Monday, May 13, 2013

कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...


किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात....
कमळ पाहिले मी राया..कमळ पाहिले मी...

गुरुवारी हा अभंग ऐकला आणि मन अजूनही ह्या अभंगाच्याच अवती-भोवती घुटमळतेय. ह्या अभंगाचि जादू अशीच आहे. मात्र, ह्या अभंगाचा इफेक्ट इतके दिवस टिकून राहण्यास कारणीभूत ठरलेली अजून एक व्यक्ती...जॉर्ज वॉशिंटन कार्व्हर..
यास योगायोग म्हणा किंवा आणखी काहीही...परंतु ह्या अभंगाचा भावार्थ, अर्थ, मतितार्थ मला कळावा म्हणूनच की काय गुरुवारीच बापूंनी माझ्याकडून "एक होता कर्व्हर" हे पुस्तक वाचून पूर्ण करुन घेतले. मंगळवारी रात्री पुस्तक हातात मिळाल्यानंतर दोन दिवसात झपाटल्यासारखं वाचून काढले. तसे हे पुस्तक मी दुसर्‍यांदा वाचत होते पाच सहा वर्षांपूर्वी जेव्हा मी हे पुस्तक वाचले होते...तेव्हाची अधीरता आणि उत्साह आजही वाचताना होता. त्यावेळी ह्या पुस्तकाने अर्थात कार्व्हर यांच्या चरित्राने जसे अंतर्मूख केले होते तसेच आजही केले...फक्त यावेळी साथ मिळाली ती आद्यपिपादादांच्या "कमळ पाहिले मी रे राया" या अभंगाची. 
डॉ. कार्व्हर यांच्या चरित्राने मला कमळ पाहिले राया हा अभंग समजण्याची बुद्धी मिळाली...तर अभंग काय सांगतो हे अनुभवण्यची सुसंधी कार्व्हर यांच्या चरित्रातून मिळाली. अंबज्ञ.
खरचं, 
कमळ पाहिले मी राया....कमळ पाहिले मी...॥धृ॥

काय त्याची सुंदरता....काय त्याचा थाट...
चिखलामधूनी वर येऊनी...झळके दिमाखात राया...झळके दिमाखात ॥१॥

गुलामगिरीच्या चिखलातूनवर आलेल्या कार्व्हर यांच्या जीवन कमळाने सार्‍या जगाला उजळून टाकले. अठराविश्व दारिद्र्य, गुलामगिरीचे ओझे, आईपासून कायमचा विरह, कृष कुपोषित शरिर असलेला ज्याचे नाव ही स्वतःचे नाही...कुळ नाही...पूर्वजांचा पत्ता नाही असे हे "मेरीचे पोर" परमेश्वरावरील असीम निष्ठेने व स्वकष्टाने चिखलातून वर आले आणि दिमाखात झळकले. 

मोझेस कार्व्हर या जर्मन शेतकर्‍याने मेरीला गुलाम म्हणून विकत घेतले. पुढे गुलाम पळविणार्‍या टोळीने मेरीला पळवून नेले व तिचे दोन महिन्याचे पोर पोरके झाले. मात्र कार्व्हर व त्याची पत्नी सूझन ह्यांनी या मरणोन्मुख पोराचा नीट सांभाळ करुन वाढविला. त्यांनीच त्याची विनम्र आणि प्रामाणिक वृत्ती पाहून जॉर्ज असे नामकरण केले. कार्व्हर कुटुंबियांचेच नाव त्याने लावले. 

निसर्गाच्या सानिध्यात रमणे, झाडा-फुलांबरोबर खेळणे, बागकाम करणे हेच काय ते जॉर्ज करीत असे. हा छोटा जॉर्ज म्हणजे छोटा माळी झाला होता. अंगाने कृश, दुबळा, नाजूक होता. मात्र त्याच्या हातात विलक्षण कसब होते. चुली लिंपणं, लोकर पिंजणे, कातडी कमावणं, मेणबत्या बनविणे, मसाले तयार करणे, पाव-बिस्कीट तयार करणे, विणकाम करणे, चित्रकला, असं सगळ सगळ तो लहानपणीच करायला शिकला होता.

त्याला खूप शिकायचे होते आणि आपल्या बांधवातून या गुलामगिरिच्या चिखलातून बाहेर काढायचे होते. हे एकच ध्येय त्याचे होते आणि म्हणूनच चित्रकार किंवा म्युझिशियन न होता तो एक कृषिशास्त्रज्ञ झाला. 
दहा वर्षाचा असताना त्याने शिक्षणासाठी कार्व्हर यांच्या घरच्या सुरक्षित वातावरणातून अज्ञात असुरक्षित अशा जगात पाऊल टाकले. काबाडकष्टकरुन शिक्षणासाठी पैसा गोळा केला. कित्येक दिवस उपासमारिला सामोरे गेला. शिक्षणाचा खर्च वाढला की काबाडकष्ट ही वाढले. या दरम्यान लावणी, पेरणी, लॉंड्री अशी बरीच कामे तो शिकला. त्याने कोणाकडूनही कधीच काहीही फुकट घेतले नाही. जो त्याला मदत करी त्याच्या घरी जाऊन तो त्याचे घरकाम, बागकाम करीत असे. पुढे तो तोतरा बोलणारा मुलगा उत्तमरित्या गाणे ही गाऊ लागला. 
अशी उत्तरोत्तर प्रगती करीत त्याने अवघ्या जगावर आपली प्रभा पसरली. काय नाही केले ह्या कार्व्हरने...अगदी सगळ काही...एका तपस्वी सारखे आपले आयुष्य मानवजातीच्या कल्याणासाठी व्यतित केले.
आपण केलेल्या प्रयोगांवर संशोधनावर कधीच पेटंट घेतले नाही. मुक्त मनाने आणि मुक्त हस्ताने ज्ञानदान केले.  पुढे जसे झाडांवर उपचार करणारा डॉक्टर, हा जनावरांचा आणि माणसांचाही डॉक्टर झाला. तेही कोणतेही विधीवत प्रशिक्षण न घेता. त्यांना लोकांनी डॉक्टर ही पदवी दिली. त्यानंतर कित्येक वर्षांनी त्यांना डॉक्टरेट मिळाली होती. 

मधमाशी नेई मध...कधी नारीच्या केसात..
कधी सुकूनी उन्हात...कमळ झाकळत राया....कमळ झाकळत ॥२॥

खरंच कमळाचा वापर ज्या मुक्तपणे होतो तशाच मुक्तपणे विविध मार्गांनी कार्व्हर यांचा उपयोग समस्त काळ्या गोर्‍या समाजाला झाला. कधी कुणी त्यांच्याकडे मोठ मोठ्या संशोधनासाठी ऑफर घेऊन येई तर कधी एखादा सामान्य शेतकरी आपल्या शेतातील साधीशी अडचण घेऊन येई. दोन्ही परिस्थीतीत कार्व्हर तितक्यात तन्मयतेने उपयोगी राहिले. याबदल्यात त्यांनी घेतले काय? तर काहीच नाही....साध्या दुवा किंवा आर्शीवादाची देखील अपेक्षा नाही...देवाचे कार्य म्हणून करीत गेले...कमळ म्हणून वर आले आणि कमळ बनूनी राहिले...
कित्येकदा कष्टाच्या उन्हात सुकून झाकळले...कधीच स्वतःचा विचार केला नाही...त्यांनी केलेल्या कष्टाचा आणि सहन केलेल्या हालआपेष्टांचा आपण विचार ही करु शकत नाही. त्यांच्या वाटेला  "काळा" म्हणून शेवटपर्यंत येत राहीलेली हिनतापूर्वक वागणूक पाहून या अभंगाच्या पुढील चरण आठवते...

इतुके कष्ट केले त्याने, पंकातून दूर गेला
मग व्यर्थ का रे सारे, जीव दुर्दैवात राया...जीव दुर्दैवात...॥३॥

मला असे वाटते हा प्रश्न आद्यपिपा बापूंना विचारत आहे. किंवा आपल्या मनात सहज प्रश्न उमटतो की इतके कष्ट केले तरी शेवटी काय मिळाले, एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी झटलो पण शेवटी मी दुर्दैवातच असा प्रश्न पडतो. आणि इथेच परमेश्वरावरील विश्वासाला हादरे बसू लागतात. आपल्यासाठी आद्यपिपादादा बापूंना हा प्रश्न विचारत आहे...आणि या प्रश्नाचे खरे समाधान पुढील चरणात बापू करीत आहे असे दिसते...
कार्व्हरच्या बाबतित तेच झाले...वरकरणी पाहता त्यांचे आयुष्य इतरांना दुर्दैवी वाटले, त्यांची दया आली..कुणी त्यांची कीव केली... पण या सार्‍याकडे त्यांनी दुर्लक्ष केले...जणू काही त्यांना माहित होते...
पिप्या ऐक माशी तृप्त, सौंदर्याचा गुण सत्व
किरण असती बाहू माझे, काहीही न व्यर्थ जात...काहीही ना व्यर्थ जा...॥४॥

त्यांच्या कार्यामुळे त्यांनी अनेकांना तृप्त केले होते...समाधान दिले होते..स्वतःतर कमळ बनले पण अनेकांना देखील कमळ बनण्याची प्रेरणा दिली...
त्यांच्यासाठी परमेश्वराचे बाहू किरण होऊन पसरले...सार्‍या जगावर... 
त्यांचा हातगुण, त्यांचे कार्य किरणांप्रमाणे परमेश्वरांच्या बाहूंनी जगभर पसरविले...
कारण लहानपणापासून त्यांचा एका गोष्टीवर ठाम विश्वास होता....
काहीही ना व्यर्थ जात.....
त्यांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत काहीही व्यर्थ गेले नाही. अगदी भौतिक गोष्टीत त्यांच्याकडे टाकाऊ असे काहीच नव्हते. टाकाऊ पासून त्यांनी अनेक टीकाऊ गोष्टी बनविल्या....आपले आयुष्य ही आणि इतरांचे ही...
आद्यपिपादादांच्या या अभंगाचे रसरशीत उदाहरण माझ्यासमोर आले...ही बापूरायांची असीम कृपा...
आणि मी सहज म्हणते...सगळं व्यर्थ आहे...
या अभंगाद्वारे आद्यपिपांनी खरच डोळे उघडले आहेत...
या अनिरुद्धासारखा सद्गुरु माझ्या बरोबर असताना माझा देखील श्वास व्यर्थ नाही जाणार...कारण याचे बाहू किरण आहेत...

खरं तर या अभंगाचा भावार्थ कीती खोल असेल माहित नाही...पण वरवर का असेना जे मला समजले, जसे समजले ते लिहल्यापासून राहावले नाही...

कारण 
किरण असती बाहू माझे....
काहीही ना व्यर्थ जात....
ह्या ओळी म्हणजे माझाही जीवंत अनुभव आहे. कार्व्हर या संतपदाला पोहोचलेल्या शास्त्रज्ञापासून ते माझ्यासारख्या सामान्य भक्ताच्या आयुष्याला हा आद्यपिपांचा अभंग व्यापून टाकतो. हीच या अभंगाची खासियत आहे. आयुष्य असावे कसे तर कमळासारखे...खरंच बापू आयुष्य असावे तर या कमळासारखे...आणि खरंच बापूंवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचे आय़ुष्याचे कमळ होणारच..
कारण प्रत्येकजण ह्या कलियुगातील विविध प्रकारच्या चिखलातून सूर्यरुपी बापूंच्या ओढीनेवर आलेला आहे...
चिखलात लोळणार्‍या सुकराचे देखील कमळ करण्याचे सामर्थ्य या माझ्या सदगुरु अनिरुद्धात आहे, हे कदापि विसरुन चालणार नाही.

- रेश्मावीरा शैलेशसिंह नारखेडे

Wednesday, May 8, 2013

न्हाऊ तुझिया प्रेमे



अकारण कारुण्याची नित्य वाहतसे गंगा....खरंच बापूंचे अकारण कारुण्याचे वर्णन करणे कदापी शक्य नाही. गंगेची जशी व्यापकता आणि विस्तार आहे..त्याप्रमाणेच किंबहुना त्याहून अधिक माझ्या बापूंचे अकारण कारुण्य अधिक व्यापक आ
णि विस्तारीत आहे. आणि हे सारं; ही ओळ माझ्या मनात आली...ते आजची एक गुड न्यूज ऐकून...

अनिरुद्धाच्या प्रेमात न्हाऊन निघण्यासाठी होणार्‍या उत्सवात "त्याचा" कोणताही श्रद्धावान बाळ कोरडा राहू नये यासाठी, उत्सवात सहभागी होण्यासाठीच्या प्रवेशपत्रिकेचे मूल्य कमीत कमी १५० रुपयांपासून ठेवण्यात आले. मात्र, कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त असल्याने अनेकांना १५० रुपयांच्या हिशेबानेसुद्धा एकदम प्रवेशपत्रिका राखून ठेवणे अडचणीचे जात होते. त्यामुळेच अकारण कारुण्याचा झरा असलेल्या बापूरायाच्या "सर्वांना बरोबर घेऊन जाण्याच्या शिकवणीनुसार" ह्या प्रवेशपत्रिका आता इंस्टॉलमेंटमध्ये देणगीमूल्य देऊनही राखून ठेवता येणार आहेत.

यासाठी इच्छुक श्रद्धावानांनी सीईओ कार्यालय, अनिरुद्धाज अ‍ॅकेडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (ए ए डी एम), श्री हरिगुरुग्राम व हॅपी होम येथिल न्हाऊ तुझिया प्रेमेचे काऊंटर येथे संपर्क साधावा.

मागिल झालेल्या मोठमोठ्या उत्सवात देखिल अशी सोय करण्यात आली होती. अगदी गायत्री उत्सवाच्या वेळेस गायत्रीमातेच्या पूजनासाठी पुरेश्या निधीची जमवा जमव मी विद्यार्थी असल्याकारणाने करु शकले नव्हते. त्यावेळी अशाच एका सुविधेचा लाभ देऊन बापूंनी माझ्याकडून गायत्रीमातेचे पूजन करुन घेतले होते. त्यानंतर मी अर्थाजन करु लागल्यावर हे पूजन मूल्य भरले. खरंच बापूंच्या अकारण कारुण्यामुळे गायत्री मातेच्या पूजनाचे पूण्य प्राप्त झाले.

त्यामुळे न्हाऊ तुझिया प्रेमे या अभंगोत्सवाच्या संदर्भातील या बातमीमुळे निश्चितच मन खूप भरुन आले आहे.

- रेश्मावीरा नारखेडे

Saturday, April 13, 2013

अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा

न्हाऊ तुझिया प्रेमेच्या कार्यक्रमात कोणते अंभग घेतले जाणार आ्हेत याची खरच उत्सुकता लागली आहे. पण खरोखर असे वाटते की हा कार्यक्रम अतंर्मुख करणारा असेल. मी तर आता सध्या ईमाजिनच करतेय...की या स्टेडीअम मध्ये बसले आहे...चिक्कार श्रद्धावान आलेले आहेत. स्वतः आई बापू दादा आलेले आहेत. कुठे पडद्यावर किंवा एलईडीवर थेट प्रक्षेपण सुरु आहे. स्टेजवर समोर सगळे आर्टीस्ट आहेत...इतक सगळ असूनही मन शांत शांत झालेय..कारण अभंग सुरु आहे..

 ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा....

 माझ्या फेव्हरेट अभंगा पैकी असलेला हा अभंग असेल का? कुणास ठाऊक... पण नुसते ईमॅजिन करुनच अंगावर काटा उभा राहिला आहे. या अभंगाच्या पहिल्या दोन ऒळ्या ऐकल्या की भरभरुन कौतुक करत मोठ्या आईला श्रीराम म्हणणारे माझे बाबा अर्थात बापू आठवतात. पूर्वी जेव्हा हा अभंग ऐकायचे तेव्हा असे मनात यायचे आद्यपिपांचा लळा जसा बापूंना लागला तसा माझा ही लागेल का? बापू माझे ही कौतुक कधी करतील का? पण जस जस या बापूरायाच्या चरणी बापूज्ञ होत गेले तसे तसे जाणवू लागले की मुळात या अनिरुद्धाला त्याच्या सार्‍याच भक्तांचा तितकाच लळा आहे...आणि प्रत्येक बाळाचे तितकेच कौतुक आहे. आणि मी ही हे अगदी सामान्य पातळीवर बोलत आहे...कारण मी हे स्वतः अनुभवले आहे...माझ्य बाबतीतही आणि इतर अनेकांच्या बाबतीत ही.... 

एकदा काय झाले बापू, समिरदादा आणि आम्ही काही ऑफीस दोन एक मंडळी समिरदादांच्या रुममध्ये बसलेलो होतो. तेव्हा आपलाच एक श्रद्धावान भक्त तिथे आला. तो श्रद्धावान एका मराठी मालिकेमध्ये तीन ते पाच मिनिटाचा रोल करीत होता. त्याचा तो रोल बापूंनी पाहीला आणि खरंच त्या रोलसाठी त्या भक्ताचे इतके पोट भरुन कौतुक केले...की विचारु नका...त्यावेळी बापूंच्या चेहर्‍यावर जो आनंद आणि समाधान होता तो पाहण्यात मलाच खुप भरुन आले. मग तो भक्त गेल्यानंतर बापू पुन्हा आम्हाला म्हणाले, की अगदी छोटासा रोल होता पण काय मनापासून आणि आत्मविश्वासाने केला होता. छान.... त्यावेळी अगदी सहज माझ्या मनात आद्यपिपांच्या या अभंगाच्या सुरुवातीच्या ...अनिरुद्ध रायासी लागतो रे माझा लळा...कुणा नाही इतुके कौतुक धर्म याचा आगळा.... या ओळ्या उमटल्या... 

आद्यपिपां आणि इतर श्रेष्ठ भक्तांचे सगळेच अभंग आपल्या दैनंदिन आयुष्यात अनुभवता येतात. हेच अभंग पूर्ण तल्लीन होऊन ऐकण्याची संधी फार कमी वेळा मिळत असते....ह्या कार्यक्रमाच्या निम्मित्ताने आपल्या प्रत्येकाला आता ही संधी मिळणार आहे. बस्स आता ह्या कार्यक्रमाला बापू नावाचा घननीळ मेघ दाटून आला असेल आणि अभंगांचा मुसळधार...मन शितल करणारा पाऊस पडणार आहे....मग फक्त मला पिसारा फुलवून तयार राहयचेय...या प्रेमाच्या वर्षावात न्हाऊन निघायला....
अंबज्ञ -

रेश्मावीरा नारखेडे

Monday, February 11, 2013

आत्मबल पुष्प १४ मध्यंतरपूर्व


आत्मबलाच्या १३ व्या पुष्पाचे आणि महोत्सवाच्या पुष्पगुच्छाची एक छोटाशी पाकळी बनण्याची लागोपाठ संधी मिळाली होती. त्यानंतर प्रथमच आत्मबलचा कार्यक्रम प्रेक्षक म्हणून पाहणार होते. ह्या आत्मबलाचा एक घटक होण्यापूर्वी देखील आत्मबलचे कार्यक्रम पाहिले होते. मात्र, आता एक आत्मबलची सखी म्हणून कार्यक्रम पाहण्यास अत्यंत वेगळे वाटत होते. आधी वाटायचे या सख्या किती छान परफॉमन्स करित आहेत. किती मस्त डान्स करीत आहेत.  किती मनोरंजन करीत आहेत. प्रबोधन करीत आहेत. मात्र कालच्या प्रोग्रॅमला ह्या नव्या सख्यांना पाहताना क्षणोक्षणी त्यांची मेहनत, कष्ट किती आहे याची जाणिव होत होती. त्याहूनी जास्त माझ्या नंदाईची मेहनत, कष्ट किती आहेत याची जाणिव होत होती. आमच्या वेळेला आम्ही पाहिले आहे की आई किती मेहनत घेते. रात्र पाहत नाही...वेळ काळ पाहत नाही आणि अविरत श्रम घेत असते. एखाद्या तपस्वीनी सारखी....सारखी कशाला? तपस्वीनी म्हणूनच. तिचे एक तप संपून दुसर्‍या तपाला सुरुवात झालीच आहे. या दुसर्‍या तपाचे पहिला टप्पादेखील पूर्ण झाला. आणि सगळ्यांनी पाहीले एका तपातून मिळालेल्या तेजामध्ये आत्मबलचे १४ पुष्प कसे बहरले.

महोत्सवाच्या भव्य दिव्य कार्यक्रमानंतर १४ व्या पुष्पाचा कार्यक्रम जसा हवा अगदी तसाच होता. आत्मबलची प्रभा अजून वाढवणारा होता आणि याचे सर्व श्रेय जाते ते फक्त आणि फक्त नंदाईलाच. कारण मी हे ठामपणे सांगू शकते, इथे कुणीही कितीही मेहनत केली असेल ती फक्त नंदाईच्या चेहर्‍यावर एक समाधानाची, आनंदाची लकेर पाहण्यासाठीच केली आहे. फक्त तिच्यासाठी आणि बापूंच्या संकल्पासाठी. आणि जेव्हा कुणीही नंदाईसाठी आणि बापूंच्या संकल्पपूर्तीसाठी कार्यात झोकून देतो तेव्हा बळ देणारी, ते कार्य पूर्ण करणारी मोठी आईच असते. आणि मला खात्री आहे हे प्रत्येकाने अनुभवलेले असेल. 

आता या १४ व्या पुष्पाच्या कार्यक्रमाबद्दल सांगायचे झाल्यास स्पीचलेसच होऊन जाऊ. पण खरच बोलल्याशिवाय रहावत नाही आणि बोलावे म्हटले तर सुचत नाही. माझा सुरुवातीचा स्वागताचा डान्स मिस झाला. पण मूहूर्त नाटकाच्या वेळेस मी पोहचलेले होते. ह्या नाटकाचे डायरेक्शन, संवाद आणि विषयाची हाताळणी इतकी मस्त होती की सॉलिड एन्जॉय केले. या नाटकाद्वारे मुहूर्त आणि ज्योतिषी यांच्या ग्रहातार्‍यांमागे लागून आपल्या आयुष्याच्या खर्‍या सुख आणि शांती या महत्त्वपूर्ण सुर्य चंद्रापासून दूर जाणार्‍या देवभोळ्या लोकांची गत कशी होते? यावर खेळकर आणि खोडकर असे भाष्य केलेले होते. खुद्द बापूंची कुंडली पाहण्याचा प्रयत्न करणारे आजोबा पाहून बापूंना देखील हसू आवरले नव्हते. ज्योतिषशास्त्राला बापूंचा विरोध नाही पण त्याहूनी सरस सदगुरु शास्त्र आहे हे सहज आणि सोप्या शब्दात पटवून दिले आणि या सदगुरु शास्त्रात एका प्रेमाशिवाय कोणतेही बंधन नसते. त्याबरोबर बापू भक्ताशीच लग्न करायचे आहे असा हट्ट धरुन बसणार्‍या मुलींचा कान ही आईने सहज पिळला. ह्या चूकीच्या हट्टापायी अनेक अडचणींना सामोर्‍या जाणार्‍या आपल्या मुलींना अगदी मार्मिक तर्‍हेने समजवीले आहे आणि हे फक्त आईच करु शकते. आपल्या सासरकडच्या मंडळींना उचित मार्गावर आणण्यासाठी या नाटकातील नायिकेने अविरोधाने पुढे जाऊन कसा काय बदल घडवून आणला हे पाहणे इंटरेस्टींग होते. या नाटकातील संवाद आणि नेपथ्यपण सुंदर होते आणि सर्वच नॉन प्रोफेशनल सख्यांनी प्रोफेशनली काम केले आहे. कुठेही या नाटकाची लय तुटली आहे, मध्येच काहीतरी वेगळेच आलेय अस काहीही वाटत नव्हते. 

Aatmabal 2013_Muhurta

त्यानंतर, इंग्लीश नाटक होते. टू सर विथ लव्ह. या नाटकाबद्दल मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे हलके फुलके संवाद. या नाटकातून बापू शिक्षक म्हणून कसे आहेत हे दाखविले गेले पण तेही एका वेगळ्या तर्‍हेने. नाटकातील इंजिनियरिंग कॉलेजच्या फेअरवेल पार्टी दरम्यान जुन्या आठवणीत रमणारी विद्यार्थी-विद्यार्थीनी आपल्या कौशिक सरांबद्दल भरभरुन बोलतात. कौशिक सरांनी या मुलांच्या आयुष्याला जी वेगळी दिशा दिली त्याबद्दल भरभरुन बोलतात. मात्र या कौशिक सरांचे प्रेरणास्थान दुसरे तिसरे कुणीही नसून अनिरुद्ध बापू आहेत हे जेव्हा कळते तेव्हा खरच भरुन होते. एक आदर्श शिक्षक म्हणून जरी कौशिक सरांना ओळखले जात असले तरी त्यांचा आदर्श शिक्षक हे बापूच आहे. हे या नाटकातून दाखविले. तेव्हा जाणविले की या बापूंचा आदर्श प्रत्येक बाबतीत आपण ठेवू शकतो. एक आर्दश शिक्षक, आर्दश विद्यार्थी, एक आर्दश वडील, मित्र, प्रेक्षक अशा प्रत्येक बाबतीत आपण बापूंनाच आदर्श म्हणून ठेवले पाहिजे. अस केल्यास जे यश कौशिक सरांना लाभलेले दाखविले ते आपल्याही मिळू शकते. आज रामाला देव म्हणून देव्हार्‍यात कोंडणार्‍यापेक्षा रामाला आदर्श म्हणून हृदयात कोंडणारा अधिक सुखी होतो ही गोष्ट मनावर पक्की ठसली. 
Aatmabal 2013_ To sir with Love


अर्थात आईने दाखविलेल्य़ा नाटकांमधून प्रत्येकजण वेगवेगळा बोध घेऊ शकतो. मला जे कळले ते मी मांडले. या नाटकामध्ये एलईडीचा वापर करुन दिलेला एक संदेश हृदयास भिडला. दोन जीवलग मित्रांमध्ये भांडण होते आणि एक जण दुसर्‍याला थोबाडीत मारतो. तेव्हा ज्याने मार खाल्ला आहे तो आपल्या मनातले शल्य वाळूवर लिहून मोकळा होतो. मात्र, जेव्हा मारणार मित्र एका गुंडापासून त्याचे प्राण वाचवतो तेव्हा तो आपल्या मनातली कृतज्ञता आणि त्या घटनेची आठवण दगडावर लिहून ठेवतो. यातून दिलेला संदेश म्हणजे आपली जीवाभावाची माणसांमुळे जेव्हा दुःख होते तेव्हा ती आठवण वाळूवर लिहायची म्हणजे ते कधी ना कधी काळाच्या ओघात पुसून जाईल. मात्र, त्यांच्या बद्दलच्या चांगल्यागोष्टी आपण दगडावर अर्थात मनावर कोरुन ठेवायच्या. ज्या कधीच पुसल्या जाणार नाहीत. इतका अप्रतिम संदेश अर्थात बापूंची शिकवण अत्यंत सुंदरपणे मांडली.  या इंग्रजी नाटकाचा प्लस पॉईंट म्हणजे सोप्पे आणि चुचुरीत संवाद जे समजायला सोप्पे होते आणि जरी समजले नाहीत तरी प्रसंग अगदी बोलके घेतले होते. 

या नाटकानंतर अत्यंत सुंदर आणि स्वर्गिय असे मयूर नृत्य होते. या नृत्याबद्दल लिहणे कठीणच आहे. इतकेच म्हणू शकते की डोळ्याचे पारणं फिटले. रोजा या चित्रपटाच्या ये हसी वादिया या गाण्याच्या संगितावर "मेघ दाटे नभी, हर्ष झाला मनी" हे गाणे रचले गेले होते. या म्युझिकमध्ये हे शब्द इतके चपखल बसले होते की जणू असे वाटले की ए आर रेहमान नी या आपल्या अभंगासाठीच संगीत तयार केले असावे. या गाण्यात एक वेगळीच डेप्थ होती. संगीताची निवड, शब्द रचना, नृत्य दिग्दर्शन, कॉच्युम्स, एलईडीवरील क्लिपिंग, लाईटींग ह्यांचे समिकरण इतक परफेक्ट जुळून आले होते की बस्स! शब्दच नाही...हे नृत्य फक्त पाहवे बस्स..या बद्दल काही लिहूच शकत नाही. हे नृत्य पाहताना वातावरण या निळ्या-सावळ्याच्या निळाईमध्ये मिसळून निळसर होऊन गेले होते....अवर्णनिय...हे नृत्य पाहताना प्रत्येक प्रेक्षक मोर झाला आणि डुलायला लागला असेल असे वाटते. इतरांचे माहित नाही माझे मात्र असेच झाले. हॅटस ऑफ टू नंदाई फॉर दिस अल्टीमेट कंसेप्ट.

Aatmbal 2013_Mayur Dance


आता इथे मी सुद्धा मध्यंतर घेते कारण याच्या नंतर जे जे काही झाले ते लिहण्यासाठी मध्यंतराची नितांत आवश्यकता आहे.

Monday, February 4, 2013

साईं निवास


साईं निवास
गेल्या गुरुवारी दुसर्‍या प्रवचनाच्या वेळेला साईं निवासची हिंदीमध्ये डब केलेली डीव्हीडी लावली होती. अत्यंत उत्कृष्टरित्या मूळ मराठी डॉक्युमेंटरीचे हिंदीत डबींग करण्यात आले आहे. मराठी आणि हिंदी या दोन्ही डीव्हीडी पाहताना प्रेम आलें डोळा भरुन। कंठ सद्गदून दाटला। 
तसेच चित्त झालें सुप्रसन्न। नयन उल्हासें सुखसंपन्न।।
अधिक माहितीसाठी ही लिंक पहा..

Friday, January 25, 2013

Googling 3 - The Story of Send


आता आपण ईमेल सर्रास वापरतो. इथून मी ई-मेल पाठविला की दुसर्‍या क्षणाला तो ई-मेल ज्याला पाठवला आहे त्याला पोहचलेला असतो. किती इंस्टंटली पोहचतो ना! कधी कधी अगदी बाजूच्या माणसाला देखील पटकन पोहचत नाही तेव्हा आपण वैतागतो. यावेळी आपण अगदी सहज रिऍक्ट केलेले असते. पण आपल्याला सहज असे मिळणार्‍या मेलचा प्रवास हा ईतका सहज असतो का? ह्या एका ईमेलचा प्रवास पाहणे, जाणणे खरच इंटरेस्टींग आहे आणि तेही ऍनिमेशनच्या रुपात.

गुगलने त्यांच्या ईमेलचा प्रवास एका सुंदर ऍनिमेशन मधून दाखविला आहे. हा प्रवास पाहणे खरंच चुकवू नका. आपण अनेक प्रवासवर्णने वाचली असतील..पण मी निश्चितच सांगू शकते की "एका ईमेलचे" प्रवासवर्णन तुम्हाला नक्कीच आवडेल. 

खर तर हा संपूर्ण प्रवास शब्दात मांडायचा होता मात्र गुगलच्या ऍनिमेशनपुढे त्याची गरज नाही. गुगल ग्रीनने पुढाकार घेऊन ही स्टोरी मांडली आहे. गुगलच्या सस्टेंबिलीटीबद्दल खरोखरीने जाणून घ्यायचे असेल तर गुगल ग्रीन (Google Green) वेबसाईट पाहणे अत्यंत आवश्यक आहे. 

एका सामान्य माणसाला मदतीच्या दृष्टीने गुगल ग्रीन फारसे महत्त्वाचे कदाचित ठरणार नाही. मात्र, काही सेकंदाच्या आता प्रचंड माहितीची देवाण-घेवाण कशी सहज होते हे जाणून घेणे खरच इंटरेस्टींग ठरेल. त्याचबरोबर पर्यावरणास हितकारक असे गुगल कसे काम करते हे पाहणे देखिल इंटरेस्टींग आहे.  

स्टॊरी ऑफ सेंड ( The Story of Send) पाहताना आपल्याला गुगलची ऍनिमेशनची क्लासिक स्टाईल पाहण्यास मिळणार आहे. हा मेल विविध स्टेजमधून प्रवास करताना आजूबाजूला आनंदाचे प्रसन्नतेचे आणि मुख्य म्हणजे रिलॅक्सेशनचे वातावरण ठेवण्याची शक्कल गुगलने सॉलिड लढवलेली आहे. इतकी किचकट प्रोसेस सहजरित्या होत असते हे या ऍनिमेशनमधून सहज आपल्या मनावर बिंबते. खरच अमेझींग आहे. हॅटस ऑफ टू मेकर्स ऑफ धीस ऍनिमेशन....श्रीराम...अंबज्ञ