Saturday, February 14, 2015

प्रेमात पडणे तसे अवघड नसते


चालता चालता केळीच्या सालीवरुन
धपकन घसरुन पडावं
काहीतरी अनाकलनिय घडावं
आणि नंतर जग जणू विस्मृतीत जावं
असंच काहीस घडत असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीची साल अन पायाचा सुटलेला तोल
यांच्या मिलनाचा जसा योग यावा लागतो
त्याच्या तिच्या नजरेचा कोन
तसा अचुक जुळावा लागतो
नंतर "आई ग" ही एकच हाक उठते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

सालीवरुन घसरुन पडल्यानंतर
कदाचित एखादे हाड मोडू शकते
पण प्रेमात घसरुन पडल्यानंतर
काही नाही तरी कणा नक्कीच मोडतो
पण तरिही,
मोडक्या कण्यासह ताठ उभे राहायचे असते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

केळीचे साल जसे रुग्णालयात नेते
तसे प्रेमाचे भूत पागलखान्यात नेते
म्हणून कृपया केळीचे साल रस्त्यात फेकू नका
आणि खुळचट प्रेमाच्या कल्पने मागे पडू नका
कारण खरे प्रेम पाडत नाही तर सावरते
हे ज्यास समजले तोच म्हणु शकतो

प्रेमात पडणे तसे अवघड नसते
प्रेमात पडणे तसे अवघड नसते

- रेश्मा हरचेकर ३०/०३/१०

नॉन ऑईल - बुरजी

रात्रीच्या वेळीस घराकडे निघाली की प्रत्येक स्टेशनवर कुठेना ना कुठे बुरजी पाव ची गाडी असते.  त्या बुरजीचा वास नाकात गेल्यावर खाण्याचा मोह टाळता येते नाही. खाऊ किंवा नाही ही वेगळी गोष्ट पण त्या वासानेच आपण सुखावून जातो. अशी ही बुरजी नॉन वेज खाणार्‍यांची फेव्हरेट असतेच असते. माझी ही आहे. खुपच. पण बुरजी म्हटली की तेला शिवाय त्यास पर्याय नाही.  तेलामध्ये चांगला कांदा आणि टॉमेटो परतविल्याशिवाय त्याला टेस्ट येत नाही असा माझा विचार होता. पण तो विचार काल केलेल्या बिन तेलाच्या बुरजी ने अत्यंत खोटा पाडला आणि तेलाच्या बुरजीपेक्षा देखील ही बिन तेलाची बुरजी सुंदर असल्याची प्रतिक्रीया मला आली. तर आपण पाहूया ही बिन तेलाची बुरजी कशी बनवीली ते.



साहित्य : -


  • चार मोठे कांदे
  • पाच अंडी
  • चार टोमॅटो
  • १ चमचा आल लसूण पेस्ट
  • मिरची/लाल तिखट
  • १ चमचा गरम मसाला 
  • १ चमचा जीरा पावडर
  • १ चमचा धणे पावडर
  • राई


कृती:  -

सर्वप्रथम कांदा व टॉमेटो बारीक चिरुन घ्या. बारीक चिरणे आवश्यक आहे. फुड प्रोससर किंवा हॅण्ड प्रोसेसरवर बारीक केल्यास उत्तम. फक्त पेस्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
नॉन स्टीक कढई आधी गरम करुन घ्यावी व त्यात आधी बारीक चिरलेला कांदा टाकावा व मग थोड्यावेळाने  टोमॅटो टाकावा.
कांदा व टोमेटो जोपर्यंत शिजत नाही आणि त्याचा कच्चे पणा जात नाही तोपर्यंत शिजवावे. परतत रहावे.
पाण्याचा थोडा शिबका मारवा. मग त्यात राई, मिरची/लाल तिखट, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, जीरा पावडर, धणे पावडर इत्यादी साहित्य टाकावे.
आणि शिजवत रहावे. परतत रहावे. चिमटभर मीठ टाकावे. थोड्यावेळाने त्या मिश्रणाची चव घेऊन पहावी. कांदा टोमॅटो शिजलेला असून त्यात मसाला, मीठाची चव उतरली आहे का नाही हे पहावे.

हे केल्या नंतर पाच अंडी फोडून जर वरील मिश्रणात मीठ लाल तिखट कमी वाटले तर अंड्यांमध्ये देखील टाकावे. अंडी फेटून घ्यावीत. फेटलेली अंडी फेटून कढईत ओतावी. व हे सर्व मित्रण हलवित रहावे.
जो पर्यंत अंड्याच्या बारीक गुठळ्या तयार होत नाही तोपर्यंत हलवत रहावे. जसे आपण नॉर्मल बुरजीला करतो तसेच.
शेवटीमग त्यात बारीक चिरलेली कोथींबीर घालावी व गरमा गरम सर्व्ह करावे.

बारीक  केलेला कांदा आणि टोमॅटो 
मुद्दे -
१. तेल नसल्याने कांदो टोमॅटोच्या रसामध्येच सर्व काही शिजते. म्हणून कांदा टॉमेटो बारीक करावा. गरज वाटल्यास किंचीत पाणी ऍड करावे.
२. तेलात नसल्याने ही बुरजी अत्यंत रसदार लागते व सॉफ्ट होते. तेलात ज्या प्रमाणे अंडे शिजते किंवा करपते त्याप्रमाणे इथे होत नाही.
३. ह्या प्रमाणामध्ये बुरजी तिघांसाठीच होते आणि खाणारा असेल तर दोघांपुरतीच.
४. पिवळा बलक व्यर्जकरुन हार्ट पेशंटसाठी हेल्थी बुरजी पण बनवू शकतो. मात्र त्यासाठी अंड्यांची संख्या वाढवावी.
५. नेहमीच्या प्रमाणापेक्षा नॉन ऑईल बनविताना कांदा टोमेटोचे प्रमाण अधिक घ्यावे.

- रेश्मा नारखेडे
१४/२/१५

प्रश्न ??



मी जन्माला आले तेव्हा डाक्टरांचा चेहरा प्रश्नार्थक होता. असं मी नाही माझी आई म्हणते. कसला बरा प्रश्न पडला असेल त्यांना? कुणास ठाऊक? काही चिंतेचे कारण असेल म्हणून आईने त्यांना विचारल सुद्धा..पण छे! त्यांनी Every thing is normal  असे म्हणून प्रश्न टाळला. ही होती सुरुवात. तेव्हा पासून आत्ता पर्यंत मी आणि प्रश्न हे काही वेगळे नाहीत. मला प्रश्न पडतात. माझ्या पडिक प्रश्नांवर पुन्हा प्रश्न निर्माण होतात. मी असताना प्रश्न. मी नसताना प्रश्न. माझ्या बोलण्यावर प्रश्न, माझ्या वागण्यावर प्रश्न.

माझे नावच माझ्या जवळच्यांनी "२१ अनपेक्षित प्रश्नसंच" असे ठेवले आहे. काय माहित कधी कुठला प्रश्न विचारेन. त्यामुळे मला टाळण्याचाच लोकांचा कल असतो. असो...

पण २१ अनपेक्षित प्रश्नसंच हे नाव मी पुरेपुर सार्थ ठरवलय..बरं का!! इतरांना झोपले की स्वप्न पडतात..मला प्रश्न पडतात..आता झोप किती वाजता लागेल? स्वप्न कुठलं पडेल? स्वप्नात कोण येईल? कोण यायला हवे? इत्यादी. आणि माझी पहाट होते ती प्रश्नानेच कुठलं स्वप्न पडलं होत? ह्या प्रश्नाच्या धक्क्यातून सावरत नाही तोच....आईंची प्रश्नांची सरबत्ती सुरु...अग म्हशे उठलिस का? दात घासलेस का? चहा हवा की दूध? ....भाजी खाशिल ना? उफफ...आईला पण "उत्तरात" बोलता येत नाही का? बघा मीही पुन्हा प्रश्नच विचारला...हे असंच होतं माझं...

आता मला पडलेले प्रश्न ऐका...
  1. भारताच्या पूर्वेला असणार्‍या राज्याला "पश्चिम" बंगाल असे का म्हणतात?
  2. लोक मला म्हणतात तुझे वळण सरळ नाही..आता वळण कधी सरळ असेल का?
  3. ट्रेनमधील विक्रेते माल विकून आलो असे म्हणण्याऐवजी "ट्रेन मारुन आलो" असे का म्हणतात? म्हणजे ते नेमके काय करतात?
  4. खुर्चिवर बसले असतानाही लोक नेटवर बसलोय अस खोट का बोलतात?
  5. आणि सगळ्यात वाईट म्हणजे...develop करायला दिलेल्या फोटोंना "फोटो धुवायला दिले आहेत" अस का म्हणतात? आता ते काय कपडे आहेत?
  6. जेवायला बस आणि बसून जेव..यामधील क्रीया सारखीच आहे...पण शब्दांच क्रम बदलला की अर्थ एकच राहून भाव कसा काय बदलतो?
  7. माझी मैत्रीण फोनवर मला सांगते...की आता मी जेवण करते आहे म्हणजे नक्की जेवण बनवते की जेवण जेवतेय, हे मी कस समजायचे?
  8. महागाई शब्द कसा आला? गाईंशी त्याचा काय संबंध.....
  9. झोपलेले आहे हे दिसत असताना हलवून हलवून उठवायचे आणि विचारायचे की झोपली होती का? या प्रश्नाला उत्तर काय अपेक्षीत असते?
  10. वाढू का? वाढू का? जेवायला बसल्यावर हा प्रश्न तर जाम सतावतो. कारण इतकी मोठी उंच वाढलेली असताना, ताई अजून किती वाढणार? हा प्रश्न मला पडतो?
  11. आता अंधार हा गुडुप कसा काय? गुडूप म्हणजे काय? गुडूप असा अंधाराचा आवाज आहे का जसा पाण्यात दगड पडल्यावर येतो डुबुक तसा?
  12. कंटाळा आला असे आपण म्हणतो पण तो येतो कुठून?



या अशा अनेक प्रश्नांनी माझं आयुष्य आणि मी प्रश्नार्थक झालय आणि उत्तरांनी माझ समाधानही होत नाही....
कंटाळा आलाय मला या प्रश्नमय आयुष्याचा..कुठून ते ही कळत  नाही? खुप नुकसानही झालयं माझ. म्हणून मी ठरवलय...की आता प्रश्नच विचारायचे नाही मुळी...केवळ उत्तरातच बोलायचे. द्यायची फक्त उत्तरे...प्रश्न टाळायचे...

हा विचार माझा पक्का होऊन काही दिवस उलटत नाही तोच.....

एका सुशिक्षित, सुसंस्कृत, सुंदर मुलाने मला वॅलेंटाईनच्या दिवशी विचारले 

Will You Marry Me??? 

मी त्याला ताडकन उत्तर दिले...
Are You Gone Mad??? 
तुला वेड लागलेय का?

झालं....

आता त्या मुलाचा चेहरा प्रश्नार्थक झाला होता.
पण त्याने शांतपणे उत्तर दिले...हो! वेडाच झालोय...

आयुष्यात माझ्या प्रश्नाला मिळालेले हे एकमेव समाधानकारक उत्तर होते.

त्यानंतर विचारु नका काय झाल....

एवढचं सांगू शकते की २१ अनपेक्षित प्रश्नसंचाला अखेर २१ अपेक्षित उत्तरसंच मिळाला आहे....


- रेश्मा नारखेडे 
ही कथ पूर्णपणे काल्पनिक आहे याची नोंद घ्यावी 
व याबाबत कृपया प्रश्न विचारु नये.

Thursday, February 12, 2015

डायट भेंडी...

भेंडीची भाजी मला खूप आवडते. परंतु आजपर्यंत मी भरपूर तेलात खरपूस तळलेली भेंडी खाल्ली आहे. भेंड्याची भाजी म्हटली म्हणजे तेल आले. पण डायटमुळे तेल कमी केले असल्याने कमी तेलात भेंड्याची भाजी करण्याचा प्रयास केला. आणि खरच खुप छान भेंडी झाली आणि नंतर लक्षात आले की तेलाशिवाय देखील भेंडी छान होईल. पण आधी लेस ऑईलमध्ये भेंडी कशी बनवली  ते पाहूया.


साहित्य : 
  • अर्धा टी स्पून ऑलिव्ह ऑईल (2.5 Ml पेक्षाही कमी)
  • अर्धा किलो भेंडी (दोन जणांना पुरेल)
  • हळद
  • मीठ
  • लाल तिखट


कृती :
  • सर्वप्रथम भेंडी धुवून कोरडी करुन तीचे नेहमी सारखे काप करावे.
  • नंतर त्यांना अर्धा टी स्पून ऑलीव्ह ऑईल लावावे.
  • तेवढेच ऑलीव्ह ऑईल सगळ्या भेंडींच्या कापांना नीट लागेल हे पहावे. नीट मिक्स करावे. 
  • मग तसेच चवीपुरते मीठ आणि लाल तिखट लावावे.
  • मग नॉन स्टीक कढई तापवून यात भेंडी शिजायला टाकावी.
  • मध्यम गॅसवर झाकण ठेवून भेंडी शिजवावी.
  • पाच-दहा मिनिटानंतर भेंडी शिजल्याचा वास येऊ लागतो.
  • तेव्हा झाकण काढून भेंडी छान परतून घ्यावी. वर खाली फिरवावी.
  • एक तुकडा उचलून नीट शिजली आहे का नाही व चव पहावी.
  • आवश्यकता असल्यास थोडे मीठ व मसाला घालून आणखी पाच एक मिनटे शिजू द्यावी. 


आतिरिक्त :
यामध्ये तुम्ही कांदा, कोकम घालून देखील भेंडी करु शकता.


- रेश्मा नारखेडे 
२/१२/२०१५

आत्मबल - तुझे माझे नाते आई

आत्मबलचा कार्यक्रम नुकताच झाला. मला प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाता आले नाही. परंतु या कालावधीत मी माझ्या वेळच्या आत्मबलच्या आठवणींमध्ये रमले होते...खरच एक एक आठवण जपून ठेवण्यासारखी आहे. किती सांगू आणि किती नाही. या आत्मबलच्या क्लास मध्ये मला काय मिळाल हे शब्दात सांगता येणार नाही पण तीन प्रमुख गोष्टी मला मिळाल्या त्या म्हणजे आई, मी आणि सख्या. आज जेव्हा लग्न झाले आणि बाळ झाले तेव्हा जाणवतेय आत्मबल संपलेले नाही. आज खरच जाणवते एका मुलीचे रुपांतर पत्नी आणि आईमध्ये जेव्हा होते...तेव्हाचा बदल हा साधासुधा नसतो. आत्मबल हा बदल स्वीकारण्यास व पेलण्यास समर्थ करते. ते ही अगदी हसत खेळत. 

नंदाईच्या सानिध्यात आपल्यात सहज होणारे बदल आपल्याला देखील कळत नाही. मग वेळ जसा पुढे जातो तशी आपल्याला त्याची जाणिव होत जाते. आणि तेव्हा लक्षात येते की आई आपल्यावर किती मेहनत घेत आहे आणि जर आपण तिला हवी तशी साथ दिली तर आपल्या आयुष्याचे सोने होऊ शकते. होय!!! नंदाईने माझ्या आयुष्याचे सोने केले...

आईने मेहनत घेतली म्हणजे नक्की काय? आई जेव्हा क्लासमध्ये येते आपल्याला काही शिकविते तेव्हा ती आपल्यावर मेहनतच घेत असते. ती आपल्या छोट्याश्या रोलसाठी सुद्धा जीवाच रान करते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी ती आपल्यापेक्षा जास्त प्रयास करते. आपल्या वाट्याला जी काही भूमिका येईल त्यात १०८ टक्के पूर्ण प्रयास करायचे ही मोठी शिकवण आई देते...हे आपण सर्वांनी समजून घेतले पाहीजे. माझ्या आयुष्यात जो रोल मला बापूंनी दिला आहे तो १०८ टक्के पूर्ण समर्थाने पार पाडणे आवश्यक असते व ते कसे करावे हे आई स्नेहसंमेलनाच्या मार्फत शिकविते असे मला वाटते. आत्मबल हे स्वार्म सायन्स आहे. संघशक्तिचा एक उच्चतम अविष्कार आहे. 


मला अजूनही आठवत तेराव्या बॅचमधील भूक नाटकातील "बॉस’ चा रोल. अधिक वेळ न देऊ शकल्याने मला अगदी छोटासा हा रोल मिळाला होता. पण आईने दिलेल्या बळामुळे आणि बापूंच्या कृपेमुळे हा रोल खरच अजरामर ठरला. माझी लहानपणापासून इच्छा खुप होती की आपण रंगमंच गाजवावा. ती इच्छा आईने आत्मबलमधून पूर्ण करुन घेतली. रोल छोटा होता की मोठा होता ह्या पेक्षा ती आईने दिलेली एक महत्त्वपूर्ण जबाबदारी होती याची मला जाणिव होत होती. 

माझा रोल लंपट, बाईलवेडा अश्या ठरकी बॉसचा होता. जे मला सुरुवातीला पचविणे कठीण झाले. पण तरीही आईने दिलेले काम आहे हे जमणारच ह्या विश्वासाने मी मेहनत करु लागले. या रोलसाठी आवश्यक ते सर्व काही केले. हा रोल नीट व्हावा म्ह्णून सिगरेट, दारु पिणार्‍या लोकांचे निरिक्षण केले. चित्रपट सिरिअल्स मधून ठरकी पुरुष कसे बाई कडे बघतात याचे निरिक्षण केले. व तसे आपल्या अभिनयात उतरविण्याचा प्रयत्न केला. It was challenge to me. 
THE BOSS - AATMABAL DRAMA

माझा एक वाईट बॉस म्हणून आईला राग आला पाहिजे आणि तिला मला चप्पल काढून मारावेसे वाटले पाहिजे. हे माझे टारगेट होते. त्याप्रमाणे एका रन थ्रूला बेसमेंटमध्ये रिहसल सुरु होती. जागा कमी असल्यामुळे एरव्ही लांब असणारी आई यावेळेस अगदी समोर म्हणजे अगदी एक फुटाच्या अंतरावर बसली होती. मला एक डायलॉग समोर पाहून बोलायचा होता आणि आई समोर होती. पण खर तर मी घाबरले होते. मग मनातून मोठ्या आईचे, दत्तबाप्पा आणि बापूंचे स्मरण करुन जे काय होईल ते होईल अस म्हणत आईच्या डोळ्यात डोळे घालून तो डायलॉग म्ह्टला. यावेळी मला स्पष्ट दिसत होते की आईला माझ्या डायलॉगची आणि नजरेची किळस वाटत होती. आणि शेवटी आई म्हणालीच की तुला चप्पल काढून मारावेसे वाटत आहे.....
ऍण्ड येस इथे सगळ जिंकले होते. आईला हवा तसा माझा रोल झाला होता. 

ह्या नंतर मुख्य कार्यक्रम झाला. कौतुक झाल, पण एक गोष्ट आजही डोक्यातून गेली नाही.....
ती म्हणजे आईने मला हा बॉसचा रोल देऊन काय साधल? माझ्यासाठी हा रोल काय देऊन गेला?
तर खूप काही देऊन गेला. एक आत्मबलचा साधा रोल आपल्या मन बुद्धीत बदल घडवून आणू शकतो. विचारसरणी बदलू शकतो. आपल्याला सतर्क करु शकतो हे प्रथमच मी अनुभवले आणि यापेक्षा बरच काही. 
जसे पंचतंत्रच्या गोष्टींमधून आपल्याला बोध मिळत असतो तसा त्मबलच्या प्रत्येक क्षणातून आपल्याला बोध मिळत असतो...फक्त ते बोधामृत पिण्यासाठी आपल्याला चातक असावे लागते....
आज पुढे कितीही वर्षे गेली आणि अगदी मरणाच्या दारावर असेन तेव्हाही मला आठवेल आपण अस काहीतरी आयुष्यात केले होते ज्यामुळे काही क्षण तरी आई समाधानी झाली होती. आणि हा अनुभव आत्मबलच्या प्रत्येक सखीने मिळवून हृदयाच्या कप्प्यात ठेवावा. यात खुप मोठी ताकद आहे, असे मला वाटते. 

तुझे माझे नाते
जगावेगळे काही
माझ्यातले बळ तू
शक्ती तू आई

तुझ्या चेहर्‍याचे हास्य
अन समाधाना पायी
स्वतःशीच शर्यत पहा
लावली मी आई

सुवर्ण क्षणांची
सुवर्ण गाठोडी
पुन्हा उघडण्याची
लागली मला घाई

चरण उराशी
आत्मबल हाताशी
संसार माथ्यासी
समर्पित होण्यास
बोलव ग आई

- रेश्मा नारखेडे
२/१२/१५

Wednesday, February 11, 2015

एक एक पाकळी प्रेमाची


वेबसाईटवरील चित्र पाहिले ना...नाजूकपणे फुलाची एक एक पाकळी कोणतरी खुडत बसलय...अगदी प्रेमाने...बहुतेक प्रेमासाठी.

यावरुन मला एक गोष्ट आठवली..मी काँलेजला असताना आमच्या Fun Do ग्रुपमध्ये एक मित्र होता.. अक्षय खुडे....sorry. खुडे नाही कुडे. अक्षय कुडे. आम्ही त्याला खुडे म्हणायचो. अक्षरक्षः तो नावाप्रमाणे अक्षय, अखंडपणे गुलाबाचे फूल हातात घेऊन ते खुडत बसायचा. एक संपल...की दुसरं..दुसरं संपलं की तिसरं...पुढे गुलाब महागली...मग मिळेल ते फूल घ्यायच...पाने ही...चिंचेची डहाळी घेउन बसायचा खुडत खुडे. sorry कुडे.

हे कर्म सुरु असताना तोंडात एकच जप...She Loves Me...She Loves Me Not....या दोन जपांच्या साक्षीने एक एक पाकळी शहीद होत होती..न जाणॊ या प्रेमाच्या हवनात किती पाकळ्या आणि पानांची आहुती गेली असेल? पण या त्याच्या तपश्चर्यचे फळ काय त्याला मिळतय...किंवा नजिकच्या काळात मिळेल असे वाटत नव्हते. 

आणि त्याची ही तपश्वर्या अधिकच उग्र नी उग्र होत होती. collage मधली सगळी झाडे, झुडपे, फुल, पाने घाबरुन गेली असावीत बिचारी. आम्ही पण जाम वैतागलो होतो...एकदा त्याची "SHE" सापडू देत...अशी प्रार्थना आम्ही करत होतो. त्याला विचारयाचा प्रयत्न केला देखिल आम्ही...कोण आहे रे ही मेनका..फुलराणी..जिच्यावर तु ही अशी फुलांची बरसात (मनातून बरबादी असं म्हणायच होत) करीत आहेस? कोण आहे सांग ना? आम्ही करतो काही तरी? पण हा पठ्या हुं का चूं करायला तयार नाही. खुप शोध घेतला.

 त्याच्या डोळ्यांवर नजर ठेवली. तेव्हा कळल...की आमच्याच वर्गातील सीमाला पाहिल्यावर याच्या डोळ्याचे भाव बदलतात...मग आम्ही लागलो आमच्या तयारीला..कसल्या काय विचारता हो..अक्षय सीमाची सेटींग करण्याच्या...दोन दिवसांनी आमच्या म. टा. ने खबर आणली...

म.टा म्हणजे मनिष टाकळे..आमच्या ग्रुपची चालती बोलती वृत्तसंस्था "ही सीमा बायो हेड धाक्रसची पोरगी आहे." बापरे हेडची पोरगी..हेडएकच होईल..म्हणून अक्षयची सेटींग परिक्षेनंतर करायचे ठरविले..१२ वीची परिक्षा जवळ आली..सगळे अभ्यासाला जुंपले...Practical's झाल्या..लेखी झाली..शेवटचा पेपर झाला आणि कट्ट्यावर जमलो...त्याच झाडाखाली...ज्याची पाने गळून (खुडून) इतस्त विखुरली होती.

आता एकच ध्येय...अक्षय आणि सीमाची सेटींग...Plan आखला...आजच तिला गाठायच...आणि अक्षयच्या वतीन विचारायच..Fix....

जवळच सीमा होती बसलेली...विखुरलेली पाने, पाकळ्या चिवडत..
तेवढ्यात अक्षय आला...खुशीत होता...त्याने आम्हाला सगळ्यांना एक एक रसरशीत..भरपूर पाकळ्या असलेलं गुलाब दिल आणि आम्हाला ओळख करुन दिली. Meet My GirlFriend Priya...आमची नजर त्या गुलाबाकडेच खिळली होती...सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न..खुडेच्या हातात गुलाब शिल्ल्क कस राहिल..अरे!! फुलाकडे काय पाहताय...इकडे पहा...ही माझी girlfriend..Priya...

आम्ही जीवावर उदार होउन पण थोड्याश्या कुतुहलाने प्रियाकडे पाहिल..तर....एकजात सगळे केकाटले...तु या प्रियाला पटवली? दुश्मन गँगची पोरीवर प्रेम करायला लाज नाही वाटली. खुप खुप बोललो त्याला..खुप राग आला..बाजूला सीमा सगळं पाहत होती..आम्ही हताशपणे तिच्याकडे पाहिले आणि घरच्या वाट्याला लागलो...तो आमच्या collage चा अखेरचा दिवस होता आणि अक्षयबरोबरील मैत्रीचा सुद्धा...

पाहता पाहता दोन वर्षे उलटली...एका शनिवारी शांतपणे बसले असताना कुरियरवाला आला...आश्चर्यच..अक्षयची लग्नाची पत्रिका होती..आमच्या ग्रुपमध्ये लग्न करणारा तो पहिलाच..दोन वर्ष संपर्कात नव्हतो तरी ग्रुपमध्ये होता तो कायम...पत्रिका सुंदर होती...फुलाफुलांची....अगदी collage चे दिवस आठवतील अशी..पण जरा निरसपणेच उघडली...चि.अक्षय याचा विवाह चि.सौ.का. सीमा धाक्रस हिजबरोबर....SHOCK.....SHOCK......हे कसं काय? काही कळेना...पत्रिका दहा वेळा वाचली....माझा विश्वासच बसेना... आठवड्याने लग्न होत....दरम्यान त्याला फोन केला..पण तो फोनच उचलेना...

सगळे लग्नाला गेलो...शुभेच्छा द्यायला स्टेजवर...तेव्हा आमची सगळ्यांची अचंबीत थोबाडपाहून तोच म्हणाला...
"मित्रांनो, जिच्यासाठी मी वर्षभर फुलांच्या पाकळ्या खुडत बसलो...तिनेच वर्षाच्या आतच मला एखाद्या पाकळीप्रमाणे स्वतःच्या आयुष्यातून खुडून टाकल. मी पाकळ्या खुडत असताना..नेहमी जिने त्या पाकळ्या अलगद, प्रेमाने उचलून आपल्या वहीत जपून ठेवल्या..तिनेच मग मला अलगद, प्रेमाने, मानाने उचलून आपल्या ह्रदयात स्थान दिले. जिने टाकलं तिच्यासाठी जीव जाळण्यापेक्षा, जिने वेचलं तिच्यासाठी...तिचा होऊन राहणे अधिक श्रेयस्कर नाही का?

आम्ही सगळे निशब्दः झालो होतो...ओठांवर फक्त समाधानाचे हास्य होते...

निघताना सीमा..अर्थात सीमा वहिनींनी आम्हाला थांबविले..आणि हळूच त्याला कळणार नाही असे म्हणाली.."एक गोष्ट सांगायची राहीली..माझ्याकडे पाहून अक्षयच्या डोळ्यातले भाव कधिच बदलले नव्हते...भाव बदलत होते तर ते माझ्या डोळ्यातले...अक्षय तर फक्त ते भाव टिपत होता...मात्र, तेव्हा काही कळण्याची बुद्धी्च एका एका पाकळीसोबत गहाणच पडली होती त्याची."

आम्ही हसतच आणि आनंदातच स्टेजवरुन खाली उतरलो...त्या दोघांकडे पाहून या दोन वर्षात नेमके काय आणि कसे घडले हे जाणून घेणेच विसरुन गेलो...असे वाटत होते जणू आमचा collage मधील Plan  आता यशस्वी झाला...अक्षयसीमाच्या सेटींगचा..

कथा - रेश्मा नारखेडे 
(काल्पनिक कथा आहे याची नोंद घ्यावी) 
 २२/०५/२०१०

Tuesday, February 10, 2015

केव्हा तरी पहाटे...विडंबन

एक बिच्चारा प्रियकराने आपल्या प्रेयसीला डोळा मारला आणि नेमके हे तिच्या भावाने पाहिले. ती रात्र त्या प्रियकराच्या आयुष्यातील न भूतो न भविष्य रात्र होती... त्या प्रियकराचे दुःख या विडंबनातून मांडले आहे. मूळ कविता केव्हा तरी पहाटे चे विडंबन करताना...आणि या प्रियकराची वाईट अवस्था मांडताना काही आक्षेपहार्य शब्द वापरण्यात आले आहे.. हे शब्द वापरणे ही या विडंबनाची गरज होती...याची नोंद घ्यावी..

 केव्हा तरी पहाटे, खडबडून जाग आली
मारले चुकून डोळे, मार खात मग रात गेली

सांगू तरी कसे मी, भय तुझिया भावाचे
दाबून श्वास माझा, बदडून रात गेली

कळले मला ना तेव्हा, फुटली कवटी जराशी
कळले मला ना तेव्हा, निसटून धार गेली

उरले शरिरात काही, हुंदके वेदनेचे
आकाश तारकांचे, दाखवूनी रात गेली

उरल्या मला ना तेव्हा, माझ्याच दंत पंक्ती
मग दाढ शेवटाची, कोसळून रात गेली

- Reshma Narkhede