Thursday, December 18, 2014

स्व-आरोग्याकडे पाहण्याचा एक स्वार्थी दृष्टीकोन


Self-Health-Doctor

१३ डिसेंबर हा दिवस दृष्टीकोन पालटणारा ठरला. आरश्यात केवळ आपण कसे दिसतो हेच आज पर्यंत पहात आले पण १४ डीसेंबरला प्रथमच आरश्यात स्वतःचे आरोग्य कसे आहे हे न्याहळायला लागले. तेव्हा जाणवले की चांगले आरोग्य हेच खरे सौंदर्य आणि खरे सौंदर्य चेहर्‍यावर नसून पोटात आहे.....हा हा हा....नक्कीच अजब वाटले असेल. पण हे १०८ टक्के खर आहे. कारण १३ डिसेंबर २०१४ रोजी डॉ. अनिरुद्धसिंह धैर्यधर जोशी (अनिरुद्ध बापू) यांचा सेल्फ हेल्थचा सेमिनार अटेंट केला आणि माझे माझ्या आरोग्याबद्दलचे विचारच बदलले. खरच आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही आणि घ्यायची म्हटली तर नेमके काय करायचे हेच कळत नाही. जोपर्यंत आपण स्वतःच्या आरोग्याविषयी स्वार्थी बनत नाही तोपर्यंत चवीच्या आणि खाण्याच्या मोहातून सुटका होत नाही. बापूंनी या व्याख्यानातून ही जाणिव करुन दिली.व्याख्यानाची सुरुवातच मुळी बापूंनी सकारात्मक करुन दिली.

Everything can be repair. हो आपण सगळ काही सुधारु शकतो. दुरुस्त करु शकतो. आरोग्याच्या बाबतीत बोलताना सेमीनारच्या शेवटापर्यंत ह्या वाक्याची पूरेपूर जाणीव झाली.

बापूंनी डॉ थॉमस यांचे एक वाक्य सांगितले. Health is not value till sickness come. आरोग्याची किंमत आजारपण आल्याशिवाय कळत नाही आणि खरंच आज एकही अशी व्यक्ती नसावी की ती आजारी नाही. प्रत्येक जण कोणत्या न कोणत्या व्याधीने पछाडलेलाच आहे. काहींची व्याधी मानसिक तर काहींची शारीरिक. आणि या व्याधींचा वापर आपण अनेकदा सांत्वनासाठी करुन घेतो.

मी देखील अनेक व्यक्ती पाहील्या आहेत की त्यांना झालेल्या (?) आजारांचा वारंवार उच्चार करुन जगाची सिंपथी मिळविण्याचा प्रयत्न करतात व जबाबदार्‍या टाळतात. कधी तरी खरंच व्यक्ती आजारी असते पण अनेकदा हे आजारपण ओढावून घेतलेले असते. आपण वारंवार एकाच गोष्टीचा विचार केला की ती मनात जाऊन मोठी होते किंवा प्रत्यक्षात येते. अनेकदा तसेच काहीतरी होत असावे . मग आजाराचा विचार करण्यापेक्षा आरोग्याचा विचार केला तर ८० ट्क्के आजार दूर पळतील आणि आरोग्याचा विचार करायचा म्हणजे नक्की काय करायचे हे बापूंनी सांगितले.

मनाला फ्रेश वाटत असेल तर शरिराला ही फ्रेश वाटत असत. मन थकलेले असेल तर शरीरही आपले कार्य नीट करु शकत नाही. म्हणून मनाने उदास असणार्‍या व्यक्ती विशेष कार्यशील ठरु शकत नाही. त्यामुळे मनाचा उदासपणा जाऊन त्यास चैतन्य येणे आवश्यक असते. पण खर तर मन हे अन्नमय आहे. म्हणजे शेवटी आपण काय खातो यावरच आपले सर्वस्व अवलंबून असल्याचे स्पष्ट होते. आणि आपण काय खावे व काय खाऊ नये तसेच ते कसे खावे हे बापूंनी त्यांच्या व्याख्यानात सांगितले.

हे कनेक्शन सांगताना बापूंनी "दी फरगॉटन ऑर्गन" ची ओळख करुन दिली. ते म्हणजे आपल्या आतड्यांमधील चांगले बॅक्टेरीया. या चांगल्या बॅक्टेरियांचे महत्त्व विशद करताना बापूंनी अगदी थक्क करणारी माहीती दिली. या चांगल्या बॅक्टेरियांच्या प्रभावामुळे माणूस आस्तीक बनत जातो, धीट बनत जातो आणि हे सिद्ध होण्यासाठी आणखी काही कालावधी जाईल. पण हे १०८ टक्के खर आहे असं बापूंनी सांगितले आहे आणि गुन्हेगारांमध्ये वाईट बॅक्टेरियाचे प्रमाण अधिक असल्याचेही शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

याबाबत मी एक जवळून अनुभव घेतला आहे. माझ्या ओळखीतला एक तरुण मुलगा अतीशय व्यसनी व गुन्हेगार प्रवृत्तीचा होता. आस्तीकता नावाला देखील असेल की नाही माहीत नाही. एक दिवस काय झाले माहीत नाही पण व्यसनाचा अतिरेक झाला आणि स्वतःच ठरवले की बस झाले....आता आपण तब्येत सुधरायची.  यासाठी त्या व्यक्तीने व्यायामाचे व्यसन घेतले. बॉडी बनवायची. या ध्यासासाठी त्याने अन्न बदलले....व्यसने सोडली.....व्यायामाचे वेड जरा अतीच होते...पण तरिही त्यामुळे नकळत बदल होत होता....आणि हा बदल आस्तिकतेकडे भक्तीकडे झुकणारा होता...पुढे व्यायामाचे वेड सुटले...पण भक्ती आणि आस्तिकता कायम राहीली.....त्या व्यक्तीने ही हा बापूंचा सेमिनार अटेंड केला. सेमीनारनंतर त्या व्यक्तीनेच मला या गोष्टीची कबूली दिली....की व्यायाम आणि डायट केले नसते तर आज इथे भक्तीमय परिवारात नसतो...भक्तीमय परिवारात नसतो तर आयुष्याला वळण लागले नसते....आयुष्याला वळण लागले नसते तर आता नोकरी आणि अभ्यासात प्रगती केली नसती. आता पुन्हा बापूंच्या मार्गदर्शनानुसार व्यायाम व डायटमधील वेड बाजूला सारुन प्रकृतीला उचित असे व्यायाम व डायट करीन.....असा निर्धार केला.

हे ऎकून मला बापूंनी सांगितलेल्या चांगल्या बॅक्टेरियाच्या प्रभावाचे जबरस्त उदाहरण पहायला मिळाले. मग मी स्वतःकडे देखील पाहीले. कारण नुकतच डॉ. सुचित दत्तोपाध्ये अर्थात सुचितदादांच्या मार्गदर्शनानुसार माझे ही डायट सुरु होते. त्यांनी दिलेले हे डायट म्हणजे बापूंनी दिलेल्या मोठ्या सेमीनारचाच एक भाग होता आणि या डायट फॉलो केल्याने शरिरावरच नाही तर मनावरही उत्तम परिणाम झाला. मी घालवून बसत असलेली माझी कार्यशीलता आणि अर्थात चुणचुणीतपणा मला पुन्हा मिळाला. मन शांत झाले, विचार स्पष्ट झाले. निर्णय क्षमता, निरिक्षण क्षमता, कल्पना क्षमता प्रगल्भ झाली आणि त्याचा रिझल्ट माझ्या रोजच्या कामात मला मिळू लागला. मन अन्नमय याचा अनुभव मी स्वतः घेतला.

स्वतःचा पहिला स्वार्थ म्हणजे स्वतःचे आरोग्य. हे समीकरण बापूंनी दिले. कारण आरोग्य म्हणजे केवळ शारिरिक, मानसिक नाही तर त्यापुढे जाऊन खूप व्यापक असल्याचे या व्याख्याना दरम्यान जाणवले. अशा या स्वतःच्या आरोग्य विषयकची माहीती मी वाट पाहत आहे. लवकरच ही माहीती समिरदादांच्या ब्लॉगवर यावी व डॉ. पौरससिंह जोशी यांच्या टीम अंतर्गत बनणारी वेबसाईट लवकरात लवकर यावी ही सदीच्छा व त्यासाठी शुभेच्छा. तसेच उपासना केंद्रावर ह्या व्याख्यानाची सीडी लावल्यास चुकवू नका.....इतके उचित स्वार्थी तर आपण बनूच शकतो.....अबंज्ञ

http://www.healthonics.healthcare/
-  रेश्मावीरा नारखेडे

Sunday, November 16, 2014

वेगळ्या वाटेवरील "मी"

वेगळ्या वळणाची वाट
शोधित चाललो मी
पाहूनी खाच-खळगे काटे
मोहित झालो मी

Saturday, November 15, 2014

अध्यात्म आणि विज्ञान - गाभा एक, दोन भाषा


अध्यात्म आणि विज्ञान गोष्ट सांगणार्‍या दोन भाषा असल्याचे सुप्रसिद्ध लेखक डॅन ब्राऊन यांनी भारतातील त्यांच्या भेटी दरम्यान म्हटले. Link1-The Huffington Post, Link 2-Time of India

Dan Brown
अतीशय सुंदर अशा कादंबर्‍या देणार्‍या ब्राऊन यांचे हे मत ऐकून खुप आनंद झाला. कारण विज्ञानाचे अवडंबर माजवून अध्यात्माला कमी लेखणारे जगात कमी नाही. जिथे विज्ञान संपते तिथे अध्यात्म सुरु होते. बापूआत्तापर्यंत हेच सांगत आले. किंबहुना त्यांच्या प्रवचनात अध्यात्म हे विज्ञानाच्या आधाराने आणि विज्ञान अध्यात्माच्या आधाराने समजवून सांगितले जाते. खरचं आणि त्यामुळेच बापूंचे विचार पटतात. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर किंवा जस्टीफीकेशन बापूंच्या प्रवचनातून मिळतेच मिळते. ब्राऊन    यांच्या निमित्ताने "अध्यात्म की विज्ञान" हा विषय बाजूला जाऊन अध्यात्म आणि विज्ञान नाण्याच्या दोन बाजू असल्याच्या बातम्या तरी झळकू लागल्या. ज्याला जे पटेल त्यावर त्याने विश्वास ठेवावा. पण सत्य हेच आहे की अध्यात्म आणि विज्ञान हे एकमेकांपासून वेगळे नाहीत.

तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया । उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः॥ 
( अयं भगवद्गीतायाः चतुर्थोध्यायस्य ज्ञानकर्मसंन्यासयोगस्य चतुस्त्रिंशत्तमः (३४) श्लोकः)
हा श्लोक सद्गुरूंकडून ज्ञान कसं मिळवावं, हे सांगतो. ज्यांना सद्वस्तूचं ज्ञान झालं आहे, जे खरे यथार्थ सद्गुरू आहेत त्यांना प्रणिपात करून, त्यांची सेवा करून, त्यांना अत्यंत विनयानं प्रश्न विचारला की हे अर्जुना ते तुला यथार्थ ज्ञान देतील, असं भगवंतांनी या श्लोकाद्वारे सांगितलं आहे.

याच प्रमाणे सदगुरु अनिरुद्ध बापू सुद्धा आपल्या प्रवचनातून यथार्थ ज्ञान देत असतात. त्यांच्या श्रद्धावान मित्रांना पडलेल्या प्रश्नांचे समाधान उचित वेळेस करीत असतात. सध्या बापू विविध अल्गोरिदम समजवून सांगत आहेत. संख्याशास्त्रातील अध्यात्माचा त्यांनी परिचय करून दिला. अध्यात्म आणि विज्ञान हे एकरुप आहेत हे त्यांनी डॉ. निकोला टेसलाच्या जीवनगाथेवरुन पटवून दिले आहे. अध्यात्म आणि विज्ञान याचा एकत्रित विचार करताना एक गोष्ट माझ्याही लक्षात आली. ती मांडण्याचा प्रयास करीत आहे. 

बापूंनी प्रवचनातून स्वार्म इंटेलिजन्सची करून दिली. माझा काही फारसा अभ्यास या विषयावर झाला नाही. पण एकंदरीत स्वार्म बद्द्ल जे थोडे फार कळले ते असे की सामुहिक बुद्धीमत्ता आणि त्यातून तयार होणारी अभेद्य शक्ती. बापूंनी प्रवचनात ही स्वार्म टेक्नॉलॉजी स्पष्ट करण्यासाठी एक मुंग्यांचा व्हीडीओ दाखविला. ज्यात सर्व मुंग्या एकत्रित येऊन एकाच पद्धतीचे वर्तन करून भल्या मोठ्या लाटेचा देखील सामना करतात आणि सुखरुप नदी पार करतात. मुंगीसारख्या प्राण्याच्या सामूहिक बुद्धिमत्तेबाबत संशोधन झाले आहे आणि होत आहे व या संशोधनात थक्क करणारी माहिती मिळत आहे. सामूहिक बुद्धिमत्तेने अशक्य वाटणारी कार्ये लीलया करता येतात, हा मुद्दा मुंग्याच्या सामूहिक(swarm intelligence) बुद्धिमत्तेच्या अभ्यासातून स्पष्ट होतो. मुंग्यांची वसाहत, त्यामागील त्यांची कल्पकता, त्यांचे अन्न गोळा करणे, शेती आणि पशुपालन करणे याबाबतच्या संशोधनाबद्द्ल सांगून परम पुज्य सद्‍गुरु श्रीअनिरुद्धांनी गुरूवार दिनांक ८ मे २०१४ रोजी च्या मराठी प्रवचनात सामूहिक बुद्धिमत्तेबाबत सविस्तर माहिती दिली, ती आपण या व्हिडियोत पाहू शकतात.


परंतु या ठीकाणी मला मांडायचा मुद्दा असा की या स्वार्म टेक्नॉलॉजीचा आणि अध्यात्माचा निकटचा संबंध आहे. किंबहुना अध्यात्माच्या पिपलिका या मार्गाचे वैज्ञानिक स्वरुप असल्याचे मला वाटते. अध्यात्मामध्ये मुंगीचे फार महत्त्व आहे. पिपलिका मार्ग - पिपलिका म्हणजे मुंगी. मुंगीचा मार्ग.....हा काय आहे मुंगीचा मार्ग? 

आणि आपले आद्य पिपलिका पांथस्थ म्हणजेच आद्यपिपा - सुरेशचंद्र दत्तोपाध्ये. सुचितदादा व समिरदादांचे वडील.  ते म्हणतात,

पिपा म्हणे अनिरुद्धाने| मजसि नेले ह्याची मार्गे|
तुम्ही धावारे सत्त्वर| बापू उभाची तत्त्पर॥

याचे स्पष्टीकरण देताना सुहाससिंह डोंगरे म्हणतात -

आद्यपिपा काय म्हणतात ? मी ह्या मार्गाने गेलो नाही, तर अनिरुद्धाने मला ह्या मार्गाने नेले. पूर्ण शरणागती....कुठेही जराही अहंपणा नाही. अनिरुद्धांचा मार्ग म्हणजे देवयान पंथ, पिपीलिका पंथ म्हणजेच पुरुषार्थ पंथ. पिपीलिका म्हणजे मुंगी. मुंगी जशी सदैव पुरुषार्थ करत असते व ती सदैव सामूहिक प्रयासांसह क्रियाशील असते, त्याप्रमाणे श्रीमद्पुरुषार्थाचा श्रद्धावान सर्व श्रद्धावानांसह एक श्रद्धावंत समाज म्हणून सदैव पुरुषार्थशील असतो. अशा पुरुषार्थी सैनिकांचा पंथ म्हणजेच ‘भक्तिसेतू’ व हा भक्तिसेतू रामाच्या आज्ञेने, हनुमंताच्या मार्गदर्शनाने बांधणारे श्रद्धावान पिपीलिकामार्गाचे प्रवासी आहेत. ह्या सर्व अनिरुद्धभक्तांमध्ये ‘आद्य पिपीलिकापांथस्थ’ म्हणून अग्रणी असणारे असे हे आद्यपिपादादा !

मुंगी हा खरा पुरुषार्थ करीत असते. ही मुंगीच आपल्याला भक्ती, एकनिष्ठता आणि कठॊर श्रद्धा शिकविते. अपार कष्ट सोसूनही ती कधीही आपला मार्ग बदलत नाही. या मुंगीच्या भूमिकेत जाऊन महाधर्मवर्मन योगिंद्रसिंह जोशी म्हणतात,

हेचि मागत आलो, हेचि पुढे मागू 
पिपा संत संगू नामपाठ । 
योग्या मुंगी जैसी जन्मोजन्मी खोडी 
गुळ ना तो सोडी, तुटो मुंडी ॥ २ ॥ 

हा गुळ कुठला...तर या देवयान पंथावर राहण्याची सदिच्छा हाच तो गुळ..त्या परमात्म्याचे चरण हाच गुळ मग त्या गुळासाठी मुंडी मोडली तरी बेहत्तर.

हीच मुंगी काय करू शकते हे मुक्ताबाई सांगते. 
संत मुक्ताबाई म्हणते,

मुंगी उडाली आकाशी | तिने गिळिले सुर्यासी||

मुंगी एवढे लहान असलो तरी मुंगीमध्ये सुर्याला गिळंकृत करण्याची ताकद तिच्यात असते म्हणजेच अशक्य ते शक्य करण्याची ताकद तिच्यात असतेच असते. मात्र त्यासाठी मुंगी बनणे गरजेचे आहे. मुंगी सारखे खडतर परिश्रम आवश्यक आहे. भक्तीमार्गात मुंगीचे महत्त्व अनन्य आहे.

स्वार्म इंटेलिजन्स म्हणजे सामुहिक बुद्धीमत्ता ही गोष्ट दुर्जनांवरील सजन्नांच्या विजयाचा "विजयमंत्र"च आहे, असे मला वाटते. "रावण वधः निश्चितः" हा आत्मविश्वास देणारी मुंगीच वानरसैनिक आहे असे मला वाटते.

- रेश्मावीरा नारखेडे....



भावस्वरूप बापूराया


यावर्षी देखील अधिवेशनला जायची संधी मिळाली. समिरदादा बापूंचे करीत असलेले गुणसंकिर्तन ऐकायचे यासारखी सुवर्ण संधी प्राप्त झाली.  बापू प्रत्यक्ष उपस्थित नव्हते पण...अधिवेशनाचा विषय होता फक्त बापू...आणि मग त्याचे अस्तित्व सर्वत्र जाणावयाला लागले. अधिवेशनाच्या सुरुवातीलाच दादा म्हणाले की या बापूंचे प्रेम अक्षरशः अंगावर येते....आणि ते कसे ते दोन दिवस अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर जाणविले. दादांनी म्हटलेली वरील गोष्ट अगदी प्रत्येकाने अनुभवली असेल. इतुके अनंत प्रेम फक्त त्याचे.....

बापूंचे मानवत्व जाणून घेता घेता आपण त्याच्या दिव्यत्वापर्यंत कधी जाऊन पोहचतो हे कळतच नाही हे अगदी उदाहरणासहित दादांनी विषद केले. हा बापू असा आहे, हा बापू तसा आहे....हे जाणून घेताना आधी तो "माझा आहे" हे मान्य केले की मग आपण सहज त्याच्याशी जोडले जातो. मग तो माझा मित्र आहे की डॉक्टर आहे की सद्‍गुरु आहे की देव आहे....कुठल्याही नात्यात त्यास ठेवा. तो ना म्हणत नाही. त्याला फक्त आपलं मानलं पाहिजे. हे जाणवले. 

बापूंचे विविध पैलू जाणून घेताना भारावून गेल्यासारखे होते. केवळ एक व्यक्तीमत्व म्हणून देखील बापूंना जाणून घेण्याचा प्रयास केला तरी आपण त्यांच्या प्रेमात पडतो आणि नकळत आपल्या आयुष्यातील आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आपण बापूंना स्थान देऊन मोकळे होतो. बापू आयुष्यात येण्याआधी विविध सेलिब्रेटी माझे आयडॉल असायचे. अगदी प्रत्येक क्षेत्रातील. पण आता प्रत्येक क्षेत्रात महारथ मिळविणारे एकमेव बापूच माझ्या जीवनाचे आयडॉल झाले आहेत. 

या अधिवेशात दादा बापूंबद्द्ल बोलत असताना अक्षरशः अंगावर काटा येत होता. दरवर्षी अधिवेशनात बापू स्टेजवर दिसायचे यावेळी मात्र प्रथमच हृदयात दिसला. हो बापू माझ्या हृदयात दिसला. माझे अंतःकरण बापू प्रेमाने तुडूंब भरल्याचे मला जाणवले. कुठल्याही देवत्वाची किंवा दिव्यत्वाची अनुभूती नाही आली. परंतु बापूंच्या मानवत्वाची, मानवतेची, माणुसकीची आणि मुख्य म्हणजे "माझ्या मनातील माझ्या बापूंची अनुभती आली." तो दुसरीकडे कुठेही नसून माझ्या मनात, माझ्या आयुष्यात आहे याची अनुभूती आली. तो काय म्हणून माझ्या आयुष्यात आहे? हा प्रश्न मला अनेक जण विचारायचे. आज त्याचे उत्तर सापडले. तो केवळ देव म्हणून नाही, सदगुरु म्हणूनही नाही...प्रामुख्याने तो "भाव" म्हणून माझ्या आयुष्यात आहे. हीच मोठी आणि सत्य जाणीव या अधिवेशनात झाली.

खरचं हा बापू, हा अनिरुद्ध म्हणजे "भाव" आहे. प्रत्येक श्रद्धावानाच्या, प्रत्येक सज्जनाच्या मनातील पवित्र भाव म्हणजे माझा हा मूर्तीमंत बापूराया...आणि त्याची आल्हादिनी शक्ती "भावना" स्वरुपात प्रकट होते. हीच ती सरस्वती...हीच ती भक्तीरुपीणी...मनात भाव असल्याशिवाय भावना प्रकट होऊ शकत नाही...आणि या भावापासून भावनेचे प्रकटीकरण होण्यासाठी प्रेरणा देते ती त्याचीच प्रेमशक्ती. 

ह्याच प्रेमशक्तीचा अनुभव घेतला यंदाच्या अधिवेशनात.....

Friday, November 14, 2014

How to save links on Facebook? Facebook Save - Very useful feature

इंटरनेटच्या जगात रोज काही तरी नवीन येत असतो. तुमचा आमचा लाडका फेसबुक तर सारखा रंग बदलत असतो. म्हणजेच त्याचे नवनवीन फिचर्स येत असतात. आपल्या युजर्सना फेसबुक वापरताना कंफर्ट देण्यासाठी अनेक मोठे बदल फेसबुकने या वर्षभरात घडवून आणले. दैनिक प्रत्यक्षच्या सोशल मिडीयाच्या अंकात फेसबुकवर मी लिहले होते. त्यानंतर वर्षभर फेसबुक फारसे पाहणे झाले नाही. पाहण्यापेक्षा नीट पाहणे झाले नाही. आत्ताच मी पुन्हा फेसबुक जरा बारकाईने पाहण्यास सुरुवात केली. तेव्हा अस लक्षात आले की फेसबुकने एक नवं फिचर दिले आहे.
सेव्ह Save. तर आपण पाहूया हे फिचर काय आहे ते.

फेसबुक ही एक असे संकेत स्थळ आहे की जिथे अगदी सेकंदाला नवीन काही तरी येत असते. जितके आपले फ्रेंडस, जितके पेजेस आपण लाईक केलेले असेल तितक्या लवकर आपले न्यूज फीड बदलत राहते. आणि यातून बर्‍याचशा गोष्टी पाहण्याचे राहून जाते. ज्यात अनेकदा महत्त्वाच्या बाबी देखील असतात. पण पुन्हा मात्र त्या गोष्टी शोधायच्या असतील तर खरोखरीचे प्रॉब्लेम्स होतात. यावर तोडगा म्हणून फेसबुकने "सेव्ह" "Save" नावाचे फिचर काढले आहे.

जर आपण आपल्या वेब ब्राऊझरमध्ये बुकमार्क्स वापरुन आपल्याला हवी ती लिंक सेव्ह करतो तसेच इथे आपल्याला हवी ती पोस्ट लिंक आपण सेव्ह करू शकतो.


यासाठी फेसबुकच्या उजवीकडील कोपर्‍यातील बटनावर क्लिक करून सेव्ह असे म्हणावे. ही पोस्ट आता सेव्ह झाली.

नंतर तुमच्या फेसबुकच्या होम पेजवरील डावीकडील कोपर्‍यात तुम्हाला सेव्ह असा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करावे.

त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला तुम्ही सेव्ह केलेल्या फेसबुकवरील सर्व गोष्टी दिसतील. 

यामध्ये लिंक, फोटॊ, व्हीडीओ इत्यादी वर्गीकरण करून दिलेली आहे. त्यामुळे आपण सेव्ह केलेली पोस्ट सॉर्ट करण्याचे काम फेसबुकच करुन देतो.
शिवाय आपण सेव्ह केलेली लिंक आपण येथूनच पुन्हा शेअर करू शकतो.
  • सेव्ह केलेल्या लिंक केवळ आपल्याला दिसतील.  आपण सेटींग्समध्ये बदल करून इतरांबरोबरही आपण आपल्या सेव्ह लिंक शेअर करू शकतो.
  • फेसबुकवर अपलोड केलेल्या गोष्टी आपण सेव्ह करु शकत नाही. जसे की फोटो इ. पण फेसबुकवर कुणीही शेअर केलेली (Right now External) लिंक आपण सेव्ह करू शकतो.
सोशल नेटवर्किंग किंग असणार्‍या फेसबुकने सेव्ह या ऑप्शन्च्या मार्फत सोशल बुकमार्किंगमध्ये ही उडी घेतल्याचेही स्पष्ट झाले आहे. बहुतेक एवढच काय ते बाकी होते. कारण फेसबुक मॅप्स, फेसबुक ग्राफ सर्च याआधीच फेसबुकने सुरु केले आहे.

मात्र सर्वसामान्य युजर्सच्या उपयोगास पडेल असे हे "सेव्ह" फिचर निश्चितच यशस्वी ठरू शकते आणि याचा आपणही यशस्वी वापर केला पाहीजे.


- रेश्मावीरा  नारखेडे

Friday, November 7, 2014