Thursday, July 16, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - २ (सात प्रश्नांचे विवरण व बेसिक ब्लॉग रेडी)

काल तुम्हाला ब्लॉग बनविण्यापूर्वी सात प्रश्नांचा विचार करावयास सांगितला होता. ते का आणि ब्लॉगची सुरुवात कशी करायची हे आपण आज पाहू.

मी सांगितलेला पहिला प्रश्न म्हणजे

१) मी कोण आहे? 
म्हणजेच इथे तुम्हाला विचार करावा लागणार की तुम्ही कोण आहात? मी अमुक अमुक आहे....पण म्हणजे नक्की कोण? माझी खासियत काय? माझ्यातील चांगले गुण, कला काय? याचा विचार तुम्हाला करावा लागणार. तुम्ही ब्लॉग करता म्हणजे एक प्रकारे तुमची एक डीजीटल छबी तयार होत असते. ही ऑनलाईन पर्सनालिटी तुम्हाला कशी दाखवायची आहे? तुम्ही आहात तशी की त्याहूनी वेगळी. तुम्ही म्हणजे नक्की काय? तुमची तत्त्वे काय? तुमचा ब्लॉग वाचावयास येणार्‍या वाचकाला तुमची काय ओळख तुम्ही करुन देणार. हे या प्रश्नांतर्गत ठरवायचे असते. मग यात तुम्ही कोणती तत्त्वे फॉलो करता....तुमचा विश्वास कशावर आहे इथ पासून तुम्हाला काय आवडते इथ पर्यंत तुम्ही काहीही देऊ शकता. अथवा इच्छा नसेल तर नाही दिले तरी चालेल. पण हा प्रश्न स्वतःला मात्र नक्की विचारावा की, मी कोण आहे? 

२) मला ब्लॉग का करायचे आहे?
मी कोण आहे हे समजून घेतल्यावर तुम्हाला ब्लॉग का करायचा आहे ह्या प्रश्नाचे उत्तर शोधावे. यामुळे ब्लॉगच्या प्रती फोकस्ड आणि प्रामाणिक राहण्यास आपल्याला मदत होते. ब्लॉग हा वैयक्तीक असो किंवा व्यवसायिक किंवा काही उदात्त कारणांसाठी सुरु केलेला असो....जोपर्यंत या प्रश्नाचे उत्तर डोक्यात भिनत नाही तोपर्यंत आपण फोकस्ड होत नाही हा माझा स्वानुभव आहे.

३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
एकदा का आपण ठरविले की ब्लॉग बनवायचा मग त्यातील विषय काय असणार याची लिस्ट करावी. मी कोणकोणत्या विषयावर लिहु शकतो/शकते....कोणत्या विषयावर लिहले तर ते वाचकांना आवडू शकेल....मी कोणत्या विषयात तज्ञ आहे अथवा कोणता विषय मला आवडतो याचा विचार करावा. मग त्या विषयातील उप विषयांची लिस्ट करुन घ्यावी आणि त्या उप विषयांमधील प्रत्येक विषयाचे स्मॉल स्मॉल टॉपिक लिहावेत. किंवा एकच विषय घेऊन तुम्ही त्यावर दीर्घ लिखाण करु शकता. परंतु या सगळ्याचे प्लॅनिंग आधीच करणे आवश्यक आहे.

तुम्हाला मुक्त लिखाण करायचे असेल तर तसही तुम्ही करु शकता. रोजच्या अनुभवांवरुन कदाचित तुम्हाला रोज नवे विषय सुचू शकता. किंवा ताज्या घडामोडींवर तुम्ही आपले मत व्यक्त करु शकता. असा कोणताही टॉपिक तुम्ही निवडू शकता. साध सरळ सोप्प वाचायला सामान्यपणे सगळ्यांना आवडते. कोणतीही माहीती यांत्रिकपणे न देता आपल्या अनुभवांची जोड त्यास दिली तर ते लिखाण अधिक भावते. 

४) ब्लॉगचा विषय ठरविल्यावर आपला ब्लॉग हा कोणत्या भाषेतून असणार आहे याचा देखील विचार करावा.

५) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
विषय निवडल्यानंतर विषयानुरुप ब्लॉगला आपण नाव निवडू शकतो. ब्लॉगचे नाव निवडताना ते काळजीपूर्वक निवडावे. कारण तीच तुमची ओळख बनते. ब्लॉगला तुम्ही कोणतेही नाव देऊ शकता.

६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार याचा विचार करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचकांचे वय, त्यांची मानसिकता, त्यांचे स्टेटस इत्यादी अनेक गोष्टींचा अंदाज ठेवून लिखाण करणे देखील आवश्य़क आहे. खरे तर तुम्हाला जे हवे ते व तसे लिखाण तुम्ही करु शकता. पण आपल्या ब्लॉगचा वाचकवर्ग कोण असणार आहे हे ओळखणे  अत्यंत आवश्यक आहे. उदा. आयटीशी संबंधीत जर तुमचा ब्लॉग असेल तर त्या क्षेत्रातील मंडळीच तुमचा ब्लॉग वाचतील किंवा कवितांचा ब्लॉग असेल तर कविता आवडणार्‍या व्यक्तीच तुमचा ब्लॉग वाचतील. मग अशा वेळी इतर क्षेत्रातील मंडळींना देखील तुमच्या क्षेत्राशी अथवा ब्लॉगशी आपुलकी वाटली पाहीजे असे कंटेन देखील तुम्ही देऊ शकता. तसेच जसा तुमचा वाचक वर्ग असेल त्याच दर्ज्याची भाषा वापरणे हिताचे ठरते. अर्थात हे सगळ सुरुवातीला नाहीच कळत पण या गोष्टींचा अंदाज प्रथम दिवसापासून घेणे आवश्य़क आहे. 

७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?
आता सर्वात शेवटी तुमची युआरएल काय असेल हे ठरवावे. ती तुमच्या नावाची असेल किंवा ब्लॉगच्या नावाची असेल. काहीही तुम्ही निवडू शकता. तुमच्या प्राथमिकतेनुसार. 

आता या सात प्रश्नांची उत्तर पाहिल्यानंतर आपण ब्लॉग तयार करणार आहोत.
ब्लॉग तयार करण्यसाठी अनेक फ्री वेबसाईट आहेत. त्यातील ब्लॉगर (Blogger.com) वर आपण ब्लॉग बनवायला शिकणार आहोत. यासाठी तुमच्याकडे जीमेलचा इमेल अ‍ॅड्रेस असावा लागतो. 

१) तुम्ही आधी जी मेल लॉग-इन करुन इनबॉक्स मध्ये जा.


२) मग उजवीकडील कोपर्‍यात असणार्‍या बॉक्सच्या एका आयकॉन वर क्लिक करा. त्या लिस्टमधून ब्लॉगरचे ऑप्शन निवडून त्यात क्लिक करा. 

३) एका नवीन विंडॊ मध्ये ब्लॉगरचा डॅशबोर्ड ओपन होईल. याच बरोबर तुम्ही थेट ब्लॉगर डॉट कॉम (www.blogger.com) ला जाऊन जीमेलच्या आयडी पासवर्डने लॉग-इन करुन देखील डॅशबोर्डवर जाऊ शकता.


५) डॅशबोर्डवर तुम्हाला "न्यू ब्लॉग" (New Blog) हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. तुम्ही कितीही ब्लॉग एका आय डीवरुन करु शकता. इथे मी आधीच एक टेस्ट ब्लॉग केलेला ही दिसत आहे. 

६) आता एक छोटी नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हाला तो ब्लॉगचे टायटल (नाव) व अ‍ॅड्रेस (युआरएल) विचारेल. 

आपण हे आधीच ठरविलेले आहे. त्यामुळे ते तिथे भरावे. ब्लॉगचा पत्ता ब्लॉगर वेरिफाय करेल आणि जर तसा दुसरा कोणताही पत्ता आधीच असेल तर तशी सुचना तुम्हाला मिळेल व तुम्हाला युआरएल थोडी बदलून टाकावी लागेल. ही माहीती नंतर बदलता ही येते पण शक्यतो बदलू नये त्यामुळे विचारपूर्वक निवड करावी. मग खालच्या विंडॊमधील कोणतेही एक टेंपलेट निवडावे. टेंपलेट म्हणजे तुमचा ब्लॉगचे सर्वसाधारण डिझाईन. त्याचे काही तयार पर्याय ब्लॉगर आपल्याला देतो. त्यात आपण आपल्याला हवा तसा बदल देखील करु शकतो. 
शेवटी क्रीएट ब्लॉगवर क्लिक करावे. 


७) आता तुम्ही ब्लॉगच्या ओव्हर व्हू या पेजवर याल.

 तुमचा ब्लॉग तयार झालेला आहे. या पेजवर तुम्हाला सर्वच ऑप्शन दिसतील. येथील वरील व्ह्य़ू ब्लॉग या पर्यायावर क्लिक करुन तुमचा ब्लॉग कसा दिसेल हे पाहू शकता.


८) हा पहा तुमचा ब्लॉग. तुमच्या ब्लॉगच्या युआरएलवर हा ब्लॉग असा दिसेल. यातील क्रमांकाचे विवरण पाहू
१. हेडरबार (ब्लॉगचे नाव/मथळा)
२. पोस्ट एरिया 
३. गॅझेट एरिया
४. बॅकग्राऊंड 
५. फुटर

आता पुढील भागात इतर गोष्टींची माहीती करुन घेऊ.

READ PART 1 HERE


Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, July 15, 2015

ब्लॉग कसा तयार करावा? भाग - १

आपल्याला इतिहास कसा कळला? तर अनेक दस्तावेज, बखरी, शिलालेख यामधील नोंदीमधून. या नोंदी होत गेल्या आणि आपल्याला तेवढ्यापुरता इतिहास कळला पण इतिहासात अशा अनेक घटना असतील की ज्याच्या नोंदी झालेल्या नाहीत.....मग त्याचे काय? हा इतिहास आपल्यापुढे झाकलॆलाच नाही का? म्हणजे "नोंद" या गोष्टीला अत्यंत महत्त्व आहे. देशाच्या, जगाच्या इतिहासात किंबहुना माझ्या वैयक्तिक आयुष्यात देखील नोंदीचे महत्त्व तितकेच आहे. म्हणून सांगितले जाते प्रत्येकाने स्वतःची एक डायरी लिहावी. पुढे ही डायरी वाचताना आपल्या आयुष्यातील चढ उतार आपल्याला उमगत जातात व पुढील आयुष्य सुकरपणे जगण्यास मदत होऊ शकते. 

मानवाला विस्मृतीचा शाप आहे. त्यामुळे महत्त्वाच्या घटना विस्मृतीत न जाऊ देण्यासाठी आपण नोंदी करायला सुरुवात केली पाहिजे. आज या नोंदीचे डिजिटल आणि मिडीयामध्ये रुपांतरित झालेले अतीव्यापक स्वरुप म्हणजे ब्लॉग्स. अर्थात येवढा संकुचित देखील  अर्थ या ब्लॉग्सचा नाहीए. ब्लॉग्स ही संकल्पना अत्यंत व्यापक आहे. खर विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देणारे संकेतस्थळ असेही आपण म्हणू शकतो. एक वैयक्तिक संकेतस्थळ म्हणून आपण ब्लॉग्सचा वापर करु शकतो.

सुरुवातीला केवळ तांत्रिक विषयाची माहिती देणारे ब्लॉग असायचे पण आता अनेकविध विषयांवर खुप सुंदर सुंदर ब्लॉग्स आहेत. ज्याच्याकडे एखादा छंद आहे आणि तो त्याला जगापर्यंत पोहोचवायचा आहे तो ब्लॉगच्या माध्यमातून सहज आणि फुकट पोहचवू शकतो. काहीजण केवळ ब्लॉगच्या निमित्ताने संवाद साधत असतात आणि हे वाचणारा वर्ग खूप अधिक आहे. इन शॉर्ट तुम्हाला तुमचे विचार मांडावेसे वाटत आहेत. जगासमोर आपली कला मांडायची आहे? किंवा नेहमीच्या रुटीनमधून काही परिपक्व असा विरंगुळा करायचा आहे तर निश्चितच ब्लॉग सुरु करु शकता. 

संसाराच्या गराड्यात अडकलेल्या होम मेकरला आपल्या रेसिपीज, काही अनुभव शेअर करायचे आहेत....एकट्या राहणार्‍या वृद्ध आज्जी आजोबांना आपले मन मोकळे करायचे आहे तर ते देखील अगदी सहज ब्लॉग सुरु करु शकतात. तुम्हाला अस वाटेल की माझ्या मेलीचे कोण वाचणार? तर तस नाहीए. आजची डीजीटल सॅव्ही पिढी माहिती नेटवरुन शोध करुन मिळवित असते. त्यांना ही माहिती, आपला अनुभव फायद्याचा ठरु शकतो. कुणाची व्यथा तुमच्या व्यथेशी जुळू शकते..आणि भावनांना वाट मोकळी करुन देता येऊ शकते.....
कुणाचा आनंद तुमच्या आनंदात मिसळून जाऊ शकतो....तर कुणाला खूप चांगल लेखन वाचण्यासाठी मिळू शकते....कुणाला त्यांच्या क्षेत्रात तुमचा अनुभव फायदेशीर ठरु शकतो....

समाजात एक चांगला विचार देण्याचे काम आपला ब्लॉग करु शकतो. आपला विचार जनमतही तयार करु शकतो. या ब्लॉगचा व्यवसाय देखील करतात....आपल्याला आपले अस्तित्व जगासमोर मांडण्याची नामी संधी ब्लॉगच्या माध्यमातून मिळते. माझा स्वानुभव म्हणजे मला खुप छान वाटते. समाधानी वाटते.....की आपल्या आयुष्यात कुणी ऐकणारे असो किंवा नसो.....मुझे जो कहेना है वो कहेना...आणि मी ते माझ्या ब्लॉगमधून बोलू शकते. अर्थात सर्व नैतिक मर्यादा पाळूनच. कारण यशाच्या शिखराचा पाया मर्यादा आहे असे मी मानते. 

आयुष्याच्या एका नैराश्याच्या क्षणाला मी ब्लॉग सुरु केला उद्दीष्ट एकच होत की हे नैराश्याचे पांघरुण उलथून टाकायचे आणि मग पुन्हा कधी नैराश्य वाटेला आले नाही. जितक लिहत गेले तितक सुचत गेले....किंबहुना अनुभवाहून अधिक सुचत गेले आणि लिहत गेले. ब्लॉग बहरला फुलला....माझ्या पहिल्याच ब्लॉगचे नावच  होते मुळी "विरंगुळा - वेळ सत्कारणी लावणारा उद्योग" "माझे काही हरविलेले शोधताना करावा लागलेला उपद्याप..." जेव्हा हरवलेले सारं सापडले तेव्हा सुरु केला नव्याने एक ब्लॉग "साद". मी घातलेल्या या सादेला प्रतिसाद मिळाला..अगदी उदंड प्रतिसाद मिळाला......आणि मग या ब्लॉगचे पुन्हा एकदा बारसे केले "साद-प्रतिसाद" 



या ब्लॉग करतानाचे, तो मॅनेज करतानाचे बारिकसारिक पैलु मी देण्याचा प्रयास करणार आहे. जे वाचून पाहून कोणालाही सहज ब्लॉग करता येईल. यासाठी आधी खालील सात प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे..

१) मी कोण आहे?
२) मला ब्लॉग का करायचा आहे?
३) माझा ब्लॉगचा विषय काय असणार आहे?
४) माझ्या ब्लॉगचे नाव काय असणार आहे?
५) माझा ब्लॉग कोणत्या भाषेतून असणार आहे?
६) माझ्या ब्लॉगचे वाचक कोण असणार आहेत?
७) माझ्या ब्लॉगची युआरएल (URL) (ब्लॉगचा पत्ता) काय असणार आहे?


मग या सात प्रश्नांची उत्तरे शोधून ठेवा. आपण पुन्हा लवकरच भेटू.


GO TO PART 2 HERE

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Friday, June 26, 2015

एकदा....


पेटलेला हा रे कसा चांदवा
एकदा त्यास भिजवून जा

गोठला तू रे कसा सुर्या
एकदा ह्यास चेतवून जा

पिसाटलेला हा कसा वारा
एकदा त्यास आवरुन जा

गोंधळली आज ही कशी दिशा
एकदा तिजला सापडून जा

उधाण आले कसे या सागरा
एकदा त्यास आवळून जा

सुसाट सुटली का ही सरिता
एकदा तिजला थांबवून जा

तुजसाठी रचिली ही कविता
एकदा तरी ही वाचून जा

नको शोधुस अर्थ तिचा
एकदा हे सारं अनुभवून जा

- रेश्मा हरचेकर




Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma




Thursday, June 4, 2015

नाही कळले कधी....जीव वेडावला.....


ती तिथे कागदपत्रांच्या कचाट्यात सापडली होती. ऍडमिशनसाठी सगळे ओरिजनल डॉक्युमेंटस झेरॉक्स यांच्या विळख्यात कशी बशी पिवळ्या ड्रेसची पिवळी ओढणी सांभाळत जगावेगळी कसरत करत होती. मऊ रेशमी बेभान झालेले केस सावरण्यासाठी जरा वैतागूनच मान वर केली आणि तिथेच घात झाला.....
पल्सरवरुन रुबाबात येणार्‍या एका झंजावाताकडे तिची नजर खिळली आणि सगळी कागदपत्रे इतस्त पसरली...
तिला काहीच कळल नाही....
तो झंझावात क्षणार्धात तिच्या जवळ येऊन स्थिरावला...
बाईकवरुन उतरुन तिची कागदपत्र गोळा करुन तिच्या हातात दिली...आणि निघून गेला...
तिल काहीच कळल नाही....
ती उभी होती स्तब्ध....
इतक्या वर्षात प्रथमच तिचा काळजाचा ठोका चुकला होता...
पण कुणासाठी...कोण तो...काय त्याच नाव आणि हाच का तो..
अशा अनेक प्रश्नांनी ती गोंधळून गेली. 
पण उत्तर कधीच मिळाली नाही.
तीने बी कॉम फस्ट इयरला ऍडमिशन घेतले होते...
तो.....माहित नाही...
तेव्हा दिसला तो एकदा आणि शेवटचाही....
त्यानंतर मात्र तिचा काळजाचा ठोका कुणी चुकवू शकले नाही...
तीन वर्ष सतत अभ्यास...घर...आणि हृदयातील तो...इतकच तिच विश्व होत...

एका नजरेतील ओढीला इतका का कुणी महत्त्व देतो? आपण चुकतोय हे ही तिला ठाऊक होत. पण शेवटी दिल है के मानता नही. त्याला शोधून काढाव किमान त्याच नाव तरी माहित करुन घ्याव...अस तिला खूप वाटायचे...पण तीने ते धाडस कधी केले नाही. ती ते करु शकत नव्हती अस नव्हत...पण नाही केला प्रयास...येवढच....

त्याच्या त्या फर्स्ट लूकवर ती इतकी फिदा झालेली की तिला काय होतय हे तीच तिला कळत नव्हत. तो प्रसंग तीने एखाद्या चित्रपटातील सीन सारखाच मनात ठेवून दिला व या पहिल्या ओढीची आठवण जपून ठेवली. 

ती त्याच्यात कधी वहावत नाही गेली. अतीशय फोकस्ड होती....अतीशय जवाबदारपणे तीने तिचे शिक्षण पूर्ण केले. उत्तम नोकरीही मिळवली. आयुष्याची दिशा ठरवली आणि तो....
कुणास ठाऊक कुठे होता.....

एके दिवशी बाबांनी लग्नाचा विषय काढला...तिला कुणी आवडत का? हा प्रश्न विचारला. 
आता काय उत्तर द्यायच बाबांना....
खर सांगितल तर मुर्खात काढतील...

कारण मुलगा आवडणे म्हणजे आधी त्याला जाणून घेणे आले...फक्त एका लुकवर कुणी आयुष्य थोडी काढतेय. अस ती स्वतःशीच बोलत होती. शुद्ध वेडेपणा आहे...
पण खरच विचार करायला लागली कारण त्या मुलावर फिदा झाल्यानंतर तिला कुणीच आवडल नाही. कुणाकडेच आकर्षित ती झाली नाही. तीला अनेक प्रपोझल पण आले कारण ती होती देखील तितकीच सुंदर...

सुंदर पेक्षाही तिचे सौंदर्य तिच्या नैसर्गिक हास्यात होत. तिच्याकडे नजाकता नव्हती नाजुकता होती. जरी दिसायला नाजूक असली तरी मनाने खुप कणखर होती. तिचे विचार ही कणखर होती. कुणालाही सहज आधार देईल इतके सामर्थ्य तिच्यात होते. अशी सर्व गुण संपन्न वाईफ मटेरियल मुलीच्या मागे अनेक जण लागलेले...सिरयसली लागलेले...पण प्रत्येकाला शांतपण तीने नकार दिला. 
हे नकार देण्याचे सामर्थ्य बहुतेक त्याच्या ओढीनेच आलेले होते. 
पण कोण होता तो?

असो....बाबांना तुम्हीच योग्य स्थळ पहा अस सांगून मोकळी झाली...
मनाच्या उथळ विचारांवर, भावनांवर वाहून जाण्यापेक्षा आयुष्यात दिपस्तंभ म्हणून उभा असलेल्या बाबांच्या हाती सर्व काही सोपविणे तिला जास्त श्रेयस्कर होते.

लेकीचे सामर्थ्य बाबांना निश्चितच ठाऊक होते...म्हणून तिला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले होते. अगदी प्रत्येक गोष्टीत. कुठला ही निर्णय हा विचारविनिमय करुन घेतला जाई...कुणी ही कुणाचा निर्णय लादत नव्हते...ही त्यांच्या घराची शिस्त होती आणि म्हणूनच या घरातील नाती खुप घट्ट होती.

लेकीने सिग्नल दिल्यावर आई बाबा मुले शोधायला लागले. बाबांच्या एका मित्राच्या भावाच्या मुलाचे स्थळ तिला आले...
आभास जोगळेकर, दिसायला तसा सर्वसामान्य...पण स्मार्ट...पटकन कोणीही इंप्रेस व्हावा असा. त्याची हुशारी त्याच्या डोळ्यात होती. अतीशय चमकदार डोळे. त्याचे चालणे अगदी रुबाबदार.. पण कुठेही ऍटिट्युड म्हणून त्याच्या वागणूकीत नव्हते. शांत, संयमी पण अतीशय ऍडजेस्टटेबल...कुठेही कसाही सहज मिसळून जाईल असा. इतर मुलांसारखे दंड फुगवलेले नव्हते....तर एका पुरुषाला शोभेल अशीच त्याची शरिरयष्टी होती....व ताकद ही...पण त्याच कधी प्रदर्शन केले नाही....मोठ्या हुद्द्यावर कामाला होता...पण कोणतेही काम करायला त्याला लाज नव्हती...प्रचंड मेहनती...व एक निष्णात फोटोग्राफर म्हणून प्रचलित...असा आभास...
त्याने तिला  म्हणजेच कस्तुरी करमरकरशी लग्न करायला होकार दिला 
कारण आई-बाबांना ती आवडली होती. 
इथे आभासलाही कस्तुरीने होकार कळवला कारण आई-बाबांना तो आवडला होता.

पण अजूनही आभास आणि कस्तुरीने एकमेकांना पाहीले नव्हते अगदी फोटोही पाहता नाही आला. हे काही दोघांच्या आईवडीलांना पटेना. केवळ आम्ही सांगतो म्हणून त्यांनी लग्नाला होकार द्यावा हे मान्य नव्हते. त्यांच्यामते आभास व कस्तुरीने एकमेकांना जाणून घेणे आवश्यक होते. म्हणुन लगेचच दोन्ही कुटुंबांनी एका निसर्गरम्य रिसॉर्टवर भेटायचे ठरविले.

करमरकर आधीच रिसॉर्टवर पोहचले होते. रिसॉर्टमधील एका झाडाखाली शांतपणे कस्तुरी बसली होती. अस शांतपणे बसणे तिला फार आवडायचे म्हणून घरच्यांनीही तीला बसू दिले. पिवळी ओढणी असलेला ड्रेस घालून ती त्या बाकड्यावर बसली होती. शांतपणे डोळे मिटले होते आणि अचानक तीला तो कॉलेजमधला प्रसंग आठवला आणि चेहर्‍यावर पुसटसे हसु आले. डाव्या हाताची घडी आणि उजवा हात गालावर ठेऊन, हिरव्या गवतावर पडलेली पिवळी कोवळी किरणे पाहत ती हसत होती. एकटीच. स्वतःशी....कारण यापुढे ती या मनातील मुलाला आठवणार नव्हती...त्याची जागा आता कोण तरी वेगळ घेणार होत. 
तितक्यात बाबांनी हाक दिली..."कस्तु आभास आला ग..."
तिने हलकेच मान वर केली...त्याचे आई बाबा दिसले...पण तो कुठे दिसला नाही...श्री व सौ करमरकर आणि जोगळेकर पुढे आले...आणि मागावून आला तो आभास....

तिला कळेच ना हा आभास आहे की तिलाच भास होतोय...
कारण तो आभास तसाच तिच्याकडे चालत येत होता..
त्याला ही माहित नव्हत की समोर तीच उभी आहे.....
जेव्हा त्याचे लक्ष गेले तेव्हा त्याची पावले जागीच खिळली.
डोळ्यावरील गॉगल काढून त्याने तिला पाहीले व तिनेही प्रथमच त्याला नीट पाहिले....
रिसॉर्टमध्ये त्याचवेळी गाण्याच्या ओळी ऐकू आल्या...

नाही कळले कधी 
जीव वेडावला
ओळखू लागलो 
तू मला मी तूला

गोड हुरहुरु ही
श्वास गंधावला 
ओळखू लागलो
तू मला मी तुला

बराच वेळ दोघेही एकमेंकाना पाहत उभे होते...
कस्तुरीला तर काहीच कळत नव्हत...
पण आभास ही स्तब्ध झाला होता...
ज्या एकमेव मुलाने तिच्या काळजाचा ठोका चुकविला होता तो तिच्या समोर होता आणि हे कळण्याआधीच ती त्याच्याशीच लग्न करायला तयार होती. 
तीने त्याला ओळखल होत....पण त्याच काय...तो का स्तब्ध झाला होता.
काहीच कळत नव्हत....

तेवढ्यात दोघांचे आईबाबा आले आणि त्यांची एकमेकांशी ऑफीशियल ओळख करुन दिली व ब्रेकफास्टसाठी सर्व जण गार्डनमध्ये आले.
सगळ्यांमध्ये दोघेही एकमेकांना चोरुन चोरुन पाहत होते..आणि हसत होते...या प्रसंगी त्यांना काही सुचतही नव्हत.
शेवटी त्या दोघांना एकत्र एका कोपर्‍यात  ब्रेकफास्टला बसवल आणि आई बाबा रिसॉर्ट फिरायला निघून गेले.

कस्तुरी आणि आभासनी खर तर तिथे गप्पा मारण अपेक्षित होत पण....बुद्धीला ब्रेक लागला होता आणि हृदय फास्ट चालत होते...आणि असाच ब्रेकफास्ट सुरु होता.
शेवटी धीर करुन आभासच बोलला....
आपण अनोळखी आहोत. हे खरय का?
ती हसली...
तो ही हसला...
कस्तुरी : माहीत नाही
आभास : अजब आहे ना सगळ
कस्तुरी : हो निदान माझ्यासाठी तरी
आभास : का? फक्त तुझ्यासाठीच का? म्हणजे
कस्तुरी लाजली होती...
आभास ही गालात हसला..
आभास : तुला काय वाटल की त्या दिवशी फक्त तूच स्तब्ध झाली होतीस.
कतुरी : काय!!! (आश्चर्याने) म्हणजे तू ही
आभास त्यावर हसला आणि म्हणाला नाही निदान त्या दिवशी तरी नाही....
आणि आपला मोबाईल काढला. गुगल डाईव्हमधील माय बेस्ट क्लिक्स फोल्डरमध्ये जो एक फोटो होता तो उघडून तिला दाखवला..आणि कस्तुरी पाहतच बसली...
कारण तो फोटो तिचाच होता.
गुलमोहराच्या झाडाखाली आपल्या ग्रुपमध्ये बसली असताना, खळखळून हसताना काढलेला तिचा तो फोटो. हवेच्या झुळकीने उडणारे केस...मनवेधक असे हास्य.. चेहर्‍यावर पसरलेली माध्यान्याची पण बरीच सौम्य झालेली किरणे....येवढेच त्या फोटोमध्ये दिसत होते....

ती चमकून त्याच्याकडे पाहू लागली...तिच्या डोळ्यात आश्चर्य हा शब्द कमी पडावा अस काहीतरी होत..

आभास :  पहिल्या भेटीत माझ लक्ष ही नव्हत तुझ्याकडे...कारण मला पाहून मुली अशा स्तब्ध होतात. त्यात काही विशेष नव्हत. म्हणुन लक्ष नाही दिले....पण तुझा हा फोटो काढल्यानंतर मीच स्तब्ध झालो.  कॉलेज सुरु झाल्यावर काही महिन्यानंतरचा हा फोटो. मी जिमखान्यातच होतो. मित्रांना नवीन कॅमेरा दाखवत होतो. त्या कॅमेर्‍याच्या झूम लेन्सने पहिल्यांदाच घेतलेला हा तूझा फोटो. कायमच मनात घर करुन राहिला.तुझ्याशी बोलाव...तुझ्याशी मैत्री करावी...जवळीक साधावी अस कधी मला वाटण शक्यच नव्हत..वाटल असत तरी ते मी केल नसत कारण तो माझा स्वभावच नाही. पण तरीही ह्या फोटोमुळे तू मनात घर करुन गेलीस. हा माझा सगळ्यात बेस्ट क्लिक आहे, अस मी मानतो आणि हा फोटो अजूनही कुणी पाहीलेला नाही. माझ्या त्या मित्रांनी तो पाहिला नव्हता. कारण हा फोटॊ क्लिक करताना मीच शूट झालो होतो. वाटल एका क्षणाचे आकर्षण आहे म्हणून सोडून दिले. पण ते एका क्षणाचे आकर्षण नव्हते क्षणोक्षणीचे होते आणि हे कळेपर्यंत फार उशीर झाला होता. लास्ट इयरला होतो आणि मिड टर्ममध्ये आम्हाला गुजरातला शिफ्ट व्हावे लागले...आणि मी केवळ परिक्षा देण्यासाठी कॉलेजला आलो. तसा मी अधून मधून येत असे टीचर्सना भेटायला. पण तू कधी दिसली नाहीस....मग मी तुला शोधण्याच्या फंदातही पडलो नाही. पुढे अभ्यास...परिक्षा इंटरव्ह्यू जॉबमध्ये इतका अडकलो की सार विस्मृतीत गेल. कधी तरी खुप दमलो की तुझा फोटो काढून पहायचो...खूप चैतन्य मिळायचे...वाटायचे की ही मुलगी अशीच हसत आपल्या आयुष्यात आली तर कीती बर होईल ना! आणि मनोमन प्रार्थना करायचो तू भेटण्यासाठी....पण अशी भेटशील अस खरच वाटले नव्हते...

त्याचे डॊळे आनंदाश्रुने भरले होते....आणि तिचेही..
...दोघांनाही काय बोलावे सुचतच नव्हते....
नकळत क्षणभर डोळे बंद करुन त्या दोघांनीही परमेश्वराचे आभार मानले आणि डोळे उघडून एकमेकडे पाहिले तेव्हा जाणिव झाली की
They are made for each other...
अगदी.....
त्याच्या डोळ्यात पाहत कस्तुरीने प्रथमच आपल मन मोकळ केल....
"कधी कधी तीव्र आंतरिक ओढी पुढे इतर सर्व गोष्टी फिक्या पडतात ना!!! शेवटी खरी ओढ निर्माण होणे ही त्या परमेश्वराचीच इच्छा........नाही का?"
आभास : होय.
कस्तुरी : मग कधी करायच लग्न..
आभास: ते तर झालय...आत्ताच...उपचार बाकी आहेत फक्त. चल आई बाबांना सांगू आटपून घ्यायला...
अस म्हणत आभासने आपला हात पुढे केला आणि कस्तुरीनेही आपला हात हातात दिला. 
आणि तेवढ्यातच तेथे आलेले करमरकर आणि जोगळेकर स्तब्ध झाले होते...अर्थात आनंदाने..
कारण हाताची पकड त्यांना संगळ काही सांगत होती.

- रेश्मा नारखेडे
(ही कथा काल्पनिक आहे)

Saturday, May 16, 2015

हवा मज एकांत


मजला हवे आज
एकांती रहाणे
मनाच्या लहरींवर
स्वच्छंद वाहणे

एकांता सम नाही
दुजा आधार
होई हलका क्षणात
वेदनांचा भार

लोकांती होऊन
सततचे मरणे
त्याहुनी बरे 
एकांती राहणे

एकांत मिळे ज्यास
तोची सुखी राही
अंतरीच्या एकाशी
एकरुप होई

हवा मज एकांत
अंत होण्याआधी
ह्या देहाचा अग्नी
शांत होण्याआधी

हवा मज एकांत
घालावया साद
अंतरीच्या एकाचा
असावा प्रतिसाद

हवा मज एकांत
आत आत रिघाया
गर्भगृहात जाऊन
नाळ पुन्हा जोडाया

हवा मज एकांत 
मी एकटी असताना
आप्त अन परक्यांसगे
जगात वावरताना

हवा मज एकांत
संपूर्णपणे 
श्वासाची लय
अन श्वासाचे गाणे


- रेश्मा नारखेडे
१६/५/२०१५

Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma

Wednesday, April 8, 2015

तीची अभंगवाणी


काल त्रासलेल्या नवर्‍याचे मनोगत ऐकले. आज याच नवर्‍याला त्याच्या बायकोने चांगलेच उत्तर दिले आहे. नक्कीच वाचा.

तीची अभंगवाणी

माझी ही दिशा
माझा हा मार्ग
आहे हा स्वर्ग
संसाराचा॥१॥

नसती मोहाचे
नसती लोभाचे
जाळॆ हे प्रेमाचे
लाभेवीण॥२॥

लाभेवीण माया
थरारते काया
अंतरिचा राया
स्थिरावतो॥३॥

नच ढळते भान
कंठी येती न प्राण
भेटीची तहान
उरेना॥४॥

बरवा प्रेमरोग
अन स्वताचा त्याग
परी बायकोचा राग
उपाय ना॥५॥

मना जे आवडी
ते संग साधियेली जोडी
मग जीवनाची गोडी
आता अनुभवा॥६॥

सांगते अनुभवे
विश्वास ठेविजे
संकटात तारिले
याच महामायेने॥७॥

मानिला मज भोग
किंवा केला त्याग
न गिळणार मी राग
मुकपणे॥९॥

जरी फुटकी कहाणी
तरी डॊळ्यात ना पाणी
राहीन सदा तव हृदयराणी
कारण तू मज बायको म्हणॆ॥९॥

- रेश्मा नारखेडे
Copyright Saad-Pratisaad #Marathi #Blog of Reshma