वप्निलसिंह म्हणतात, "तुझ्या लेखाबरोबरच मी बाकीच्यांचे प्रतिसाद सुध्दा वाचले पण खर सांगू का लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. उत्साह आणि चैतन्याने भरलेली परेड, तेवढाच जिवंत त्यावरचा लेख, तोही एका DMV ने लिहलेला. पण प्रतिसाद देणारे परेड DMV, आणि बाकीचे मात्र अतिशय अनुत्साही वाटले. खरतर मला वाटले की कोणीतरी आपलाही अनुभव येथे देईल, त्यांच्या वेळेसची मजा शेअर करेल, उत्साहात स्वतःचा ब्लॉग सुरु करेल. पण ती जादू काही घडली नाही. दुसर्‍याला छान म्हणण्याबरोबरच माझे काहीतरी सुध्दा त्याच्या बरोबर शेअर करणे महत्वाचे असते."

त्यामुळेच

ही घ्या ह्या ठेच्यातील पहिली मिरची :
तीन भाग लिहून झाले...सगळ्यांनी माझे कौतुक केले...पण मला या कौतुकाची अपेक्षा नव्हती...कारण मला जे काय मिळवायचे होते ते मिळवले आणि जे काही मिळवायचे आहे ते मिळविण्यास मी आणि माझा बापू समर्थ आहोत...पण यामागची खरी तळमळ काय? तर हेच जे स्वप्निलसिंहनी सांगितले..खरचं मला अपेक्षा होती...ती ह्या अनुभवांच्या वाचकांकडून उत्स्फुर्त प्रतिसादाची...जो "छान, व्हेरी गुड, अप्रतिम आणि ग्रेट या शब्दांच्या पलिकडला असेल...पण छे मी हरले....तुमची गाडी याच्या पुढे गेलीच नाही....पोपटच केला माझा...त्यामुळे मला खर तर प्रश्न पडलाय पुढचे अनुभव देऊ की नको....पण मी देणार आहे....कारण मला कमेंटची पर्वा नाही तर कृतीची आहे....जी परेड ग्राऊंडवर किंवा परेडमध्ये दिसणे आवश्यक आहे.

ही घ्या ह्या ठेच्यातील दुसरी मिरची :
लेख जेवढा अप्रतिम जिवंत वाटला, प्रतिसाद तेवढेच शुष्क वाटले. असे स्वप्निलसिंह म्हणतात...खरचं प्रतिसाद शुष्क आहेत...बापूंचा एक अनुभव मांडता येत नाही...आपल्याला...लाज वाटायला पाहिजे...बापूंबद्द्ल दोन ओळीपण लिहता येत नाही....आपल्याला....अरे/अग इतक कठीण काय असत त्यात...वेडु वाकूडे सगळे शब्द त्याला समजतात...अरे/अग मग काय हरकत आहे...कुणी सांगितलय अलंकारिक भाषा वापरायला...ही काय ब्लॉग स्पर्धा आहे...की निंबध लेखन आहे....ही तर आपल्या बापूंच्या कौतुकांची स्लॅम बुक आहे...यात मला अती सामान्य भाषेत बापूंबद्दल लिहता येईल की...कशाला घाबरत आहात...मी तरी कुठली सभ्य भाषा वापरली आहे...चायला मायला शब्द (सो कॉल्ड शिव्या) कितीदा आले असतील लिखाणात...पण त्या सुद्धा तुम्ही सहज वाचल्या की...त्यातला भाव तुम्हाला कळतो...की...मग जस बोलता तस लिहा. हो! पण जास्त शिव्यापण वापरु नका....तस इकडे कुणाला भाषेची पडलेली नाही...हा माझा आणि माझ्या बापूचा ब्लॉग आहे येथे भाषेपेक्षा भावाला जास्त महत्त्व आहे..येऊ देत ना तुमचे जीवंत प्रतिसाद...माझ्या या जिवंत अनुभवाला....प्रतिसादच कशाला तुमचेच जिवंत अनुभवच येऊ द्या....अनुभवच कशाला....तुमचा जीवंत ब्लॉगच होऊन जाऊ दे ना!!!!

ही घ्या ह्या ठेच्यातील तिसरी मिरची :

"काय आहे रेश्मा तू खूप छान लिहलयस...या तोडीच आम्हाला लिहता येत नाही...आणि खर सांगू वेळ नाही मिळत...तुला काय तू पडीक असतेस इंटरनेटवर...तुला कोण घरी विचारणार...आम्हाला संसार आहे..मुले बाळे आहेत....तुला काय? आम्हाला वेळ नाही मिळत..." सॉरी बॉस मला कारण देऊ नका...स्वतःचा डीफेन्सही मांडू नका..मला लिहता येत नाही अस जो म्हणणारा आहे ना!! त्याला कधीच लिहता येणार नाही...कारण जो पर्यंत लिहून घेणार्याची जागा मी माझ्या बापूला देत नाही तोपर्यंत लिहताच येणार नाही त्या व्यक्तीला...सॉरी कठोर बोलतेय...पण खर तेच आहे....आणि माझ्या अनुभवाचेच बोल आहेत....
दुसर म्हणजे वेळ नाही....प्लीज डोन्ट से धीस....अगेन टू मी....कारण वेळ काढला तर मिळतो....आणि वेळ काढता येतो....मला माहित आहे....खरच काही जणांना वेळ नसतोच...पण जे काढू शकतात...त्यांनी तो काढावा...आणि तुम्हाला तो नक्की मिळेल याची मला खात्री आहे...खर सांगू माझ्या ब्लॉगवर तसेच...इतरांच्या ब्लॉगवर वेळात वेळ काढून जर स्वप्निलसिंह कमेंट देऊ शकतात...तर नक्कीच आपण कुणीही देऊ शकतो...
आणि राहिली गोष्ट मी इंटरनेटवर पडीक असण्याची...तर मित्र-मैत्रींणींनो मला शेंड्या लावू नका...कोण कोण कुठल्या कुठल्या सोशल नेटवर्कींग साईट्वर काय काय खयाली पुलाव पकवत असतात. ते मला चांगलेच ठाऊक आहे....हे सगळ करत असताना पाच मिनिटाचा वेळ काढून तुम्हाला तुमच्या बापूंचे गुणसंकिर्तन करावेसे वाटत नाही?...का त्याची गरज वाटत नाही...की बापूंचा अनुभव शेअर करायला लाज वाटते? होय मी इंटरनेटवर पडीक आहे...रात्र रात्र घालवते मी यावर....पण कशासाठी....उत्तर तुमच्या समोर आहे....तुमच्या पेक्षा अधिक चांगले खयाली पुलाव ही पकवत असते....पण त्यातही माझा बापू हा असतोच...शोधाल तर सापडेल...सांगायचा मुद्दा असा....की दहशतवादी देखिल त्यांच्या प्रचार प्रसारासाठी इंटरनेट, ब्लॉगचा वापर करत आहेत....म्हणजे हा किति प्रभावी मिडीया आहे ते समजून घ्या....आणि किमान दोन ओळींचे बापूंचे गुणसंकिर्तन करा...प्लीज हरी ओम, आणि श्रीराम, अथवा राम अस हजारदा कॉपीपेस्ट करु नका...नाहीतर तुम्ही म्हणाल हे देखिल नामसंकिर्तन आहे..चालेल की....नाही चालणार....मला माझ्या बापूंचे प्रेम शब्दात व्यक्त करण्यास जमणे म्हणजेच त्याचे गुणसंकिर्तन करणे होय...अस मला वाटते...आणि हे देखिल तोच आपल्याकडून करवून घेतो...कारण त्याला हे आवडते...नाही का?
उरला प्रश्न संसाराचा मग तुमचा असो की माझा..तर एक गोष्ट सांगते...की बापू आईंना देखिल संसार आहे आणि तो व्यापक आहे....त्यांच्या मुला-मुलींचेही संसार आहेत...तरीही ते सगळ व्यवस्थित मॅनेज करतात...कारण ते त्यांच्या देवाला कारणे देत नाही....आणि नेमून दिलेले कार्य करतात...आपली त्यांच्याशी तुलना कधीच नाही पण त्यांच्याकडून हे नक्कीच शिकू शकतो आणि प्रयास करु शकतो ......तुमच माहीत नाही बुवा पण मी तरी शिकते बाबा...

अरे काय म्हणता तुमच्याकडे कॉम्प्युटर नाही, आणि तुमच्याकडे कॉम्प्युटर असून चालविता येत नाही..इंटरनेट वापरता येत नाही...अहो तुम्हाला आठवत नाही का?...बापू प्रवचनातून कित्येकदा बोलले होते की ज्याला कॉम्प्युटर, इंटरनेट वापरता येत नाही तो २१ व्या शतकात अडाणी ठरेल...मग अडाणी ठरायच आहे का आपल्याला...नाही ना!! मग ज्यांना शक्य आहे त्यांनी शिकायला नको का? मग शिका....
ठीक आहे ज्यांना नाही शिकता येणार किंवा ज्यांना सायबरचा खर्च नाही परवडणार...त्यांनी त्यांचे अनुभव हाताने लिहुन द्या ना....इंटरनेटवर टाकायची जबाबदारी माझी आणि माझ्यासारख्या पडीक इंटरनेटकरांची....अरे किती ब्लॉगर्स आहेत....द्या त्यांच्याकडे लिहून....मलाच दिला पाहिजे अस ही नाही....शिवाय इंटरनेटवर अनुभव द्यायला आपली हक्काची जागा पण आपल्याला लवकरच मिळणार आहे....बरं का!!! हे लक्षात ठेवा....

अरे बापरे खुप झोंबला का हो ठेचा? नाही झोंबला ना!!!! मला माहीतच होत नाही झोंबणार....आणि ज्याने माझी "साद" ओळखून "अपेक्षीत" तो "प्रतिसाद" दिला आहे...त्याला हा ठेचा नाही झॊंबणार...पण तरीही प्रत्येकाला नावाला ठेचा लागतोच नाही का? तेच तेच गोड...मुळमुळीत रोज कोण खाणार...म्हणून जरा हा झटका....

परेडबद्दल मी लाखो अनुभव लिहीन पण शेवटी परेड ग्राऊंड हे ओसाड आणि परेड डीएमव्ही, डीएमव्ही हे शुष्क, राहणार असतील...तर काय उपयोग ना!....आणि मग ठेचाही फुकट गेला म्हणायचा....असो....ठेचा उपयोगी पडो अथवा फुकट जावो....रेस्क्यु अनुभवाची पोळी तुमच्या घशात मी आणि बापू घालणारच आहोत...आणि ती तुम्ही प्रेमाने खाणार याची मला खात्री आहे....जास्तच झोंबणारे लिहले असेल...तर शंभरदा माफी मागते....कारण "ठेचा देण्याचा" माझा अधिकार नाही. याचे मला भान आहे....पण हा ठेचा मित्र मैत्रीणींना वाटण्याचा अधिकार नक्कीच आहे...कारण तुम्हाला देण्याआधी तो मी खाल्ला आहे...आणि त्याचा मला उपयोग झाला आहे....


तर भेटू रविवारी, रिपोर्टींग टायमिंग ७:३०, ग्राऊंड "साद" ..नक्की या! पण कोरडे नका येऊ....तुमच्या प्रतिसादाची "ढगफूटी" होऊ दे....महापूराची वाट पाहतेय....हरि ओम!! श्री राम.....

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग २
परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग ३

Thursday, August 19, 2010

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग 3 (PARADE)

हरि ओम

परेडचे दोन भाग सगळ्यांनी आनंदाने वाचले...उत्तम प्रतिसाद ही दिला. यासाठी शतशः श्री राम!!!. प्रत्येकाने मला म्हटलं तू ग्रेट आहेस...सही आहेस...खूप कौतुक केल. धन्यवाद श्रीराम...पण हे सर्व स्वतःचे कौतुक करुन घेण्यासाठी नाही लिहले. तस करायच असत तर याआधी ही हे केल असत. पण माझा तो उद्देश नाही. परेडची जी ओळख मला झाली आणि परेडमुळे माझी जी ओळख झाली ते तुम्हाला सांगायच होत...हे सगळ वाचून एक जरी परेडला याच निष्ठेने जॉईन किंवा रिजॉईन झाला तर हे सगळ लिहण्याचे सार्थक झाले अस मी समजेन. असो...
हा फोटो मी परेड सोडल्यानंतरचा आहे..यामध्ये पहिल्या प्लाटूनमध्ये काही माझ्या बॅचच्यामुली आहेत. दहिना दर्शक म्हणून शर्वरी आहे. संस्थेचा ध्वज धरुन रश्मी मर्चंट आहे.
तर मागच्या भागात १५ ऑगस्टच्या परेडचा अनुभव सांगितला. यानंतर परेडमध्ये आणि परेडमार्फत घेण्यात येणार्या सेवांमध्ये स्वतःला पूर्ण झोकून दिले.
मागच्या दोन भागांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने मी सांगितली की घरातून विरोध होता. पण त्यालाही मीच जबाबदार होते..करीयर वार्यावर सोडून "परेड....परेड" केल तर घरचे विरोध करणार नाही तर काय करणार याची जाणिव परेडमध्येच झाली. कशी? तर एकदा असचं आम्हाला एका सरांनी लेक्चर दिले होते. त्यामध्ये त्यांनी हलकासा उल्लेख केला होता की "अपने करीयर पे भी ध्यान देना चाहिए. सब छोड छाड के परेड के लिए भागोगे तो बापू को अच्छा नही लगेगा" हे वाक्य खूप मनाला लागले...कारण मी नेमके तेच करीत होते.
मी जेव्हा परेडला आले ते बारावी सायन्स "नापास" असा शिक्का घेऊनच. खूप प्रयत्न केला पण माझी गाडी पुढे सरकेनाच..फिजिक्स म्हणजे मला यमदूत वाटायचा...त्यामुळे पुढे शिकायचेच नाही अस ठरवल होत. जेव्हा मला आपल्या चुकीची जाणिव झाली तेव्हा मी जोमाने अभ्यासाला लागले आणि त्यावर्षी बारावी पास झाले. तरी पुढे नवा प्रश्न...आता पुढे काय? खर तर पुढे शिकायची तयारीच नव्हती...पण करीयर केले पाहिजे...नाहीतर बापूंना आवडणार नाही....आणि परेड ला ही विरोध होईल. म्हणून दहावीच्या मार्क्सवर रेल्वेमध्ये बेसिक ट्रेनिंग कोर्सला (बीटीसी) प्रवेश घेतला. दहावीला चांगले टक्के असल्याने मला तिथे सहज प्रवेश मिळाला. तिथे मी इलेक्ट्रीशीयनचा कोर्स करुन पुढे रेल्वेतच जॉब करायच ठरवल. साईड बाय साईड परेड सुरु होती. रेल्वे मधून स्टायपेंड मिळत होता. त्याचा पूरेपूर वापर परेडच्या गरजा भागविण्यासाठी केला.
आता तुम्हाला हे सगळ सांगायची गरज का? असा प्रश्न पडला असेल ना? तर मग ऐका,
बीटीसीमध्ये आम्हाला सगळ काही शिकवल जात होत. तिथे परेड ही शिकविली जात होती. आम्ही सहा मुली होतो..बाकी सगळी मुले होती. महाराष्ट्राच्या कान्याकोपर्यातून या कोर्ससाठी मुले आली होती. आम्हाला २६ जानेवारीसाठी परेडला घेतल होत. सगळ्यांनाच. पण कुणालाही करायची इच्छा नव्हती..मला काय!! मी तर जाम खुशीत होते...कारण आठवड्यातून तीनदा माझी प्रॅक्टीस होणार होती. तिथेही माझी परेड जोरदार सुरु होती. तिथल्या सरांना माझी परेड आणि ऍटीट्युड आवडले. त्यांनी मला त्या बीटीसी प्लाटूनचा कमांडर नेमला. मी नको नको म्हणत असताना देखील. मी नको म्हणायच कारण म्हणजे मला देवाच्या दारात परेड करायची होती. रेल्वेत जरी मी कमांडर असले तरी मला देवाच्या दारातच परेड करायची होती. मग मी कोणत्याही कोपर्यात का असेना!!
सर माझ्याच मागे लागले की तूच व्हायचच कमांडर...मग तेव्हा मी त्यांना सरळ उत्तर दिल...जमणार नाही...कारण ही सांगितल.."ज्या अनिरुद्ध पथकात जाऊन मी परेड शिकले, आणि तुम्ही ज्या माझ्या परेडच कौतुक करत आहात...ती परेड मला या २६ जानेवारीला अनिरुद्ध पथकातूनच करायची आहे..मला माफ करा आणि तूम्ही दुसर्या कोणाची तरी नेमणूक करा. मी नाही येणार." माझ्या या उत्तराने बहुतेक सरांचा इगो हर्ट झाला किंवा आणखीन काही तरी प्रोब्लेम झाला असावा...कारण त्यानंतर मला बीटीसीमध्ये प्रचंड त्रास झाला. त्यावर्षी मी कमांडर झाले असते तर बीटीसीची मी बहुतेक पहिली महिला कमांडर ठरली असते..असो...त्यानंतर मात्र मला प्रचंड त्रास झाला.
पहिले म्हणजे मला त्यांनी इलेक्ट्रीशीयनच्या कोर्सला न घालता एसी वाईंडींगला घातले..दुसरे म्हणजे साफ सफाई तर इतकी करुन घेतली की जर साफ सफाईची ती स्पर्धा असती तर गोल्ड मेडल मिळाले असते मला. माझा कुठलाही जॉब त्यांना पटतच नव्हता. ना फायलिंग, ना वेल्डींग, ना कटींग...शेवटी तिकडचे मित्र मला हे सगळ करुन देत होते. एकदा तर सरांनी मला ते रेल्वेचे अवजड भले मोठे बाबाआझमच्या काळातले पंखे पुसायला सांगितले...एक दोन नव्हेत चांगले २५ होते...त्या दिवशी खरोखर मला रडायला आले आणि मी ठरवल गेली चुलीत रेल्वेची नोकरी..आणि मी बीटीसी सोडून पुढे पदवी शिक्षण घेण्याचे ठरविले. खर तर रेल्वेतील वातावरण माझ्या वृत्तीला पोषक नव्हते...रेल्वे सोडले आणि पुन्हा पुढे काय? हा प्रश्न आला...बापू घेतील पाहून पण मी स्वस्थ बसणार नाही अस ठरवलं...पुढे मी माझे शिक्षण पूर्ण करण्याचा ध्यास घेतला आणि आज मी माझ एम ए पूर्ण केले..त्याच दरम्यान फोटोग्राफी शिकले...फोटोग्राफी शिकण्याचे देखील परेड मार्फत आयोजित केलेल्या एका प्रदर्शनात क्लिक झाले..आणि प्रिया मिसने मला फोटोग्राफीसाठी मार्गदर्शन केले...ती जिथे शिकली तिथेच मी फोटोग्राफीसाठी ऍडमिशन घेतले...आणि नंतर म्हणजे धम्माल बापूंनी प्रत्यक्षमध्ये घेतले...हे सगळ परेडमुळे शक्य झाल. कारण प्रत्यक्षमध्ये लागले तेव्हा माझ्याकडे साधी पदवीपण नव्हती...फोटोग्राफीचे बेसिक माहिती होती..आणि बरे फोटो काढता येत होते..पुढे सगळ प्रत्यक्षमध्येच शिकले...धन्यवाद बापूंचे आणि सर्व सहकार्यांचे...परेडमध्ये नसते तर इथे पोहचूच शकले नसते...अस मला वाटते...असो...ही झाली पुढची गोष्ट...
त्याआधी म्हणजे रेल्वे सोडून प्रत्यक्षमध्ये लागण्याच्या दरम्यान परेड बोरीवली येथे शिफ्ट झाली होती. वसई - विक्रोळी हा प्रवास कमी झाला. खूप वाईट वाटल...तोडल्यासारख वाटल...पण विस्तार वाढतो तस विभाग करावेच लागतात ना!!! बोरीवलीला प्रिया मिस आणि तृप्ती मिस यांच्या हाताखाली पुढचे परेडचे प्रशिक्षण सुरु झाले...खर तर आम्ही सगळे एकाच बॅचचे...पण त्यांच्या कमांडखाली परेड करायला मज्जा आली. तृप्ती मिसचे शूट आऊट फार आवडायचे मला. कमरेच्यावर पाय जायचा तिचा...तिच्याकडून प्रेरणा घेऊन मी ही त्यासाठी सराव सुरु केला..घरी हाच सराव चालायचा...येथे एक गोष्ट शिकले की आपल्या बरोबरीची मंडळीपुढे गेली की त्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि ते पुढे गेले म्हणून मनात असूया बाळगायची नाही...बापूंनी सांगितलेले प्रत्येकाची रांग वेगळी आहे...आणि प्रत्येकासाठी त्याने कार्य ठरविलेले आहे. ते बरोबर  आपल्याकडूनच करवून घेणार...याची प्रचिती आली ती म्हणजे पुढे जेव्हा नालासोपारा परेड केंद्राचे मला परेड कमांडर म्हणून नेमले तेव्हा...आणि ही गोष्ट मला पुढच्या आयुष्यात ही उपयोगी ठरली...नालासोपाराला जाणे म्हणजे अजून एक विभाग...वाईट वाटले...आपल्या लोकांना सोडणार....पण काय करणार...आदेश तो आदॆश....
हा आत्ताच्या १५ ऑगस्टचा  (२०१०) फोटो आहे..यामध्ये सर्व माजी परेड डीएमव्ही दिसत आहे..अपर्णा मिस, प्रिया मिस, रश्मी, रुपेश सर, तृप्ती मिस, प्रविण, कुणाल, निलेश हे दिसत आहेत. या सगळ्यांना एकाच फोटोमध्ये पकडण्याची संधी मला मिळाली आणि त्याचा मी पूरेपुर फायदा उठविला.
बोरीवलीला मध्येच दहिसरला परेड व्हायची....मज्जा यायची....येथूनच माझी परेड रेस्क्यु टीममध्ये निवड झाली आणि रेस्क्यु टीममध्ये  निवड झाल्यानंतर जी काय धम्माल केली ती म्हणजे या सर्व अनुभवांचा कळस आहे....
ते  सांगेन पुढील भागात....तुर्तास दहिने से आगे पढ!!!

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग १ (PARADE)

परेड - एक अविस्मरणिय अनुभव - भाग २ (PARADE)